पंजाब मध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचा एकूण आढावा घेतल्यानंतर एक बाब स्पष्ट होते, ती म्हणजे काँग्रेस हायकमांडची दोन प्रादेशिक नेत्यांना एकमेकांमध्ये झुंजविण्याची प्रवृत्ती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या बंडखोरीच्या निमित्ताने आधी काँग्रेस हायकमांडने कॅप्टन अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून त्यांच्या राजकीय पतंगाची कन्नी कापली, तर त्यांच्याऐवजी नवज्योत सिंग सिद्धू यांना मुख्यमंत्री न करता फक्त प्रदेशाध्यक्षपदी ठेवून सिद्धूंचीही एक प्रकारे राजकीय कन्नी कापली…!! Congress high command in mood to change whole team in Punjab congress
पंजाब मधल्या राजकीय संघर्षात एक प्रकारे हायकमांडने आपल्या प्रादेशिक नेत्यांवरच मात केली. पंजाब काँग्रेसमधल्या परिस्थितीचा नीट अभ्यास केला तर एक बाब लक्षात येते, ती म्हणजे कॅप्टन साहेब काय किंवा नवज्योत सिंग सिद्धू काय, हे दोघेही नेते काँग्रेसच्या हायकमांडच्या कह्यात राहिलेले नव्हते. ते दोघे आपापसात भांडत असल्याचे चित्र दिसत असले तरी एक प्रकारे ते हायकमांडला राजकीय आव्हान उभे करत होते. पंजाब मध्ये हायकमांड स्वतःला हवे तसे निर्णय घेऊ शकत नव्हते. कॅप्टन साहेबांची प्रशासनावर पकड होती, तर नवज्योत सिंग सिद्धू हे “मिसगाईडेड मिसाईल” होते. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे हायकमांडला शक्य होत नव्हते. अशा स्थितीत “फूट पाडा आणि राज्य करा” एवढाच मार्ग हायकमांडला शिल्लक होता. तो मार्ग हायकमांडने अवलंबिला.
कॅप्टन साहेबांना मुख्यमंत्री पदावरून हटवून नवज्योत सिंग सिद्धू यांचे सुरुवातीला हायकमांडने समाधान केले, पण त्यांना मुख्यमंत्री केले नाही. त्यांना फक्त प्रदेशाध्यक्षपदी ठेवून मुख्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळात जुनेच मंत्री कायम ठेवले. यातून नवज्योत सिंग सिद्धू यांना “काँग्रेसी राजकारणाचा” खरा अनुभव मिळाला. म्हणून त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा देऊन टाकला आहे. यावर काँग्रेसच्या हायकमांडची प्रतिक्रिया “थंड” आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रभारी हरीश रावत चंडीगडला जायला निघाले होते. परंतु त्यांचा दौरा हायकमांडने रोखला आहे. उलट कॅप्टन साहेब गेले. नवज्योत सिंग सिद्धूही गेले. आता नवीन टीम उभी करता येऊ शकेल, असा होरा बांधून हायकमांडने नव्या प्रदेशाध्यक्षांची शोधाशोध देखील सुरू केली आहे. किंबहुना नावही कदाचित निश्चित झाले असेल. फक्त ते जाहीर करायचे बाकी असेल. कारण जसे नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नव्या बंडावर हायकमांड “थंड” आहे तसेच मुख्यमंत्री चरणजीत सिंग यांनी हे देखील किरकोळ प्रतिक्रिया व्यक्त करून आपल्या कामाला लागले आहेत.
जुनीच प्रथा आणि व्यवस्था कायम ठेवल्याने मी त्याच्याशी तडजोड करणार नाही, असा व्हिडिओ संदेश नवज्योत सिंग सिद्धू यांनी जारी केला आहे. परंतु त्याचा फारसा फायदा होत नाही, हे त्यांच्या अद्याप लक्षात आलेले नाही. कारण काँग्रेस हायकमांडने त्यांच्याकडे लक्षच दिले नाही. काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी पंजाब मध्ये व्यापक दृष्टीने बघणारा नेता हवा आहे, असे वक्तव्य करून सिद्धू्ंच्या जखमेवर मीठ चोळले आहे. कॅप्टन साहेबांची दूरदृष्टीचा नेता अशी तरफदारी करून अमरिंदर सिंग यांच्या दुःखावर त्यांनी फुंकर घातली आहे. पण त्यांना भविष्यात कोणतेही पद मिळणार नाही हे ही एक प्रकारे सूचित केले आहे.
काँग्रेसमधल्या या सगळ्या राजकीय खेळीचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर ही बाब स्पष्ट होते की, काँग्रेसला पंजाबमध्ये कॅप्टन साहेब आणि नवज्योत सिंग सिद्धू हे दोघेही नेते नको होते. त्यांना आपले ऐकणारे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष हवे होते. त्यापैकी मुख्यमंत्री नेमून झाला आहे. प्रदेशाध्यक्ष नेमायचा आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांची आदळाआपट आणि हायकमांडचा थंडा प्रतिसाद नेमके हेच स्पष्ट करताना दिसत आहे…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App