पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांना दिल्लीत Sigma “सिग्मा” जयशंकर हे नामाभिधान मिळाले आहे. त्यांच्यासाठी हा सामान्य गौरव असला तरी भारतीय कूटनीतीच्या नजीकच्या इतिहासात असा सन्मान मिळवणारे ते एकमेव आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी आहेत, इतकेच नाही तर वर शीर्षक दिल्याप्रमाणे ते नरसिंह राव यांचे आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी वारस देखील ठरले आहेत.Narasimha Rao’s international diplomatic successor in the Modi government
“मोदींचे परराष्ट्रमंत्री आणि नरसिंह रावांचे अंतरराष्ट्रीय मुत्सद्दी वारस”, असे शब्द प्रयोग वाचून अनेकांच्या भुवया उंचावतील. पण ती वस्तुस्थिती आहे. एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकेन यांना मानवाधिकाराच्या मुद्द्यावर “जिथल्या तिथे” आणि “जशास तसे” जे उत्तर दिले आहे, त्याला मुत्सद्देगिरीच्या भारतीय इतिहासात फक्त नरसिंह राव आणि बिल क्लिंटन यांच्यातल्या मुत्सद्देगिरीच्या संघर्षाची जोड सापडते…!!
1991 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर नरसिंह रावांनी अमेरिकेचा दौरा केला होता. त्यावेळी बिल क्लिंटन अध्यक्ष होते. भारतावर सीटीबीटी CTBT आणि एनपीटी NPT या अणू निर्बंध विषयक करारांवर स्वाक्षऱ्या करण्याचे करण्याचा प्रचंड दबाव होता. भारताची आर्थिक हालत खस्ता होती. त्यामुळे भारत सहज आपल्या दबावाखाली झुकेल, असा बिल क्लिंटन यांच्या प्रशासनाचा होरा होता. पण नरसिंहराव 12 देशांचे पाणी प्यायले होते. त्यांनी क्विंटन प्रशासनाचा होरा चुकवला. नरसिंह राव अमेरिकेच्या 4 दिवसांच्या दौऱ्यात सीटीबीटी CTBT आणि एनपीटी NPT या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या नाहीतच, पण भारताच्या आर्थिक सुधारणांच्या दृष्टीने अमेरिकन मुत्सद्दी आणि अमेरिकन बिझनेस कम्युनिटी यांच्याशी यशस्वी वाटाघाटी करून दाखविल्या. असे अमेरिकन गुंतवणुक खऱ्या अर्थाने भारतात वाढवून दाखविली. नरसिंहराव यांच्या मुत्सद्देगिरीची ती कमाल होती. त्यावेळी नरसिंह राव यांनी भारतातल्या इंग्रजी माध्यमांनी नरसिंह रावांच्या मुत्सद्देगिरीचे वर्णन “A Quiet Triumph” असे केले होते…!!
दोनच दिवसांपूर्वी सुब्रमण्यम जयशंकर यांनी आणि ब्लींकेन यांना मानवाधिकाराच्या मुद्द्यावर जे प्रत्युत्तर दिले, हे नरसिंह रावांच्या मुत्सद्देगिरीच्या कॅटेगिरीत बसते. अमेरिका जर भारतीय भूमीतल्या मानवाधिकारावर लक्ष ठेऊन भारताला टोकणार असेल तर भारताचाही अमेरिकन भूमीवर मानवाधिकारावर लक्ष ठेवण्याचा अधिकार आहे. विशेषत: भारतीयांच्या मानवाधिकाराचे अमेरिकेत उल्लंघन होत असताना आम्हाला त्यांची काळजी घेण्याचा अधिकार आहे, असे जयशंकर यांनी ब्लिंकेन यांच्यासमोर पत्रकार परिषदेत त्यांना सुनावले. त्याच वेळी त्यांनी हेतुतः अमेरिकन “व्होट बँक” याचा उल्लेख केला, जो खऱ्या अर्थाने बायडेन प्रशासनाला टोचणारा होता.
मानवाधिकाराचे हत्यार वापरून अमेरिकेने अनेकदा भारताला मुत्सद्देगिरीच्या प्रांगणात खाली पाहायला लावले आहे. पण यावेळी भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिकन भूमीवर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्याला मुत्सद्देगिरीच्या प्रांगणात पाणी पाजले आहे…!! मानवाधिकाराचा मुद्दा अमेरिकेला एकतर्फी वापरता येणार नाही याची जणू कायमची व्यवस्थाच सुब्रमण्यम जयशंकर यांनी करून दिली आहे.
