वृत्तसंस्था
नवी दिल्ली :NEET Paper Leak NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) आपल्या परीक्षा व्यवस्थेत मोठे बदल करत आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित या घोटाळ्यानंतर NTA ने सर्वोच्च न्यायालयासमोर आणि संसदीय समितीसमोर परीक्षा सुरक्षेसाठी व्यापक सुधारणा राबविल्याची माहिती दिली आहे.NEET Paper Leak
पेपर सेट करणारे तज्ज्ञ ‘लॉकडाऊन’मध्ये
सर्वात मोठा बदल म्हणजे प्रश्नपत्रिका तयार करणारे, त्याचे भाषांतर करणारे आणि अंतिम पडताळणी करणारे तज्ज्ञ आता पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय ठिकाणी ठेवले जात आहेत. परीक्षा होईपर्यंत त्यांना बाहेरील जगाशी संपर्क ठेवण्यास कठोर निर्बंध असतील. NTA च्या इतिहासातील ही सर्वात कडक सुरक्षा व्यवस्था मानली जात आहे.NEET Paper Leak
CCTV आणि डिजिटल मॉनिटरिंग वाढणार
परीक्षा केंद्रांवर CCTV देखरेख अधिक मजबूत केली जाणार आहे. तसेच प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीपासून परीक्षा केंद्रांपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर डिजिटल ट्रॅकिंग आणि रिअल-टाइम मॉनिटरिंगची व्यवस्था केली जात आहे. केंद्रांवर मॉक ड्रिल, अतिरिक्त वीज बॅकअप आणि सुरक्षा तपासणीची सक्तीही करण्यात आली आहे.
प्रश्नपत्रिका छपाई आणि वितरण प्रक्रियेत बदल
NTA ने प्रश्नपत्रिका तयार करणे, भाषांतर, छपाई आणि वितरण या संपूर्ण साखळीत तांत्रिक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक टप्प्यावर डिजिटल सुरक्षा आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी नवी यंत्रणा लागू केली जात आहे.
भविष्यात संगणकाधारित परीक्षा?
NEET सध्या पेन-अँड-पेपर पद्धतीने घेतली जाते. मात्र पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात काही राष्ट्रीय परीक्षा संगणकाधारित (CBT) पद्धतीने घेण्याबाबत NTA विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. तरी NEET-UG 2026 ची पुनर्परीक्षा पारंपरिक पद्धतीनेच होणार आहे.
पेपरफुटीनंतर देशभरात संताप
3 मे रोजी झालेली NEET-UG 2026 परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांनंतर रद्द करण्यात आली होती. या परीक्षेला 22 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यानंतर केंद्र सरकारने CBI चौकशीचे आदेश दिले आणि 21 जून रोजी पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला.
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला फटकार
सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने NTA च्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत UPSC च्या सुरक्षा व्यवस्थेकडून धडे घेण्याचा सल्ला दिला. परीक्षा सुरक्षेच्या बाबतीत अधिक कठोर आणि पारदर्शक प्रणाली विकसित करण्याची गरज न्यायालयाने अधोरेखित केली.
विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा मिळवण्याचे आव्हान
NEET पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागत आहे. काही विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे केवळ सुरक्षा उपाय नव्हे, तर परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण करणे हे NTA समोरचे सर्वात मोठे आव्हान मानले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App