विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामातील कथित अनियमितता आणि दानपेट्यांच्या चोरीच्या मुद्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाच तारखेला राज्यभरात ‘रामरक्षा आंदोलन’ आणि रविवारी ‘महाआरती’ करण्याची घोषणा केली आहे. “आता हिंदू सत्ताधाऱ्यांना माफ करणार नाहीत,” असा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या या घोषणेवर आता शिवसेना शिंदे गटाने अत्यंत आक्रमक शब्दांत पलटवार केला असून, उदय सामंत, शंभुराज देसाई आणि संजय शिरसाट यांनी ठाकरेंवर चौफेर टीका केली आहे.Uddhav Thackeray
काँग्रेसच्या मांडीवर बसताना हिंदुत्व कुठे गेले होते? -उदय सामंत
मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरच थेट प्रश्नचिन्ह निर्माण केले. “ज्या वंदनीय बाळासाहेबांनी ‘शिवसेना काँग्रेसमय होणार असेल तर मी माझे दुकान बंद करेन’ असे सांगितले होते, त्या काँग्रेससोबत तुम्ही जाऊन बसलात, तेव्हा हिंदुत्व कुठे होते? राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर हिणकस टीका केली, त्यावेळी हिंदुत्व कुठे होते? आता आमचे नेतृत्व आणि खरी शिवसेना लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे, हे लक्षात आल्यावर त्यांना पुन्हा सावरकर आणि हिंदुत्वाची आठवण झाली आहे,” अशी जळजळीत टीका सामंत यांनी केली.Uddhav Thackeray
तसेच राम मंदिराच्या मुद्द्यावर ते म्हणाले, “राम मंदिराचे उद्घाटन झाले, तेव्हा त्यांची भाषा काय होती, हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. मंदिरातील कथित अनियमिततेबाबत एसआयटी (SIT) नेमण्यात आली आहे, सरकार कारवाई करेल. पण त्याचा आधार घेऊन पुन्हा ‘हिंदूंचे रक्षक’ असल्याचा आव आणणे हास्यास्पद आहे. लोकांनी त्यांना नाकारले आहे, म्हणूनच त्यांचे 100 पैकी 20 आणि आमचे 80 पैकी 60 आमदार निवडून आले आहेत.”
महाआरतीसाठी काँग्रेसची ‘NOC’ घेतली का? -शंभुराज देसाई
मंत्री शंभुराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंच्या ‘महाआरती’ करण्याच्या निर्णयावर खोचक टोला लगावला. “यूबीटी (UBT) चे लोक आता महाआरती करणार आहेत. पण ही आरती करण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीतील त्यांच्या मित्रपक्षांकडून (काँग्रेस-राष्ट्रवादीकडून) ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेतले आहे की नाही, हे त्यांनी आधी स्पष्ट करावे. मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी हिंदुत्वाची विचारधारा बाजूला ठेवली. पण आता जेव्हा त्यांना समजले आहे की महाराष्ट्र आणि देशातील जनता हिंदुत्वाकडे वळत आहे, तेव्हा ते केवळ दिखावा करत आहेत. त्यांचे हिंदुत्व कायमस्वरूपी नाही, हे सर्वांना माहीत आहे,” असा घणाघात देसाई यांनी केला.
रावणासोबत युती केल्यावर काय होते, ते जनता पाहतेय! -संजय शिरसाट
आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना थेट अयोध्येत जाऊन मंदिर पाहण्याचा सल्ला दिला. “तुमच्याकडे आता काही कार्यक्रम उरले नाहीत का? पक्ष संपत आलाय, म्हणून आता राम मंदिराचा मुद्दा हातात घेतला आहे का? खुशाल घ्या, पण आधी एकदा अयोध्येत जाऊन ते मंदिर कसे आहे, ते पाहून या. मंदिरात चोरी करणाऱ्यांचे कोणीही समर्थन करणार नाही, आठ जणांना अटकही झाली आहे. पण यावरून राजकारण करणे योग्य नाही,” असे शिरसाट म्हणाले.
ठाकरेंवर सडकून टीका करताना ते पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे म्हणतात की राम आमच्या पाठीशी आहे, हनुमान आमच्या पाठीशी आहे. पण वेळप्रसंगी याच रामाला आणि हनुमंताला ते सोडून देतात आणि ‘रावणाबरोबर’ जाऊन युती करतात. रावणासोबत गेल्यावर काय परिणाम होतो, हे जनता 2019 पासून पाहतच आहे.”
उद्धव ठाकरेंनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून हिंदुत्वाचा सूर पुन्हा नव्याने आळवण्याचा प्रयत्न सुरू करताच, शिंदे गटाने त्यांच्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीवर (महाविकास आघाडी) बोट ठेवत त्यांच्या हिंदुत्वाच्या मूळ हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामुळे पुढील काळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून दोन्ही शिवसेना गटांमध्ये शाब्दिक युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App