सुब्रमण्यम जयशंकर यांची स्वतःचीच मुत्सद्देगिरीची पार्श्वभूमी फार मोठी आहे. अमेरिका आणि चीन या दोन देशांचे राजदूत पद ही फार दुर्मिळ संधी मानली जाते, ती जयशंकर यांना आपल्या करिअरमध्ये मिळाली आहे. इतकेच नाही तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून Nuclear Diplomacy “न्यूक्लियर डिप्लोमसी” अर्थात अणू मुत्सद्देगिरी वर पीएचडी मिळवणाऱ्या जयशंकर यांनी भारत-अमेरिका अणुकराराचे ड्राफ्टिंग करण्यात फार महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
जयशंकर यांचा मुत्सद्देगिरीतल्या करिअरचा ग्राफ खूप मोठा आहे. 14 देशांमध्ये राजदूत परराष्ट्र सचिव आणि आता परराष्ट्रमंत्री असा तो चढता ग्राफ आहे, जो आयएफएस अधिकाऱ्यांमध्ये देखील अतिशय दुर्मिळ मानला जातो.
भारताला जी. पार्थसारथी यांच्यासारखे अनेक उत्तम मुत्सद्दी लाभले. जय शंकर हे त्यांचेही वारस आहेत. कारण पार्थसारथी यांच्या हाताखाली त्यांनी आपल्या परराष्ट्रीय सेवेचे पहिले धडे गिरवले होते.
भारत अमेरिका आणि भारत चीन यांच्या संबंधातले बारकावे सर्वोत्तम माहिती असणारे परराष्ट्रमंत्री अशी त्यांची दिल्लीतच नव्हे, तर संपूर्ण जगात ओळख आहे. मुत्सद्देगिरीतले एखादे वक्तव्य माणसाला शिखरावर अथवा पायाशी आणून ठेवते, याची पूर्ण कल्पना असणारे ते परराष्ट्रमंत्री आहेत. “नेमक्या वेळी” आणि “नेमक्या ठिकाणी” घाव घालण्याची आणि घावावर मलम लावण्याचे दुर्मिळ कौशल्य त्यांना लाभले आहे.
त्यांचे वडील के सुब्रमण्यम, त्यांचे भाऊ के. विजय सुब्रमण्यम हे स्वतः आयएएस अधिकारी होते. ते केंद्रीय ग्रामीण विकास सचिवपदावरून निवृत्त झाले आहेत. वडीलही वरिष्ठ अधिकारी होते. बुद्धिमत्तेचा हा वारसा घरातून जसा आला आहे, तसाच तो परराष्ट्र सेवेत देखील योग्य वेळेला योग्य संधी मिळाल्याने जोपासला गेला आहे. जयशंकर यांची पत्नी कोयोको या जपानी आहेत.
कम्युनिस्ट डाव्या विचारसरणीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची राजकीय अभ्यासाची पार्श्वभूमी लाभूनही उजव्या विचारसरणीशी संलग्नता हा दुर्मिळ गुण जयशंकर यांच्याकडे आहे. ते राज्यशास्त्रात एमए आहेत. एम. फिल. आहेत आणि पी एचडी देखील आहेत.
त्यामुळेच परराष्ट्र धोरणात चीन अथवा अमेरिका यांच्या बरोबरीने eye to eye “आय टू आय” डोळ्यात डोळे घालून वाटाघाटी करण्याची हिंमत आणि कौशल्य त्यांना लाभले आहे. या गुणांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वासाने आपल्यास कारकिर्दीतले परराष्ट्र सचिव असलेल्या सुब्रमण्यम जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रीपद सोपवले आहे. हे सोपवण्यातले महत्वाचे यश त्यांनी नुकतेच आपल्या अमेरिका दौऱ्यात मिळवून दाखवले आहे.
1991 मध्ये नरसिंह रावांनी अमेरिकेत जाऊन बिल क्लिंटन यांच्यावर मुत्सद्देगिरीत मात करून दाखवली होती. 2022 मध्ये सुब्रमण्यम “सिग्मा” जयशंकर यांनी अमेरिकेत जाऊन अंथनी ब्लिंकेन यांच्यावर मुत्सद्देगिरीत मात करून दाखवली आहे… हेच सुब्रमण्यम जयशंकर नावाच्या परराष्ट्रमंत्र्याचे खरे यश आहे…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App