विशेष प्रतिनिधी
बीड : Pankaja Munde बीडमध्ये देखील रेल्वे सेवा सुरू व्हावी या मागणीला यश आले असून गेल्या अनेक दशकांपासूनचे बीडकरांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आजपासून बीड ते अहिल्यानगर मार्गावर बीडमधून पहिली रेल्वे धावण्यास सुरू झाली आहे. याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवार तसेच मंत्री पंकजा मुंडे व खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली.Pankaja Munde
कष्टाळू आणि कर्तृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे ही रेल्वे सुरू होत आहे, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांनी केलेल्या कामाची देखील आठवण काढत बजरंग सोनवणे यांना टोला लगावला आहे. बजरंग सोनवणे यांचे ‘दबंग खासदार’ असे बॅनर त्यांच्या समर्थकांकडून दाखवण्यात येत होते. ते बघून पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे या दबंग खासदार होत्या, त्यांनी दिलेल्या योगदानामुळे रेल्वे आली असल्याचे त्यांनी म्हटले.Pankaja Munde
गोपीनाथ मुंडेंची आठवण सांगताना पंकजा मुंडे भावुक
पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढत त्यांनी केलेल्या कामाची आठवण करून दिली. त्या म्हणाल्या, या रेल्वेसाठी कोणाचे योगदान किती हे सगळ्यांना माहीत आहे. मी श्रेयाच्या विषयात जाणार नाही. मी अखेरच्या श्वासापर्यंत या जिल्ह्याची पालक म्हणून भूमिका बजावणार आहे. केशर काकू क्षीरसागर यांच्यापासून ते बजरंग बप्पा सोनवणे यांच्या पर्यंत मनापासून या रेल्वेसाठी सर्वांची भूमिका महत्त्वाची आहे. या रेल्वेसाठी प्रीतम मुंडे यांची भूमिकाही महत्त्वाची राहिली आहे. गोपीनाथराव मुंडे यांनी आर्थिक उन्नतीसाठी रेल्वे महत्त्वाची असल्याचे मला सांगितले, मुंडे साहेबांच्या काळात विरोधी पक्षाचे खासदार असताना सर्वाधिक 450 कोटींचा निधी आला होता. या रेल्वेला अखेर स्वरूप मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. या प्रसंगी गोपीनाथ मुंडेंची आठवण येते, असे म्हणत पंकजा मुंडे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
बीड जिल्ह्याने आपला स्वाभिमान कधी गहाण टाकला नाही
पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, पंतप्रधान मोदींनी 2292 कोटी निधी या रेल्वेला एका झटक्यात दिला. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, पियुष गोयल, रावसाहेब दानवे यांनी या रेल्वेसाठी मदत केली. देवेंद्रजींचे या रेल्वेसाठी मी कोटी कोटी आभार मानते. बीड जिल्ह्याने आपला स्वाभिमान कधी गहाण टाकला नाही, आजचा सुवर्णयोग असल्याचे मुंडे म्हणाल्या. तसेच अजित पवारांना उद्देशून बोलताना त्या म्हणाल्या, दादा तुम्ही आम्हाला बारामतीपेक्षा जास्त म्हणणार नाही पण तेवढीच आर्थिक मदत द्या. नितीन गडकरींनी आम्हाला 10 हजार कोटींचे राष्ट्रीय महामार्ग दिले असेही पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. तसेच आज सगळ्यांनी नगरपर्यंत जावे. श्रेयवादाने या रेल्वेकडे पाहू नका. गोपीनाथ मुंडे का ये सपना पुरा करूंगा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, अशी आठवण देखील मुंडे यांनी यावेळी बोलताना करून दिली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App