शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना संतापून जे उत्तर दिले, त्यामध्ये त्यांनी, भाजपचे “साडेतीन नेते” लवकरच अनिल देशमुखांच्या शेजारच्या कोठडीत असतील, असे विधान केले आहे.Sanjay Raut’s “Three and a Half Leaders” – “Three and a Half Wise” of the Maratha Empire and “Mahashahane” in the Marathi media …
त्यामुळे मराठी प्रसार माध्यमांमधून संजय राऊत यांनी उल्लेख केलेले भाजपचे “साडेतीन नेते” कोण? याची चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा घडवताना अर्थातच संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांची कशी जोरदार खिल्ली उडवली आहे!!, कसे त्यांना टोचले आहे!!, भाजपचे कसे वाभाडे काढले आहेत, वगैरे मसाला लावून मराठी माध्यमांनी चमचमीत वर्णन केले आहे.
परंतु हे वर्णन करताना संजय राऊत यांनी वापरलेल्या “साडेतीन” या शब्दाचा इतिहास नेमकेपणाने स्वतः संजय राऊत हे विसरले आहेत?? की मराठी माध्यमे विसरली आहेत??, हा प्रश्न पडतो आहे. कारण ज्या “साडेतीन” या शब्दाचा संजय राऊत यांनी उल्लेख केला, तो “साडेतीन” शब्द हा पेशवाईतील “साडेतीन शहाणे” यांच्यासाठी गौरव म्हणून वापरला गेला आहे. यातले पहिले तीन शहाणे हे मुत्सद्दी तर होतेच, पण ते हातात तलवार धरणारे योद्धे होते.
त्यामुळे त्यांना “पूर्ण शहाणे” म्हटले जायचे. यामध्ये पेशवाईतील सरदार सखाराम बापू बोकील, नागपूरकर भोसल्यांचे कारभारी देवाजीपंत चोरघडे आणि निजामाचा कारभारी विठ्ठल सुंदर परशरामी यांचा समावेश होता. उरलेले “अर्धे शहाणे” म्हणजे पेशव्यांचे कारभारी नाना फडणवीस होते. नाना फडणवीस हे फक्त मुत्सद्दी होते. तलवार हातात धरून मैदानात उतरणारे योद्धे नव्हते. म्हणून त्यांना “अर्धे शहाणे” म्हटले जायचे…!! या चौघांचाही इतिहास मराठा साम्राज्यात मोलाची भर घालणारा आहे. या सर्वांचा उल्लेख इतिहासात अत्यंत हुशार आणि आपापल्या राज्याचा कारभार खऱ्या अर्थाने चोखपणे पाहणारे म्हणून “शहाणे” असा केला जायचा.
याचा अर्थ “साडेतीन शहाणे” हा शब्द निदान त्या काळी तरी सकारात्मक रीतीने वापरला जायचा. मग संजय राऊत यांना भाजपचे “साडेतीन नेते” म्हणजे “साडेतीन शहाणे” यांच्यासारखा सकारात्मक उल्लेख करायचा आहे का??, हा प्रश्न पडतो. अर्थातच संजय राऊत यांचे भाजपशी सध्याचे असलेले संबंध पाहता तसे त्यांना अजिबात करायचे नसणार हे उघड आहे.
पण मग त्यांनी “साडेतीन नेते” या ऐवजी दुसरा शब्द का वापरला नाही?? किंवा त्यांना भाजपच्या नेत्यांना ठोकूनच काढायचे तर दुसरा कोणताही मराठीतला वाक्प्रचार का उच्चारला नाही??, की त्यांना सुचला नाही? हा प्रश्न पडतो…!! इतर मराठी माध्यमांकडे शब्दांचा दुष्काळ आहे, पण संजय राऊत यांच्याकडे तो निश्चितच नाही. “रोखठोक” मधून वर्षानुवर्षे त्यांनी खरंच आपली शब्द श्रीमंती निश्चित दाखवली आहे!! असो…
अनावधानाने का होईना, पण संजय राऊत यांच्याकडून भाजपच्या नेत्यांचा एक प्रकारे गौरवच झाला आहे. मराठी माध्यमांमध्ये तर “बुद्धीचा सुकाळच” आहे. तिथे, “नाना भले बुद्धीचे सागर”, असे म्हणायची पाळी आली आहे. त्यामुळे “साडेतीन नेते” आणि “साडेतीन शहाणे” यातला साम्य भेद ओळखणेही मराठी माध्यमांमधल्या “महाशहाण्यांना” कठीण आहे…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App