विशेष प्रतिनिधी
नागपूर : Bawankule, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएमला जोडण्यात येणाऱ्या पाडू मशीनवरील आरोप फेटाळून लावलेत. ठाकरे बंधूंना आपल्या पराभवाची चाहूल लागली असून, त्यातून ते अशी विधाने करत आहेत, असे ते म्हणालेत. मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांच्या भेटीगाठी घेणे हे नियमांनुसारच आहे, असेही ते यावेळी म्हणालेत.Bawankule,
निवडणूक आयोगाने मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांना भेटण्याची मुभा दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. पत्रकारांनी याविषयी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना छेडले असता ते म्हणाले, केंद्र किंवा राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कोणतेही पेपर किंवा जाहिरात न करता कोणत्याही हँडबिल किंवा पोस्टर न वाटता आपल्याला मतदारांच्या घरी जाता येते. आम्हालाही चार घरी भेटी देता येतात. पण याचा अर्थ असा नाही की, आम्ही कार्यकर्त्यांकडे जायचे नाही, कुणाला भेटायचे नाही. समाजातील प्रतिष्ठित लोकांना भेटावेच लागते. शेवटी मतदान कुणाला करायचे ते लोक करतील. पण भेट घेणे हे नियमातच आहे.Bawankule,
पाडू मशीनवरील आरोप फेटाळले
राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाने पाडू मशीनच्या मुद्यावर राजकीय पक्षांना विश्वासात घेतले नसल्याचाही आरोप केला आहे. बावनकुळे यावर म्हणाले, काँग्रेस, उद्धव ठाकरे यांना आपला पराभव होणार आहे असे वाटते तेव्हा ते अशी विधाने करतात. ही पराभवापूर्वीची तयारी आहे. ज्या ठिकाणी काँग्रेसचा विजय होतो, त्या ठिकाणी ते मशीनला दोष देत नाहीत. ज्या ठिकाणी काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचा पराभव होतो त्याठिकाणी आतापासून निवडणुकीतील पराभवाची तयारी राज व उद्धव ठाकरे करत आहेत.
मुंबई ही विकासाला मतदान करणार आहे हे त्यांना ठावूक आहे. देवेंद्र फडणवीस म्हणजे विकास व विकास म्हणजे देवेंद्र फडणवीस हा विश्वास महाराष्ट्र व मुंबईच्या जनतेपर्यंत पोहोचला आहे. ठाकरे बंधूंना आता आपला पराभव दिसत आहे. त्यामुळे त्यांनी तशी तयारी सुरू केली आहे.
अजित पवारांच्या विधानावर व्यक्त केला संताप
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर 1999 साली पार्टी फंडासाठी सिंचन प्रकल्पातून काही कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. बावनकुळे यांनी या आरोपावर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, 1999 ते 2026 हा फार मोठा काळ आहे. 1999 मध्ये ज्या वेळी अजित पवारांकडे फाईल आली, तेव्हाच त्यांनी एखादा आरोप केला असता तर त्याला अर्थ असता. आता एवढ्या उशिरा हे सांगून किंवा एक फाईल माझ्याकडे आली होती, त्यावर असे काही लिहिले होते, असे सांगण्यात कोणतेही तथ्य नाही. जनता त्यावर विश्वास ठेवत नाही. अजित पवार जे बोलत आहेत, त्यांच्याकडून आम्हाला अशी अपेक्षा नाही, असे बावनकुळे म्हणाले.
आत्ता पाहू पाडू मशीनवर काय म्हणाले होते राज ठाकरे?
राज ठाकरे म्हणाले होते, निवडणूक आयोगाने ‘पाडू’ (प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट) नामक नवे मशीन आणले आहे. या मशीनची माहिती कोणत्याही राजकीय पक्षांना देण्यात आली नाही. ते कोणत्याही राजकीय पक्षांना दाखवण्यात आले नाही. त्यानंतरही ती मशीन ईव्हीएमला जोडली जाणार आहे. आयोगाला हे मशीन दाखवावे व सांगावे वाटत नाही. ते त्यांना हवे ते करत आहेत. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यावर उत्तर देण्यास तयार नाहीत. आत्ताच्या सरकारने हा आयोग केव्हाच मारून टाकलाय. त्यामुळे त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही. पण ही कोणती प्रथा व कोणत्या गोष्टी महाराष्ट्रात चालू आहेत? हे लोकांना समजले पाहिजे.
निवडणुकीच्या तोंडावर रोजच्या रोज हे लोक कायदे बदलत आहेत. हा काय प्रकार सुरू आहे यासंबंधी पत्रकारांनी आयोगाला प्रश्न विचारले पाहिजेत. जनतेनेही विचारले पाहिजेत. या सरकारला जी गोष्ट हवी आहे, ती गोष्ट करून देण्यासाठी निवडणूक आयोग आहे का? सरकारला आता ज्या काही सुविधा हव्या आहेत त्यासाठी आयोग काम करत आहे का? हा आमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App