विशेष प्रतिनिधी
मुंबई : सगळीकडे अनलॉक होताना दोन दिवसांचे विधिमंडळ अधिवेशन बोलवून ठाकरे – पवार चर्चेतून पळ काढतेय. अशी टीका करत विरोधी भाजपने अर्थसंकल्पी अधिवेशन नागपूरला घेण्याची मागणी केली. हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यांचे घेण्याची मागणी भाजपने केली होती. त्याऐवजी दोन दिवसांचे अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय ठाकरे – पवार सरकारने घेतला आहे. त्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. thackeray pawar sarkar
विधान भवनात कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधून सरकारवर टीकास्त्र सोडले. माजी मंत्री गिरीश महाजन, राम शिंदे आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, की राज्य सरकारने पुन्हा एकदा राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पुढे ढकलले आहे.
गंभीर बाब म्हणजे केवळ दोन दिवसांचेच अधिवेशन घेणार आहेत. आज शेतकर्यांपुढे अभूतपूर्व संकट. पाऊस, पूर, चक्रीवादळ, रोगराईमुळे शेती नष्ट झाली आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र नुकसान झाले आहे. यावर चर्चा करण्यासाठी दोन आठवड्यांचे अधिवेशन व्हावे, अशी आमची मागणी होती. पण सरकारला दोन दिवसांतच अधिवेशन गुंडाळायचे आहे.
मराठा आरक्षणाचा घोळ सुरू आहे. ओबीसी समाजात भीतीचे वातावरण आहे. महिला अत्याचाराच्या घटना दररोज घडत आहेत. विधिमंडळात यावर चर्चा झाली पाहिजे आणि त्यावर सरकारचे धोरण स्पष्ट झाले पाहिजे. पण सातत्याने हे सरकार अधिवेशन टाळते आहे. किमान 2 आठवड्यांचे अधिवेशन व्हावे, अशी आमची मागणी होती.
पण, सत्ताधार्यांनी ती मान्य केली नाही. सार्या गोष्टी अनलॉक होत असताना केवळ अधिवेशनावर निर्बंध आणणे योग्य नाही. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात व्हावे, अशी मागणी आम्ही केली आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App