विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड तेलंगणा आणि मिझोरामच्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार ऐन भरात आला असताना राजधानी नवी दिल्लीत पडद्यामागच्या हालचाली जोरात सुरू असून काँग्रेस प्रणित INDI आघाडीची पुरती ऐशीतैशी करून प्रादेशिक पक्षांची नवीन स्वतंत्र PDA आघाडी तयार करण्याचे घाटत आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नेते नीतीश कुमार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी यासाठी पुढाकार घेतल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. Akhilesh, Nitish, Mamata preparing for PDA alliance
काहीही करून राहुल गांधींचाच चेहरा काँग्रेस पुढे आणणार असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची परिणामकारकरीत्या टक्कर घेता येणार नाही याची जाणीव झाल्यामुळेच अखिलेश, नितीश आणि ममता यांनी स्वतंत्रपणे वाटचाल करण्याचा निर्णय घेऊन PDA अर्थात पिछडा, दलित आणि आदिवासी अशी आघाडी तयार करण्याचा निर्णय घेतल्याची राजधानी चर्चा आहे.
पण त्या पलीकडे जाऊन यातले एक राजकीय इंगित देखील समोर येत आहे, ते म्हणजे मूळातच काँग्रेसला विशेषता गांधी परिवाराला निवडणुकीच्या राजकारणातून पूर्णपणे उखडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्वतंत्र डील करून हे नेते INDI आघाडीत फूट पाडून त्या अंतर्गत किंवा त्या बाहेर PDA अर्थात पिछडा, दलित, आदिवासी अशी आघाडी तयार करण्याच्या बेतात असल्याचे समजते.
भाजप – अखिलेश डील
अखिलेश यादव यांना आपले पिता मुलायम सिंह यादव यांचे स्मारक बांधायचे आहे. सैफई मध्ये त्यांच्या नावाने एक डिफेन्स कॉलेज काढायचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारचे सहकार्य लागेल. त्यामुळे अखिलेश यादव मोदींना परोक्षपणे काँग्रेस विरोधात मदत करायला तयार झाल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान मोदींनी सैफाईतील डिफेन्स कॉलेजला स्वीकृती दिल्याची चर्चा आहे. त्या कॉलेजचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होऊन मुलायम सिंह यांचे कायमस्वरूपी स्मारक बनेल आणि अखिलेश यादव हे उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये बडा विरोधी पक्षनेता म्हणून स्थिर राहू शकतील. काँग्रेसचा त्यांच्या समोर असलेल्या धोका टळेल. हे भाजप आणि अखिलेश यांच्यातले “डील” असल्याचे राजधानीत बोलले जात आहे.
काँग्रेस पासून नितीश कुमारांचे अंतर
जातनिहाय जनगणनेचा प्रादेशिक पक्षांचा मुद्दा राहुल गांधींनी आपल्या बाजूने वळवून घेतला. तो काँग्रेसचा मुद्दा बनवल्यावर प्रादेशिक पक्षांचा राजकीय मुद्दा हातचा गेला. त्यामुळेच नितेश कुमार यांनी चतुराईने बिहारमध्ये विविध प्रकारचे आरक्षण वाढवून ते 65 टक्क्यांपर्यंत नेऊन ठेवले. त्यासाठी जात सर्वेक्षण केले. आता त्याचा लाभ फक्त आपल्याच पक्षाला व्हावा, या इराद्यापोटी नीतीश कुमार देखील काँग्रेसला छुपा विरोध करत आहेत. बिहार उत्तर प्रदेशच्या राजकारणात काँग्रेस नगण्य झाली असताना तिला पुनरुज्जीवन मिळणे हे अखिलेश यादव आणि नितीश कुमार यांच्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळेच या दोन्ही नेत्यांनी काँग्रेस पासून स्वतःचे अंतर वाढविले आहे. INDI आघाडीचा फायदा तसाही काँग्रेसलाच होणार आहे, मग आपल्याला त्यातून काय लाभ??, असा रास्त विचार त्यांनी केला आहे आणि म्हणूनच काँग्रेस पासून फटकून राहत स्वतंत्र PDA अर्थात पिछडा, दलित आणि आदिवासी आघाडी काढण्याचे त्यांनी ठरविले आहे.
ममतांची केस वेगळी
ममता बॅनर्जींची केस यात थोडी वेगळी आहे. ममता बॅनर्जींचे तीन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आत मध्ये आहेत आणि अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुचिरा बॅनर्जी तुरुंगाच्या वाटेवर आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या तुरुंगवारीचा नंबर डिसेंबर 2023 पर्यंत लागणार असल्याची माहिती आहे.
या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी या धोक्याच्या कक्षेत येऊ इच्छित नाहीत. आपण मोदीं विरोधात किती आवाज वाढवला तरी विशिष्ट मर्यादेपलिकडे तो परिणामकारक ठरत नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यापेक्षा मोदींशी स्वतंत्रपणे काही “डील” करून काँग्रेसला रोखता आले तर पाहावे हा विचार ममता बॅनर्जी यांनी केल्याचे समजते.
पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर शरद पवारांचा देखील या PDA आघाडीला पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. पण त्यांचे कुठलेच राजकारण विश्वासार्ह नसल्याने काँग्रेस सह वर उल्लेख केलेले तिन्ही नेते पवारांच्या भूमिकेविषयी साशंक आहेत, पण तरी देखील INDI आघाडीचा PDA लक्षात घेऊन स्वतंत्रपणे PDA आघाडी स्थापन करून त्यातच आपला खरा राजकीय लाभ आहे हे याने त्यांनी ओळखून पुढची वाटचाल सुरू केल्याचे निश्चित बोलले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App