भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर देशाच्या राजकारणातले दोन राजकीय ध्रुव. या दोन्ही नेत्यांचे एकमेकांशी वैचारिक दृष्ट्या कधी पटलेच नाही. पण या दोन ध्रुवांना जोडणाराही एक सुरेल धागा होता, तो म्हणजे लतादीदी…!!Latadidi: A musical thread connecting the two political poles of Savarkar and Nehru
मंगेशकर कुटुंबीयांची सावरकरांवरची श्रद्धा आणि भक्ती सर्वज्ञात आहे. सावरकरांच्या गीतांना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी चाली लावल्या. मंगेशकर भगिनींच्या गळ्यांतून त्याचे सूर उमटले आहेत. हे सुप्रसिद्ध आहे सावरकरांचे “जयस्तुते”, छत्रपती शिवाजी महाराजांची आरती आणि “ने मजसी ने” ही काव्यरत्ने मंगेशकरांच्या स्वरसाजातून अजरामर झाली आहेत.
1954 मध्ये हृदयनाथ मंगेशकर यांनी “ने मजसी ने परत मातृभूमीला” या सावरकरांच्या काव्याला चाल लावली. त्यासाठी त्यांना सरकारी नोकरी गमवावी लागली होती. परंतु, त्यांची सावरकरांवरची भक्ती कमी झाली नाही. एकीकडे सावरकरांच्या काव्यपंक्तींना मंगेशकर कुटुंबीयांनी आपल्या सुरांचा साज चढवला, तर दुसरीकडे कवी प्रदीप यांच्या “ए मेरे वतन के लोगो” या अजरामर गीताला ही लतादीदींनी आपल्या सुरांनी चार चाँद लावले. लतादीदींच्या याच सुरांनी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आणले होते.
“ए मेरे वतन के लोगो” हे कवी प्रदीप यांनी लिहिलेले आणि संगीतकार सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले देशभक्तीपर गीत 1962 च्या चीन युद्धात हुतात्मा झालेल्या भारतीय सैनिकांना समर्पित करण्यात आले होते. २७ जानेवारी १९६३ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत लता मंगेशकर यांनी हे गाणे गायले, तेव्हा पंडित नेहरूंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले होते.
या गाण्याला २०१४ मध्ये ५० वर्षे पूर्ण झाली होती. यानिमित्ताने लोढा फाऊंडेशनच्या वतीने महालक्ष्मी रेसकोर्स येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित होते. जवळपास १ लाख लोकांच्या साथीने लतादीदींनी हे गाणे गायले व ‘आज मी हे गाणे शेवटचे गात असून मी पुन्हा हे कोणतेही गीत सार्वजनिक व्यासपीठावरून गाणार नाही, असे त्यांनी जाहीर केले होते.
– आधी दिला होता नकार…पण
कवी प्रदीप यांनी लता मंगेशकर यांना हे गाणे गाण्याचा प्रस्ताव दिला होता, पण वेळ नसल्यामुळे लतादीदींनी सुरुवातीला ते गाण्यास नकार दिला होता. नंतर कवी प्रदीप यांच्या आग्रहास्तव लतादीदींनी हे गाणे गाण्यास होकार दिला. कोणत्याही हिंदी चित्रपटाचा भाग नसतानाही हे गाणे प्रत्येक भारतीयाच्या ओठावर आजही कायम आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App