काँग्रेस सोडणाऱ्या नेत्यांची काँग्रेस पक्षाच्या नावाचा परिघ भेदण्याची हिंमत का होत नाही?


 

काँग्रेसच्या महावृक्षावर कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी नवे कलम लावत पंजाब लोक काँग्रेसची स्थापना केली आहे. पक्षाची स्थापना करताना त्यांनी काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेवर ठळक प्रश्नचिन्ह लावले आहे. कॅप्टन साहेबांनी नाराज होऊन काँग्रेस सोडणे यात काही विशेष घङलेले नाही. असे अनेक नेत्यांच्या बाबतीत पूर्वी अनेकदा झाले आहे. Why don’t the leaders who are leaving the Congress dare to cross the perimeter of the name of the Congress party?

अगदी काँग्रेसचा गेल्या 50 वर्षांचा इतिहास पाहिला तर किमान सात ते आठ वेळा काँग्रेस फुटली आहे. त्या पक्षाच्या महावृक्षावर वेगवेगळी कलमे लावण्यात आली आहेत. पण मूळ काँग्रेसचा महावृक्ष फारसा वठलेला दिसत नाही. पण या सगळ्या काँग्रेसच्या फूटींचे वैशिष्ट्य असे की फुटणारे सर्व काँग्रेस नेते स्वाभिमान तर जरूर दाखवतात पण काँग्रेस पक्षाच्या नावाचा परिघ भेदण्याची हिंमत दाखवू शकत नाहीत. 50 वर्षांच्या काँग्रेसच्या इतिहासात बाबू जगजीवन राम ते कॅप्टन अमरिंदरसिंग बर्‍याच मोठ्या नेत्यांची मांदियाळी आहे. यात शरद पवार आहेत. ममता बॅनर्जी आहेत. अगदी वाय एस आर जगनमोहन रेड्डी देखील आहेत. पण एकाही नेत्याची राजकीय हिंमत आपल्या नव्या पक्षाच्या नावातून काँग्रेस हा शब्द काढण्याची झालेली दिसत नाही. याचे कारण सांगण्यासाठी फार मोठ्या रॉकेट सायन्सचा अभ्यास करण्याची गरज नाही. काँग्रेसची मते कापून आपल्या पक्षाचे भरणपोषण करण्याचाच या सर्व नेत्यांचा हेतू राहिला आहे.



यात काही नेते यशस्वी झाले, तर काही अयशस्वी पण यशस्वी नेत्यांचे देखील यश काँग्रेस नावा पलिकडे जाऊन मिळवता आले आहे, असे मानता येत नाही किंबहुना वर उल्लेख केलेल्या कोणत्याही नेत्याची तशी राजकीय हिंमत देखील झालेली नाही. आपल्या पक्षाच्या नावातून काँग्रेस हा शब्द बघायला तर आपल्या वैयक्तिक राजकीय वलयाच्या आधारे आपल्या पक्षाला काही मते मिळू शकतील, असा आत्मविश्वास या नेत्यांना दाखविता आलेला नाही. म्हणून मग आपल्या तथाकथित स्वाभिमानाच्या निर्णयाचे समर्थन करताना हे नेते स्वत:च्या काँग्रेस कुळाचे समर्थन करतात. पण ते समर्थन लटकेच राहते.

काँग्रेस तर इंदिरा गांधींनी सुद्धा फोडली होती. 1969 मध्ये मूळ पक्षातून त्या बाजूला झाल्या होत्या. पण त्यांचे राजकीय कर्तृत्व एवढे मोठे की मूळ काँग्रेस बाजूला पडून इंदिरा काँग्रेस नावाचा पक्ष संपूर्ण देशव्यापी सशक्त बनला. त्या दर्जाचे राजकीय कर्तृत्व मूळ काँग्रेसमधून बाहेर पडून काँग्रेसच्याच नावाखाली मते मागणाऱ्या एकाही नेत्याला दाखविता आलेले नाही किंबहुना ममता बॅनर्जी आणि वायएसआर काँग्रेसच्या जगन मोहन रेड्डी यांच्या खेरीज बाकी कोणत्याही नेत्याला स्वतःच्या राज्यात स्वबळावर बहुमत देखील मिळवता आलेले नाही.

काँग्रेसच्या नावाच्या परिघाबाहेर पडून या तथाकथित स्वाभिमानी नेत्यांना आपल्या नावाने फारशी राजकीय चमक दाखवता आलेली नाही. ही त्यांना कितीही कटू वाटली तरी राजकीय वस्तुस्थिती आहे.

पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग जेव्हा वयाच्या 79 व्या वर्षी स्वतंत्र पक्ष काढून वाटचाल करू पाहतात तेव्हा त्यांचा हेतू काँग्रेसची मते कापणे याखेरीज दुसरा कोणताही नसतो आणि म्हणूनच त्यांची देखील काँग्रेस नावाच्या परिघाबाहेर पडून स्वतःच्या पक्षाचे नामकरण करण्याची राजकीय हिंमत झालेली नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

काँग्रेस या नावामध्ये आजही जनसामान्यांची मते खेचण्याची किंबहुना जनसामान्यांमध्ये आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण करण्याची जबरदस्त क्षमता टिकून आहे. हाच मुद्दा यानिमित्ताने अधोरेखित होतो आहे. काँग्रेस या नावाचा महिमा तिच्या विरोधकांना पुसता आलेला नाही. त्याचबरोबर स्वाभिमान दाखवत त्या पक्षाबाहेर पडलेल्या नेत्यांना देखील आपला राजकीय आधार वाटत राहतो हेही दिसून येते.

Why don’t the leaders who are leaving the Congress dare to cross the perimeter of the name of the Congress party?

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात