नाथाभाऊ खडसे यांचा महाराष्ट्रातल्या राजकारणाचा अनुभव फार जूना आहे. ते भाजपमध्ये असतानाही सर्वांत ज्येष्ठ नेते होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही त्यांची ज्येष्ठता कमी झालेली नाही. त्यांना राष्ट्रवादीतही ज्येष्ठत्वाचा मान आहे. political similarity among anna joshi, anna dange and eknath khadse
कोणत्याही नेत्याला दुसऱ्या पक्षातून आपल्या पक्षात घेतले की तो नवा पक्ष त्या नेत्याचा मान सन्मान ठेवतच असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाही, का “ओरिजिनल भाजपाईं”ना वगळून भाजपमध्ये नव्याने सामील झालेल्यांना थेट केंद्रीय मंत्रीपदाच्या खुर्चांमध्ये बसवून त्यांचा मानपान केला, तसेच असते ते…!!
एकनाथ खडसे यांना भाजपमधून राष्ट्रवादीत घेताना त्यांचा मान सन्मान टिकविला जाईल. त्यांना कामाची संधी दिली जाईल. भाजपमध्ये राहून त्यांना जसे डावलण्यात आले होते, तसे डावलण्यात येणार नाही. संपूर्ण महाराष्ट्राच्या नाही, तरी निदान उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात खडसेंना विचारले जाईल, असे आश्वासन खडसेंच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या वेळी दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी दिले होते.
आता दस्तुरखुद्द पवारांचे आश्वासन म्हणजे काय, असे तसे आश्वासन आहे काय…?? ते पवारांचे आश्वासन आहे… राष्ट्रवादीत पवारांचा शब्द म्हणजे राम बाण… (तो कुठे घुसतो, हे विचारू नका). त्यामुळे एकनाथ खडसेंनी त्याच्यावर विश्वास ठेवून निर्धास्तपणे राष्ट्रवादीत प्रवेश केला.
पण त्यामुळे ईडीचे शुक्लकाष्ट काही मागचे सुटले नाही. उलट ते वाढले. थेट जावयालाच अटक झाली. आणि ईडीच्या कोठडीचे दरवाजे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांच्यासाठी खुले होण्याच्या बेतात आहेत. राम बाण हा असा असतो. आता पवारांची खूप इच्छा आहे, की एकनाथ खडसे यांचा सन्मान टिकवून त्यांना मोठे पद द्यावे. पण ती ईडीची कोठडी आड येतेय.
पण आजचा मुद्दा जरा वेगळा आहे. तो नाथाभाऊंच्या राजकीय इतिहासाशी संबंधित आहे. मगाशी लिहिल्या प्रमाणे नाथाभाऊ महाराष्ट्राच्या राजकारणात ज्येष्ठ आहेत. भाजपमध्ये तीन – चार पिढ्या त्यांनी पाहिल्या आहेत. त्यांना भाजपमधले दोन अण्णा आठवतात का हो…?? तेच दोन अण्णा… पुण्याचे अण्णा जोशी आणि सांगलीचे अण्णा डांगे. या दोन्ही अण्णांचे आणि नाथाभाऊंचे फार जूने संबंध होते. यापैकी सांगलीचे अण्णा तर शिवसेना – भाजप युतीच्या पहिल्या मनोहर जोशी सरकारमध्ये मंत्री होते. खडसेंचे सहकारी होते. त्यापूर्वीच्या विधानसभेत अण्णा जोशी हे विधानसभेचे उपाध्यक्ष होते. १९९१ मध्ये भाजपचे खासदार होते. हे दोन्ही अण्णा सध्या हयात नाहीत.
पण नाथाभाऊंना हे दोन्ही अण्णा नक्की आठवत असतील. या दोन अण्णांमध्ये आणि नाथाभाऊंमध्ये आणखी एक फार महत्त्वाचा राजकीय धागा समान आहे. या दोन्ही अण्णांची अख्खी हयात भाजपमध्ये गेली. त्यांना पदे भाजपने दिली. पण त्यांनी आपल्या कारकिर्दीची राजकीय अखेर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केली. किंबहुना करवून घेतली, हे म्हणणे संयुक्तिक ठरेल.
कारण या दोन्ही अण्णांनी पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला होता. त्या दोघांनाही पवारांनी राष्ट्रवादीत जरूर घेतले. पण त्यांची कारकीर्द तिथे फुलली नाही. फळली नाही. हे दोन्ही अण्णा राष्ट्रवादीच्या घड्याळावर ना कधी विधानसभेत पोहोचू शकले ना कधी कोणते महत्त्वाचे पद त्यांना देण्यात आले. ते दोघेही राष्ट्रवादीच्या अनेक उपाध्यक्षांपैकी एकच राहिले.
अण्णा जोशींच्या राजकीय कारकिर्दीचा राजकीय अंत तर एवढा दारूण घडून आला, की ज्या शिवाजीनगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व अण्णांनी भाजपचा आमदार म्हणून दिमाखात केले, त्याच शिवाजीनगरमध्ये अण्णा जेव्हा घड्याळावर उभे राहिले, तेव्हा त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते.
हा इतिहास फार जूना नाही. फार फार तर १० – १५ वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. नाथाभाऊंना तो आठवत असेल. राष्ट्रवादीत तेव्हा दोन अण्णा होते… आज राष्ट्रवादीत नाथाभाऊ आहेत… त्यांचे राजकीय भवितव्य काय असेल…?? कोणी राजकीय ज्योतिषी सांगू शकले काय…??
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App