विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळ आयोजित विशेष समारंभात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजयाताई रहाटकर यांना “आचार्य तुलसी कर्तृत्व पुरस्कार” प्रदान करण्यात आला. महिला उत्थान आणि सशक्तीकरण क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कार्य आणि सातत्यपूर्ण योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. vijaya Rahatkar
आचार्य तुलसी यांनी समाजाच्या नैतिक उत्थानासाठी अथक प्रयत्न केले. क्रांतीचा बिगुल वाजवून महिला सशक्तीकरणाची ज्योत प्रज्ज्वलित केली. सन 2003 मध्ये स्थापन केलेला पुरस्कार अध्यात्म, शिक्षण, कला, विज्ञान, संस्कृती, सुरक्षा, नारीजागरण, प्रशासन आदी क्षेत्रात अनुपम सेवा देणाऱ्या महिला संस्था किंवा महिलेला प्रदान केला जातो.
कार्यक्रमास तेरापंथचे अकरावे अनुशास्ता, आचार्यश्री महाश्रमणजी यांच्या पावन उपस्थितीत हा वैभवशाली पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
या प्रसंगी आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजयाताई रहाटकर म्हणाल्या की, “आद्य प्रवर्तक आचार्य भिक्षुंपासून ते आजचे अनुशास्ता आचार्यश्री महाश्रमणजीपर्यंतची तेरापंथाची गौरवशाली परंपरा आहे. तेरापंथाने सदैव नैतिकता, सद्भावना आणि समाजोत्थानाच्या मूल्यांना प्रोत्साहन दिले आहे. हा पुरस्कार मला महिलांच्या हितासाठी कार्य करण्याच्या माझ्या संकल्पाला आणखी बळकटी देणारा आहे. समाजातील एखाद्या गरीब मातेस डोळ्यांत आशेचा किरण दिसतो, तेव्हा तोही माझ्यासाठी एक पुरस्कारच असतो. एखादी मुलगी म्हणते की—‘मॅडम, तुमच्यामुळे मला न्याय मिळाला’—तेव्हा तीच माझी सर्वात मोठी उपलब्धी असते. आजचा हा सन्मान ह्या भावनिक प्रवासाचे मूर्त रूप आहे. हा फक्त पुरस्कार नाही, तर माझ्या कार्याला अधिक व्यापक करण्याची प्रेरणा आहे. समाज आणि सरकारी संस्था यांचा समन्वयच परिवर्तन घडवतो. सरकार धोरणे बनवते आणि समाज ती आचरणात आणतो, तेव्हाच परिणाम टिकाऊ होतो.”
यापूर्वी या पुरस्काराने डॉ. पूर्णिमा आडवाणी, सुश्री किरण बेदी, श्रीमती सावित्री जिंदल, श्रीमती नीलिमा खेता, श्रीमती अनुराधा कोईराला, श्रीमती मृदुला सिन्हा, श्रीमती सुमित्रा महाजन, श्रीमती रेखा शर्मा या कर्तृत्ववान महिलांना गौरविण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App