गुरुने दिला *** वसा, आम्ही नाकारू हा पुढे वारसा!! हे शीर्षक “गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा!!,” या गीतावर आधारित आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण यातल्या गुरुने दिलेला “हा” वसा मात्र ज्ञानरूपी बिलकुलच नाही, त्यामुळेच तो नाकारण्याची वेळ शिष्यावर आल्याचे दिसते!! Ajit pawar’s letter again exposes sharad pawar’s trust deficit politics in maharashtra
महाराष्ट्राच्या शिंदे – फडणवीस सरकार मधले दुसऱ्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारमध्ये प्रवेश करून आज 100 दिवस पूर्ण झाले. त्यानिमित्ताने त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणार असल्याची ग्वाही दिली आहे, पण त्याच वेळी या पत्राचे वैशिष्ट्य असे की त्यांनी स्वतःला प्रादेशिक राष्ट्रवादी काँग्रेसचे “राष्ट्रीय” अध्यक्ष असे संबोधून घेताना राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे नाव मात्र या पत्रामध्ये लिहिलेले नाही. जणू काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेमका कोणी स्थापन केला??, याविषयी महाराष्ट्राच्या जनतेला काही माहितीच नाही, असे अजित दादांना या पत्रातून सूचित करायचे किंवा कसे हे माहिती नाही, पण अजितदादांनी पत्रात शरद पवारांचे नाव घेतलेले नाही ही मात्र वस्तुस्थिती आहे.
बाकी शरद पवारांच्या राजकीय पूर्वसूरींचा म्हणजे यशवंतराव चव्हाण यांचा वारसा आपणच चालवणार असल्याचा निर्वाळा अजितदादांनी या पत्रातून दिला आहे.
मग शरद पवारांचे नाव न घेऊन अजितदादांनी त्यांचा नेमका कोणता वारसा नाकारला??, हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.
अजित पवारांनी 1991 पासून ते 1 जुलै 2023 पर्यंत तब्बल 32 वर्षे शरद पवारांच्याच नेतृत्वाखाली आधी काँग्रेसचे आणि 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण केले. अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीतली सुरुवातीची काही वर्षे म्हणजे, सुप्रिया सुळे यांच्या राजकीय एन्ट्री पर्यंत स्वतः अजितदादाच शरद पवारांचे राजकीय वारस म्हणून ओळखले गेले. सुप्रिया सुळे यांच्या एंट्री नंतर मात्र हा वारसा विभागला आणि आता तर शरद पवारांचा संपूर्ण राजकीय वारसा हा सुप्रिया सुळे यांच्याकडे गेल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती सरकारमध्ये सामील होऊन, आज १०० दिवस पूर्ण झाले आहेत. यानिमित्तानं आपल्या सर्वांशी साधलेला हा पत्रसंवाद.#वसाविकासाचा_विचारबहुजनांचा pic.twitter.com/cdzpoI6dGr — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 10, 2023
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती सरकारमध्ये सामील होऊन, आज १०० दिवस पूर्ण झाले आहेत. यानिमित्तानं आपल्या सर्वांशी साधलेला हा पत्रसंवाद.#वसाविकासाचा_विचारबहुजनांचा pic.twitter.com/cdzpoI6dGr
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 10, 2023
याचा अर्थ शरद पवारांचा नेमका कोणता वारसा अजित पवारांनी नाकारला??, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. वास्तविक शरद पवारांच्या नावावर निवडून आलेले बहुसंख्य आमदार, बहुसंख्य पदाधिकारी आपल्या बाजूने असल्याचा दावा अजित पवारांनी निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टातही केला आहे आणि तरीही शरद पवारांचे नाव मात्र त्यांनी पत्रात लिहिलेले नाही याचा नेमका अर्थ काय समजायचा?? पवारांचा ते नेमका कोणता वारसा नाकारत आहेत??, याचा थोडा बारकाईने आढावा घेतला किंवा या पत्रातले थोडे “बिटवीन द लाईन्स” वाचले, तर एक बाब लक्षात येईल, ती म्हणजे अजितदादांना शरद पवारांच्या अविश्वासार्हतेच्या राजकारणाचा वारसा नको आहे. याचा अर्थ शरद पवारांची राजकीय विश्वासार्हता किती तकलादू आहे, हेच त्यांनी पवारांचे पत्रात न लिहिता दाखवून दिले आहे.
शिंदे – फडणवीस सरकार मध्ये प्रवेश केल्यानंतर 2023 रोजी केलेल्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनातल्या पहिल्या भाषणात त्यांनी शरद पवारांचे सर्व राजकारण एक्सपोज केले होते. वसंतदादा पाटील, सोनिया गांधी यांच्यापासून ते मोदी – शाहांशी “डील” करताना पवारांनी राजकीय विश्वासार्हता कशी जपली नाही, याचे उदाहरणांसह दाखले अजितदादांनी दिले होते आणि त्याचवेळी ते म्हणाले होते, इथून पुढच्या राजकारणात असे अविश्वासार्ह राजकारण करून चालणार नाही. एखाद्याला शब्द दिला, तर तो पाळावाच लागेल आणि शब्द देतानाच आपण तो जपून दिला पाहिजे, हेही अजित पवार बोलले होते.
अजितदादांनी आज लिहिलेल्या पत्रात नेमकी हीच बाब अधोरेखित केली आहे. आपण जे बोलतो, ते करतो. आपल्या शब्दावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, तो विश्वास आपण जपतो हे त्यांनी अधोरेखित करून सांगितले आहे. अविश्वासार्ह राजकारण आणि विश्वासार्ह राजकारण हा शरद पवार आणि अजित पवार यांच्यातला सर्वात मोठा भेद हे अजितदादांच्या पत्रामध्ये सर्वांत मोठे “बिटवीन द लाईन्स” आहे.
त्यामुळेच भले अजितदादांचे सुरुवातीचे राजकीय गुरू शरद पवार हे असतीलही, पण आता मात्र अजितदादांच्या राजकारणात शरद पवारांचे गुरू म्हणंन ते स्थान उरलेले नाही, हेच अजितदादांनी पत्रात शरद पवारांचे नाव न लिहून दाखवून दिले आहे… आणि म्हणूनच वर शीर्षकामध्ये, गुरुने दिला ** वसा आम्ही नाकारू हा पुढे वारसा!!, असे नमूद केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App