विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या हालचाली चालू असून त्यात महाराष्ट्राला काय मिळू शकते, याची चर्चा चालू आहे. सध्या महाराष्ट्रात सहा मंत्रीपदे आहेत. शिवसेना बाहेर पडल्याने आणखी एक मंत्रिपद मिळू शकते. तिथे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, नंदुरबारच्या खासदार डाॅ. हीना गावित यांच्या नावाची चर्चा आहे. याशिवाय डाॅ. प्रीतम मुंडे, संजयकाका पाटील, डाॅ. विनय सहस्त्रबुद्धे अशा आणखी काही खासदारांची नावे घेतली जात आहेत. Many names under discussion for Union Cabinet from Maharashtra
नितीन गडकरी, पियूष गोयल, प्रकाश जावडेकर हे कॅबिनेट, तर रावसाहेब दानवे, संजय धोत्रे आणि रामदास आठवले हे राज्यमंत्री असे सहा मंत्री महाराष्ट्रातील आहेत. शिवसेनेचे अरविंद सावंतदेखील कॅबिनेट मंत्री होते, पण राज्यातील सत्तांतराच्या धक्कादायक नाट्यानंतर सावंत यांना नाखुशीनेच मंत्रिपदावर पाणी सोडावे लागले होते. अशास्थितीत नवे एक मंत्रिपद महाराष्ट्राला मिळेल काय आणि मिळाले तर तिथे कोणाला संधी मिळेल, याची चर्चा चालू आहे.
सध्या असलेल्या सहा मंत्र्यांपैकी कुणालाही वगळण्याची शक्यता कमी दिसते. गडकरी-गोयल-जावडेकर-दानवे-आठवले यांचे स्थान निश्चित आहे. जर थोडीफार धाकधूक असेल तर तो संजय धोत्रे यांच्याबाबत आहे. त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नाही, असे सांगितले जाते. मात्र मनुष्यबळ आणि माहिती-तंत्रदान-दूरसंचार अशी तगडी खाते असलेल्या आणि उच्चविद्याविभूषित असलेल्या धोत्रे यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष आपुलकी दिसते. महाराष्ट्रातून ओबीसी किंवा आदिवासी खासदाराची वर्णी लागेल, असा व्होरा आहे. कारण ब्राह्मण, वैश्य, मराठा व दलितांना प्रतिनिधित्व मिळालेलेच आहे.
अगोदरच दोन मराठा मंत्री (दानवे व धोत्रे) असल्याने राणे यांचा समावेश होण्याबाबत तर्कवितर्क आहेत. याच कारणाने पूनम महाजन, गिरीश बापट आदी नेत्यांच्या नावावर काट बसण्याची चिन्हे आहेत. मात्र, जर धोत्रेंना वगळले तर राणेंच्या नावावर प्राधान्याने विचार होऊ शकतो. नंदूरबारमधून दोनदा निवडून आलेल्या डाॅ. हीना गावित यांच्या नावाचा प्राधान्याने विचार होऊ शकतो. एक तर महिला, त्यात आदिवासी, त्यात उच्चविद्याविभूषित आणि त्यात भर प्रभावी संसदीय सहभागाची. संसदेतील त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी भाजपच्या धुरीणांना प्रभावित केल्याचे सांगितले जाते.
महाराष्ट्रातील या तीनही कॅबिनेट मंत्र्यांकडे अतिरिक्त खातीदेखील आहेत. गडकरींकडे रस्तेविकास व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयासोबत एमएसएमई खातेदेखील आहे. ही दोन्ही खाती कायम राहण्याची चिन्हे आहेत. गोयल यांच्याकडे रेल्वे, उद्योग-व्यापार व अन्न व नागरी पुरवठा अशी तीन भारदास्त खाती आहेत. त्यांच्याकडील किमान एक तरी खाते कमी होऊ शकते. जावडेकर यांच्याकडे माहिती व प्रसारण, पर्यावरण व अवजड उद्योग ही तीन खाती आहेत. त्यांच्याकडीलही किमान एक तरी खाते कमी होईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App