विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी बॉम्बेमध्ये विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर खळबळ उडाली आहे. पवई येथील आयआयटी बॉम्बे कॅम्पसमध्ये १८ सप्टेंबर रोजी एका १९ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ४०० हून अधिक विद्यार्थी कॅम्पसमध्ये एकत्र आले आणि प्रशासनाविरोधात आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडून या घटनेबाबत स्पष्टीकरण आणि उत्तरदायित्वाची मागणी केली.
मृत विद्यार्थी एनर्जी सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागात द्वितीय वर्षात शिकत होता. परीक्षेदरम्यान मोबाईल फोन वापरल्याचा प्रकार समोर आल्यानंतर त्याच्याशी शिक्षकांनी चर्चा केली होती. मात्र, या घटनेचा विद्यार्थ्याच्या मृत्यूशी नेमका काय संबंध आहे, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.
परीक्षेदरम्यान मोबाईल वापरल्याचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याला परीक्षेदरम्यान मोबाईल फोन वापरताना आढळून आले होते. संस्थेच्या अधिकृत निवेदनानुसार, त्याने परीक्षेतील प्रश्नपत्रिका ChatGPT वर अपलोड करून उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला होता.
या प्रकरणी विद्यार्थ्यावर तत्काळ कोणतीही शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली नव्हती. संबंधित शिक्षक आणि विभागप्रमुखांनी विद्यार्थ्याशी चर्चा करून त्याला समुपदेशन केले होते. तसेच, या घटनेचा त्याच्या शैक्षणिक भवितव्यावर विपरीत परिणाम होणार नसल्याचे आश्वासन दिल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. त्यानंतर विद्यार्थी वसतिगृहातील आपल्या खोलीत परतला. पुढे तो मृतावस्थेत आढळला.
विद्यार्थ्यांचे प्रशासनाविरोधात आंदोलन
विद्यार्थ्याच्या मृत्यूची माहिती कॅम्पसमध्ये पसरल्यानंतर मोठ्या संख्येने विद्यार्थी मुख्य इमारतीजवळ जमा झाले. त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत घटनेबाबत उत्तर मागितले. विद्यार्थ्यांनी गंभीर घटनांनंतर प्रशासनाच्या प्रतिसादावरही प्रश्न उपस्थित केले.
आंदोलनादरम्यान आयआयटी बॉम्बेचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यानंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉन्व्होकेशन हॉलमध्ये हलवण्यात आले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या मिड-सेमिस्टर परीक्षा स्थगित करण्यात आल्याचे वृत्त आहे.
पोलीस आणि प्रशासनाकडून तपास
विद्यार्थ्याच्या मृत्यूची परिस्थिती आणि त्यामागील कारणांचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि मृत्यू यांच्यात थेट संबंध होता का, याबाबत अद्याप अंतिम निष्कर्ष समोर आलेला नाही.
आयआयटी बॉम्बे प्रशासनाने विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तसेच, मृत विद्यार्थ्याचे मित्र, सहाध्यायी, शिक्षक आणि इतर प्रभावित व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य देण्यात येत असल्याचे संस्थेने सांगितले.
यंदाच्या वर्षातील चौथी घटना
मिळालेल्या वृत्तानुसार, आयआयटी बॉम्बेमध्ये यावर्षी विद्यार्थ्याच्या आत्महत्येची ही चौथी नोंदवलेली घटना असल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वीही संस्थेत विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटना घडल्या होत्या.
या घटनांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, शैक्षणिक दबाव आणि संस्थेच्या मदतव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्याच्या प्रकरणातील संपूर्ण सत्य तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App