नाशिक : नागपूरच्या हिंदूंच्या घरावर पेट्रोल बॉम्बचे गोळे; फडणवीस केव्हा आवरणार अस्तनीतले निखारे??, असे विचारायची वेळ नागपूरमध्ये औरंगजेब प्रेमींनी दंगल घडवून आणल्यानंतर आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या दंगलीबाबत विधानसभेत निवेदन केले. त्यावेळी त्यांनी दंगलीची सगळी भयानकता वर्णन केली संबंधित दंगल कशी पूर्वनियोजित होती तिथे पेट्रोल बॉम्ब, ट्रॉली भरून दगड, लाठ्या काठ्या तलवारी कुऱ्हाडी कसे आणले गेले, शेकडोंचा जमाव तिथे कसा जमवला गेला, याची तपशीलवार माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली. त्याचवेळी त्यांनी पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर मध्ये पाठवून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घ्यायला लावली. बावनकुळे यांनी त्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. तो संवाद बुळबुळीत असल्याचा निष्कर्ष हिंदुत्ववादी पत्रकारांनी काढला.Devendra fadnavis and BJP must contain Ajit Pawar NCP in time
पण त्यापलीकडे जाऊन आज दिवसभरात नागपूर दंगली संदर्भात विधिमंडळ परिसरात आणि विधानसभेत जे घडले, ते बारकाईने पाहिले, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अतिशय आक्रमकपणे देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने उभे राहिल्याचे दिसले. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या निवेदनावर बोलताना त्यांनी कुठलीही काँग्रेसी टाईपची सरकारी भाषा वापरली नाही, तर त्यांच्यातला जुना शिवसैनिक उफाळून आल्यासारखीच आक्रमक भाषा वापरली. फडणवीस यांनी केलेल्या निवेदनात सरकारी भाषा होती. त्यात आकडेवारी होती. दंगलखोरांना इशाराही होता, पण त्यामध्ये नेहमीप्रमाणे फडणवीशी आक्रमकपणा बिलकुल नव्हता. त्या उलट एकनाथ शिंदे जुन्या शिवसैनिकाच्या तडफेने बोलले. त्यांनी विरोधकांचा सगळा नॅरेटिव्ह पूर्ण उद्ध्वस्त करून टाकला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केली होती त्यावर फडणवीस यांनी काही उत्तर दिले नव्हते, पण एकनाथ शिंदे यांनी सपकाळ यांचे पूर्ण वाफाडे काढले आणि ते विधानसभेच्या रेकॉर्डवर आणले त्यामुळे काँग्रेसची पुरती गोची झाली. नाना पटोले यांना बॅकफूट वर जावे लागले. हे कुठल्या भाजपच्या नेत्याने केले नाही तर एकनाथ शिंदे यांनी केले.
विधानसभेच्या बाहेर नेहमीप्रमाणे नितेश राणे यांनी किल्ला लढवला. शिंदे आणि राणेंनी यांच्या खेरीज दुसरा कुठला भाजप नेता फडणवीसांच्या बाजूने ठामपणे उभे राहिल्याचे चित्र दिसले नाही.
पण त्यापलीकडे जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेच्या वळसणीला आणून बसवलेले अस्तनीतले निखारे मात्र चांगलेच फुललेले दिसले. काल अर्थसंकल्प विषयक चर्चेला आक्रमक प्रत्युत्तर देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आज विधानसभेकडे फिरकलेच नव्हते. त्यासाठी त्यांच्या घरच्या विषयाचा काही संबंध असेल, तर तो भाग अलहिदा. पण त्यांच्या पक्षातल्या कुठल्याच नेत्याने देवेंद्र फडणवीस यांची ठामपणे बाजू उचलून धरलेली दिसली नाही. उलट अजितदादांच्या पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी फडणवीस सरकारलाच दंगली वरून घेरले. कोरटकर आणि सोलापूरकर शिवाजी महाराजांचा अपमान करताना हे दंगलखोर कुठे गेले होते??, असा सवाल मिटकरी यांनी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांना उद्देशून केला. वास्तविक विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांचे आंदोलन सकाळी संपून गेले होते. नागपूरची दंगल संध्याकाळी झाली. पण त्याविषयी मिटकरी बोलले नाहीत त्यांनी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्याच दिशेने आपले वाग्बाण सोडले.
भाजपला महाराष्ट्रात “मणिपूर” घडवायचे आहे म्हणून भाजपने नागपूरची दंगल घडवली असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आदित्य ठाकरे यांच्याच वक्तव्याला अप्रत्यक्षपणे मिटकरी यांनी दुजोरा दिला भाजपच्या सत्तेच्या वळचणीला बसून मिटकरी यांनी भाजपवर आरोपांची पिचकारी मारली. खरंतर नागपूर प्रकरणावरून धडा घेऊन देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या वर बसलेल्या बॉसने या अस्तनी मधल्या निखाऱ्यांना वेळीच विझवून टाकले पाहिजे. अन्यथा हेच निखारे भाजपच्या खऱ्या अडचणीच्या वेळी त्या पक्षाला अडचणीत आणल्याशिवाय राहणार नाहीत. हे अस्तनीतले निखारे स्वतःच्या काकाचे झाले नाहीत ते भाजपचे काय होतील हे फडणवीस आणि त्यांच्या बॉसने वेळीच ओळखले पाहिजे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App