दुसऱ्यांचे पक्ष फोडायचे शरद पवारांचे राजकारण नवीन नाही. त्यासाठी कोणताही जावईशोध लावण्याची गरज नाही. फार तर आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी आणि उध्दव ठाकरे यांनी आपल्याला भेट द्यावी यासाठी प्रताप सरनाईकांनी अशी अनेक पत्रे लिहावीत आणि शिवसेनेच्या आमदारांनी देखील त्यांचे अनुकरण करावे. म्हणजे निदान आपल्या मागे फक्त शिवसैनिकच नाहीत, तर आपल्या पक्षाचे आमदार देखील उभे आहेत, हे पक्षप्रमुखांना घरात बसूनच समजून येईल…!! shiv sena MLA pratap sarnaik blaims congress – NCP trying to break shiv sena, he writes a letter to uddhav thackeray
जगात कोणत्याही प्रकारच्या संशोधनाला खूप कष्ट लागतात. बुध्दी पणाला लावावी लागते. भरपूर अभ्यास करावा लागतो आणि त्याच्या अनुभव सिध्दतेतून आपले संशोधन जगासमोर मांडावे लागते.
पण काही शोध असे असतात की जे चुटकीसरशी लागतात. विशेषतः ईडी, सीबीआय यांच्या सारख्या तपास संस्थांचा दट्ट्या फिरला रे फिरला की अनेक जावईशोध लागतात… शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना असाच एक जावईशोध लागला आहे… आणि तो त्यांनी मुख्यमंत्री – शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना पत्र पाठवून कळविला आहे… “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शिवसेना फोडत आहेत. शिवसेनेला वाचविण्यासाठी भाजपशी जुळवून घ्या.” हा तो जावईशोध आहे…!!
किती जबरदस्त शोध ना हा…!! आत्तापर्यंत कोणाला कळलाच नव्हते हे रहस्य…!! पण प्रताप सरनाईकांवरून ईडी आणि सीबीआय या तपास संस्थांचा दट्ट्या फिरला आणि त्यांना एकदम महाराष्ट्राच्या राजकारणातल्या रहस्याच्या जावईशोध लागला… राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवसेना फोडतात…!!
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची अख्खी राजकीय हयात फोडाफोडी करण्यात गेलीय. शिवसेना नावाचा पक्ष शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयात असताना १९९२ साली पवारांच्या फोडाफोडीच्या राजकारणातून पोळून निघालाय… आणि प्रताप सरनाईकांना आत्ता जावईशोध लागतोय की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवसेना फोडतायत म्हणून… व्वा रे भले बहाद्दर…!! हे खरे उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या शिवसेनेचे सैनिक शोभतात…!!
कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने कधीही पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी चुकूनही राजकीय सलगी केली नव्हती. बाळासाहेबांनी तर शरद पवारांच्या नेतृत्वाखालच्या अखंड काँग्रेसचा पराभव करून दाखविला होता.
पण प्रताप सरनाईक हे ज्या उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या शिवसेनेचे सैनिक आहेत, त्या शिवसेनेने मात्र फोडाफोडी करणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी राजकीय आघाडी करून सत्ता स्थापन केली आहे. आणि आता प्रताप सरनाईकांना राजकीय साक्षात्कार झालाय की राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला मोठे करण्यासाठी शिवसेनेने त्यांच्याशी आघाडी केलीय काय, हा सवाल खडा करण्याचा… आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही शिवसेना आमदारांची कामे होत नाहीत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांची कामे होतात याचा…!! जबरदस्त जावईशोध… अतिजबरदस्त राजकीय साक्षात्कार.
भाजप आणि शिवसेनेचा मतदार वाढतोय. पर्यायाने महाराष्ट्रात जबरदस्त हिंदुत्वाची वोट बँक तयार झाली आहे, हे लक्षात घेऊन तर शरद पवारांनी भाजप – शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही पक्षांच्या अतिअहंकारी आणि अल्प वकूबाच्या नेत्यांमुळे तो यशस्वी झाला. यामध्ये उध्दव ठाकरे हे देखील आले. कारण उध्दव ठाकरे हे अल्पवकूबी म्हणजे कमी क्षमतेचे आणि अतिअहंकारी नेते नसते, तर त्यांनी शिवसेनेला आपल्या राजकीय कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या विधानसभेत पूर्ण बहुमत मिळवून दिले असते. निदान महाराष्ट्रातला एक नंबरचा पक्ष बनवू शकले असते आणि मग ते मुख्यमंत्री झाले असते. पण ते अल्पवकूबी नेते आहेत, हे शिवसेनेच्या ५६ आमदारांच्या संख्येवरून स्पष्ट होते. शिवसेनेचे वय ५५ आहे आणि आमदारांची संख्या ५६ आहे. असल्या शिवसेनेला शरद पवारांसारखे नेते फोडत असतील, तर काही नवल नाही आणि तो इशारा देण्यासाठी पत्र लिहिण्याची प्रताप सरनाईकांना गरज नाही.
आणि शरद पवार तरी ही फोडाफोडी का करीत आहेत… एक तर ती त्यांची “राजकीय फितरत” आहे आणि भाजप – शिवसेनेची हिंदुत्वाची वोट बँक फोडल्याशिवाय त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व टिकून राहणे कठीण आहे. म्हणून मग ते मागच्या दाराने कधी मराठा मोर्चांना फूस लावतात. तर कधी संभाजीराजे यांना पुढे करून त्यांची महत्त्वाकांक्षा फुलवून ठेवण्याचे काम करतात. मराठा समाज संघटित व्हायला लागला, की आपल्या मित्रांमार्फत ओबीसी समाजाला हवा द्यायला सुरूवात करतात. कारण शरद पवार हे देखील अल्पवकूबी नेते आहेत. त्यांच्या समर्थकांनी पवारांच्या चाणक्यगिरीच्या कितीही उड्या मारल्या तरी ती चाणक्यगिरी “महाराष्ट्र लिमिटेड” राहिली आहे आणि दिल्लीत पराभूत झालेली आहे.
शरद पवारांचे हे राजकारण नवीन नाही. त्यासाठी कोणताही जावईशोध लावण्याची गरज नाही. फार तर आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी आणि उध्दव ठाकरे यांनी आपल्याला भेट द्यावी यासाठी प्रताप सरनाईकांनी अशी अनेक पत्रे लिहावीत आणि शिवसेनेच्या आमदारांनी देखील त्यांचे अनुकरण करावे. म्हणजे निदान आपल्या मागे फक्त शिवसैनिकच नाहीत, तर आपल्या पक्षाचे आमदार देखील उभे आहेत, हे पक्षप्रमुखांना घरात बसूनच समजून येईल…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App