टोयोटा किर्लोस्कर मोटारच्या या ऐतिहासिक गुंतवणुकीने महाराष्ट्रासाठी नव्या पर्वाचा शुभारंभ झाला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र सरकार आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. यांच्यातील सामंजस्य कराराच्या स्वाक्षरी समारंभात आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis)यांची उपस्थिती होती . टोयोटा किर्लोस्कर मोटारच्या या ऐतिहासिक गुंतवणुकीने महाराष्ट्रासाठी नव्या पर्वाचा शुभारंभ झाला आहे.
याप्रसंगी फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्र सरकार आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर यांच्यात सामंजस्य करार होणे, हा महाराष्ट्राच्या रोजगारकेंद्री विकासाच्या दृष्टीने महत्वाचा क्षण आहे. जगातील सर्वात मोठा ब्रँड टोयोटा किर्लोस्कर मोटरचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मसाकाझू योशिमुरा सान आणि उपाध्यक्षा मानसी टाटा यांनी या ऐतिहासिक गुंतवणुकीसाठी छत्रपती संभाजीनगरची निवड केली ही महाराष्ट्रासाठी आनंदाची बाब आहे.’
याशिवाय, ‘ऑटोमोबाईल क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच एक प्रमुख राज्य राहिले आहे. यात टोयोटाचे आगमन महाराष्ट्राच्या ऑटोमोटिव्ह उद्योगात एका नवीन युगाचे सूचक आहे. सुमारे 8,000 प्रत्यक्ष तर 12,000 अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण करण्याच्या क्षमतेसह या प्रकल्पात 20,000 कोटींपर्यंत गुंतवणूक प्रस्तावित आहे. हा प्रकल्प भारताच्या इलेक्ट्रिक कार उत्पादन उद्योगात क्रांती घडवून आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल हा विश्वास आहे. AURIC येथे 850 एकरमध्ये पसरलेल्या अल्ट्रा मेगा प्रोजेक्टसह छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याच्या अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी सज्ज झाले आहे.’ असंही फडणवीसांनी सांगितलं.
नागपूर-मुंबई (कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे) समृद्धी एक्स्प्रेस वे आणि डीएमआयसी इंडस्ट्रियल पार्क यासारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासह, महाराष्ट्र मोठ्या गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी समर्थ आहे. यासोबतच जेएनपीटीपेक्षा 3 पटीने मोठ्या असलेल्या वाढवण बंदराचा विकास, जालना येथील ड्राय पोर्टमुळे छत्रपती संभाजीनगरशी वाढलेली कनेक्टिव्हिटी तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे महाराष्ट्राची लॉजिस्टिक क्षमता वाढत आहे, ज्याचा या प्रकल्पाला फायदा होईल.
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेने नुकताच अर्धा ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. आता महाराष्ट्राला भारताची पहिली ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचा आमचा निर्धार आहे. उत्पादन, फिनटेक, तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिकमध्ये उत्तम होत असल्याने महाराष्ट्र भारतीय उद्योगांमध्ये एक पॉवर हाऊस बनले आहे. हा सामंजस्य करार महाराष्ट्राला ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App