विशेष प्रतिनिधी
नाशिक : Sharad Pawar राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वाद सुरू आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर जारी केला. मात्र, याला ओबीसी संघटनांचा तीव्र विरोध आहे. यामुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल, असा दावा ओबीसी संघटनांकडून करण्यात येत आहे. आता या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने एका जातीची समिती न करता, सर्वसमावेशक समिती तयार करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. “सरकार कोणत्याही एका जाती-धर्माचे नाही, ते सर्वांचे असायला हवे,” असेही शरद पवार म्हणालेत.Sharad Pawar
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याची तयारी दर्शवली, ज्याला ओबीसी समाजाने तीव्र विरोध केला आहे. या जीआरच्या वैधतेबद्दल विचारले असता, शरद पवार म्हणाले की, “एक समिती एका मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, तर दुसरी दुसऱ्याच्या अध्यक्षतेखाली आहे. सरकारने असे करणे योग्य नाही. सरकार कुठल्याही जातीधर्माचे नाही, सरकार सर्वांचे असावे, सरकार व्यापक असावे. कोणतीही कमिटी एका जातीची करू नका, समाजाची करा. माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की सामाजिक ऐक्य हवे, त्यात अंतर नको, असा सल्लाही शरद पवार यांनी सरकारला दिला आहे.Sharad Pawar
जरांगेंना पाठिंब्याच्या आरोपावर स्पष्टीकरण
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी शरद पवारांचा पाठिंबा असल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांवरही शरद पवारांनी स्पष्टीकरण दिले. “ज्याचा आमच्याशी कवडीचाही संबंध नाही, त्यावर बोलण्याची गरज नाही. हे आरोप सत्यावर आधारित नाहीत,” असे म्हणत त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.
भुजबळांच्या मराठा नेत्यांवरील वक्तव्यावर प्रतिक्रिया
ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी काही लोकांच्या दादागिरीमुळे मराठा नेते बोलायला तयार नाहीत असे वक्तव्य केले होते. त्यावरही शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एका जातीचे राजकारण आम्हाला शोभत नाही. अंतर वाढेल असे भाष्य करणे योग्य नाही. सामाजिक ऐक्य हवे. आम्हाला व्यापक दृष्टीकोन पाहिजे.” असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
भारत-पाक सामन्यावर प्रतिक्रिया
याशिवाय, शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या मणिपूर दौऱ्याचे स्वागत केले आहे. मोदींनी मणिपूरला जावं अशी मागणी होत होती. त्यामुळे ते तिकडे गेले ते चांगले झाले, असे ते म्हणाले. तर आज दुबईत भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेकडून तीव्र विरोध केला जात आहे. याबाबत शरद पवार यांना विचारले असता, भारत-पाकिस्तान सामन्यासारख्या “एक दिवसाच्या प्रश्नावर” अधिक चर्चा करण्याची गरज नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सामाजिक ऐक्याची वीण उसवण्याचे चित्र
दरम्यान, नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले, इथल्या सामाजिक ऐक्याची वीण उसवते की काय असे चित्र दिसतंय. माझ्या मते हे एक प्रकारचे आव्हान आहे. काय वाटेल ती किंमत द्यायची असेल ती किंमत देऊ पण महाराष्ट्र एकसंघ कसा राहील. महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र कसे ठेवता येईल आणि महाराष्ट्राचा लौकिक जो चव्हाण साहेबांनी, जो दादासाहेब गायकवाड यांनी आणि त्यासारख्या अनेकांनी जो घालून दिलेला होता तो पुढे नेण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याच्यासाठी तुमची माझी सगळ्यांची सिद्धता असली पाहिजे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App