विशेष प्रतिनिधी
मुंबई : Maharashtra Assembly राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आजही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरून सभागृहात जोरदार चर्चा रंगली. राज्यातील विनापरवाना IVF केंद्रे, गर्भलिंग निदानातील गैरप्रकार, ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील रिक्त पदे, पीकविमा, तसेच जळगाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील जलद न्यायाच्या मागणीवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी IVF गैरप्रकारांवर MCOCA लागू करण्यासाठी पुढील अधिवेशनात कायदेशीर तरतूद करण्याची घोषणा करत सरकारची भूमिका स्पष्ट केली.Maharashtra Assembly
सचिन अहिर विधान परिषदेचे उपसभापती
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदावर अखेर शिवसेना (शिंदे गट) नेते सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाली. महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज दाखल केला होता, तर महाविकास आघाडीकडून शिवसेना (ठाकरे गट)चे जगन्नाथ अभ्यंकर रिंगणात होते. मात्र, सभागृहाची परंपरा आणि सर्वानुमते निवड व्हावी, या भूमिकेतून महाविकास आघाडीने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आवाजी मतदानाद्वारे सचिन अहिर यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती आणि विरोधी पक्षातील सदस्य सभागृहात उपस्थित होते.Maharashtra Assembly
विनापरवाना IVF केंद्रे आणि गर्भलिंग निदानावर ‘मकोका’ लावणार
प्रश्नोत्तराच्या तासाने विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी राज्यातील विनापरवाना IVF केंद्रांचा मुद्दा सभागृहात गाजला. परवान्याशिवाय सुरू असलेल्या IVF केंद्रांमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याची चिंता सदस्यांनी व्यक्त केली. यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गर्भलिंग निदान, बेकायदेशीर सोनोग्राफी आणि IVF केंद्रांच्या माध्यमातून होणाऱ्या संघटित गैरप्रकारांवर कठोर कारवाई करण्यासाठी पुढील अधिवेशनात MCOCA लागू करण्याची कायदेशीर तरतूद करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा केली. तसेच अशा गैरप्रकारांना कायमचा आळा घालण्यासाठी विद्यमान कायदे अधिक कठोर करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरा- वडेट्टीवार
दरम्यान, काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील रिक्त पदे, अपूर्ण आरोग्य प्रकल्प आणि कोरोना काळातील आशा स्वयंसेविका व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत देयकांचा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. दुसरीकडे, काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी जळगाव सामूहिक बलात्कार प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत नसरापूर प्रकरणाप्रमाणेच महिलांवरील अत्याचाराच्या सर्व गंभीर गुन्ह्यांचा फास्ट ट्रॅक न्यायालयात जलद निकाल लावण्याची मागणी केली.
यवतमाळचे काँग्रेस आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी पीकविमा प्रश्नावर विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App