संजय राऊतांना मनसेचा खोचक सवाल
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिल्यानंतर भाजपाच्या काही मित्रपक्षांसह विरोधी बाकांवरील राजकीय पक्षांनीही बंदला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेनेही पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे नेते व मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भूमिका जाहीर केली होती. त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नामोल्लेख टाळत राऊतांवर निशाणा साधला आहे. MNS questions Shiv sena
शिवसेनेनं भारत बंदसह आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. खासदार संजय राऊत यांनी याची घोषणा केली होती. शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी राऊत यांचा नामोल्लेख टाळत खोचक सवाल उपस्थित केला आहे. देशपांडे यांनी ट्विट करत “महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी शेतकऱ्यांबरोबर होती आहे आणि राहणार, पण आज आरडाओरडा करणारे राज्यसभेत मूग गिळून गप्प का बसले होते?,” असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या आणि ‘भारत बंद’ला शिवसेना पाठिंबा देत आहे, अशी घोषणा शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी रविवारी केली. अकाली दलाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या आणि आंदोलनाविषयी रविवारी चर्चा केली. त्यानंतर शिवसेनेने ही घोषणा केली. त्याचबरोबर दिल्लीत होणाऱ्या बैठकीलाही उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती अकाली दलाच्या शिष्टमंडळाने दिली.
MNS questions Shiv sena
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App