विशेष प्रतिनिधी
मुंबई : Maharashtra Municipal Election राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले असून, ती २०११ च्या जनगणनेच्या आधारावर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात २०१७ मध्ये अस्तित्वात असलेल्या प्रभाग रचनेनुसारच नव्याने काही किरकोळ बदल करून ती रचना पुन्हा लागू होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही प्रक्रिया सुरु केली असून, या प्रभाग रचनेवर आधारित निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे.Maharashtra Municipal Election
पूर्वी महाविकास आघाडी सरकारने चार सदस्यीय प्रभाग रचना रद्द करून तीन सदस्यीय रचना लागू केली होती. मात्र ओबीसी आरक्षणासह काही मुद्द्यांवर न्यायालयीन स्थगिती आली होती. आता ती स्थगिती हटवून चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने नव्या प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरु केली आहे.
नाशिक महापालिकेसाठीही याच प्रक्रियेनुसार प्रभाग रचना करण्यात येणार असून, ३१ प्रभागातून एकूण १२२ नगरसेवक निवडले जाणार आहेत. ही संख्या २०११ च्या जनगणनेवर आधारित असून, सध्याची लोकसंख्या आणि वाढलेले मतदार लक्षात घेतल्यास एका प्रभागात ५० हजारांपर्यंत मतदार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक अधिक व्यापक आणि स्पर्धात्मक होणार आहे.
आरक्षणाच्या बाबतीत अनुसूचित जाती व जमातींसाठी आरक्षण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने दिले जाईल, तर ओबीसी आणि महिलांचे आरक्षण चक्रानुसार नव्याने निश्चित करण्यात येईल. मतदार याद्यांमध्ये प्रभागनिहाय फेरबदल करण्यात येणार असून, त्यासाठी पूर्वीच्या निवडणुकीतील अंतिम यादीचा आधार घेतला जाईल.
ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन महिने लागणार असून, पावसाळ्यानंतर म्हणजेच दिवाळीनंतर निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App