विशेष प्रतिनिधी
सांगली : Gopichand Padalkar हिंदू मुस्लिम भाई भाई असे म्हटले जाते; मग जम्मू-काश्मीरमध्ये धर्म विचारून का फक्त हिंदू लोकांवर गोळ्या घातल्या गेल्या? असा सवाल करत सर्वधर्मसमभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी आहे. यातून हिंदूंनी आधी बाहेर पडायला हवे, असे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणालेत. सर्वधर्मसमभाव पाळण्याची जबाबदारी फक्त हिंदूंची आहे का? असा सवालही त्यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना उपस्थित केला. तसेच सांगली जिल्ह्यातील मुघलांच्या खुणा असलेल्या काही गावांची नावे बदलण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले.Gopichand Padalkar
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी भयंकर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांसह 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या. या घटनेवर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील या घटनेवरून संतप्त प्रतिक्रिया देत सर्वधर्मसमभाव फक्त हिंदूंनी बघायचा मग बाकीच्यांनी का बघायचा नाही? असा सवाल केला आहे. खानापूर शहरातील महादेव मंदिरातील विटंबना झालेल्या नंदीच्या मूर्तीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाकडून आज महादेव मंदिरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते आरती संपन्न झाली. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
नेमके काय म्हणाले गोपीचंद पडळकर?
पूर्वीच्या लोकांनी षडयंत्र केले. हिंदी-चिनी भाई भाई, हिंदू-मुस्लिम भाई भाई. मग भाई भाई असताना काश्मीरमध्ये हा प्रकार का घडला? हिंदू मुस्लिम भाई भाई आहेत तर तुम्ही धर्म विचारून का आमच्या भावांना गोळ्या घातल्या? काही लोकांनी कलमा पढल्यानंतर सुद्धा त्यांचे कपडे उतरवून बघितले. त्यानंतर गोळ्या घालण्यात आल्या हा काय प्रकार आहे? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला. सर्वधर्मसमभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी आहे. यातून पहिल्यांदा हिंदूंनी बाहेर पडावे. हे फक्त हिंदूंसाठीच लागू होत नाही, असेही ते म्हणाले. सर्वधर्मसमभाव फक्त हिंदूंनी बघायचा मग बाकीच्यांनी का बघायचा नाही? काश्मीरमधल्या पंडितांना कोणी घालवले? तिथे काय पाकिस्तानचे मुसलमान आले होते का? त्यांच्या गल्लीत राहणाऱ्या लोकांनीच त्यांना घालवले. तिथे कोणी पाकिस्तानी माणूस आला नव्हता, असे पडळकर यांनी म्हटले.
मुघलांच्या खुणा असलेल्या गावांची नावे बदलण्याची मागणी
महादेव मंदिरातील विटंबना झालेल्या नंदीच्या मूर्तीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलताना या कृत्यामागे जो कुणी आहे? त्याला पोलीस विभाग अटक करेल आणि शिक्षा देईल, असे पडळकरांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत आहे की, खानापूर शहराचे नाव भवानीपूर करावे, सुलतानगादे या गावाचे देखील नाव बदलावे, जत तालुक्यातील उमदी गावाचे नाव देखील बदलावे. मुघलांच्या खुणा जिथे असतील, त्या पुसण्याच्या दृष्टिकोनातून जे काही पूर्वीचे नाव आहेत, ती पूर्वीचे नाव देण्यात यावी, अशी मागणी मी करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या सगळ्या बाबींचा विचार करून नक्की निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App