शिक्षकाची मुलगी ते सर्वोंच्च न्यायालयातील वकील, आरएसएसच्या समर्पित कार्यकर्त्यापासून ते नव्याने भाजपमध्ये आलेल्या नेत्या, जाणून घ्या केंद्रीय मंत्रीमंडळातील महिला मंत्र्यांचा राजकीय प्रवास


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य मंत्रीमंडळात सात महिला मंत्र्यांना स्थान देण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील अपना दलच्या अनुप्रिया पटेल, कर्नाटकच्या उडुपी येथील खासदार शोभा करंदलाजे, नवी दिल्लीतील खासदार मीनाक्षी लेखी, झारखंडच्या कोडरमा येथील खासदार अन्नपूर्णा देवी, त्रिपुरा पश्चिमच्या खासदार प्रतिमा भौमक, महाराष्ट्रातील दिंडोरीच्या खासदार भारती पवार, गुजरातच्या सुरत येथील खासदार दर्शना विक्रम जरदोश, झारखंडच्या अन्नपूर्णादेवी यांना मंत्री करण्यात आले आहे. जाणून घेऊयात त्यांचा राजकीय प्रवास….. From the daughter of a teacher to a lawyer in the Supreme Court, from a dedicated RSS worker to a newcomer to the BJP, know the political journey of women ministers in the Union Cabinet

एकेकाळी लालू प्रसाद यादव यांच्या निकटवर्तीय होत्या अन्नपूर्णा देवी, तिसाव्या वर्षीच बनल्या होत्या मंत्री

केंद्रीय मंत्रीमंडळात शिक्षण राज्यमंत्री म्हणून सहभागी झालेल्या अन्नपूर्णा देवी एकेकाळी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जात होत्या. वयाच्य अवघ्या तिसाव्या वर्षी त्यांनी बिहार मंत्रीमंडळात मंत्रीपद भूषविले होते. २०१९ मध्ये राष्ट्रीय जनता दल सोडून त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. झारखंडमधील कोडरमा मतदारसंघातून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली. झारखंड भाजपाच्य प्रदेश उपाध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

अन्नपूर्णा देवी यांना यादव कोट्यातून मंत्री बनविले असल्याचे म्हटले जात आहे. ५१ वर्षीय खासदार अन्नपूर्णा देवी गेल्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या. त्यांनी इतिहास विषयात पदव्यूत्तर शिक्षण घेतलंय. झारखंड सरकारमध्ये मंत्री म्हणून त्यांची सिंचन तसंच महिला आणि बाल कल्याण विकास विभागाची जबाबदारीही सांभाळली होती.
अन्नपूर्णा देवी यांचे पती रमेश प्रसाद यादव हे एकत्रित बिहारमध्ये मंत्री होते. त्यांच्या निधनानंतर अन्नपूर्णा देवी यांनी राजकारणात प्रवेश केला आणि पहिल्याच निवडणुकीत आमदारपदी निवडून येऊन त्यांना मंत्रीपद मिळाले. झारखंडमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. ज्येष्ठ नेते बाबूलाल मरांडी यांचा त्यांनी साडेचार लाख मतांनी पराभव केला.

मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल, कौटुंबिक कलहातही मिळविले राजकीय यश

मिर्झापूर नाव ऐकले तरी वाटते की प्रचंड गुंडगिरीचे शहर आहे. परंतु, उत्तर प्रदेशातील मिर्झापूर या गुन्हेगारीसाठी प्रसिध्द असलेल्या शहराच्या खासदार अनुप्रिया पटेल आहे. उत्तर प्रदेशात ‘अपना दल’ नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना करणाऱ्या सोनलाल पटेल यांच्य त्या कन्या. ४० वर्षीयअनुप्रिया पटेल यांनी मानसशास्त्रात पदव्यूत्तर शिक्षण घेतलंय. एमबीएची पदवीही घेतली आहे. अनुप्रिया यांनी २०१४ साली मिझार्पूर लोकसभा मतदार संघातून विजय मिळवला. त्यापूर्वी २०१२ साली त्या वाराणसी लोकसभा क्षेत्रात येणाºया रोहनिया विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. २०१४ साली अपना दलाने भाजपासोबत आघाडी केली होती. त्यावेळी त्यांनी केंद्रात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राज्य मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती.

पूर्व उत्तर प्रदेशातील पटेल समाजात अपना दलाचा प्रभाव आहे. मात्र, अनुप्रिया पटेल आणि त्यांची आई कृष्णा पटेल यांच्यात कौटुंबिक वाद आहेत. २०१४ मध्ये अनुप्रिया यांना मंत्रीपद मिळाल्यावर कृष्ण पटेल संतप्त झाल्या होत्या. त्यांनी भाजपासोबत संबंध तोडून टाकण्याची धमकी दिली होती. सोनेलाल पटेल यांनी १९९५ मध्ये मागासवर्गीयांना सत्तेत स्थान मिळावे यासाठी अपना दल या पक्षाची स्थापना केली. त्यांच्या मृत्यूनंतर दोघी मुली पल्लवी पटेल आणि अनुप्रिया पटेल यांच्यात वाद सुरू झाले. आई कृष्णा पटेल यांनी मोठी मुलगी असलेल्या पल्लवी पटेल यांना पाठिंबा दिला होता. कृष्णा पटेल यांचा आरोप आहे की आमदार झाल्यावर अनुप्रिया पटेल यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वत:कडे घेतले. त्याचबरोबर पक्षावर पूर्ण वर्चस्व मिळविले. अनुप्रिया यांचे पती आशिष कुमार सिंह आहेत.

दिल्लीतील भाजपाचा एलिट चेहरा, प्रभावी वक्त्या, सर्वोच्च न्यायालयातील वकील मिनाक्षी लेखी

केंद्रीय मंत्रीमंडळात परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री झालेल्या मिनाक्षी लेखी या दिल्लीतील भाजपचा एलिट चेहरा म्हणून ओळखल्या जातात. ५४ वर्षीय मीनाक्षी लेखी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अधिवक्ता म्हणून काम केल्यानंतर आता त्या सर्वोच्च न्यायालयातील वकील आहेत. घरगुती हिंसाचार, कौटुंबिक कलह तसंच सैन्य दलात महिलांसाठी स्थायी कमिशन यांसारखे मुद्दे त्यांनी न्यायालयासमोर मोठ्या खुबीने मांडले. भाजपच्या तिकिटावर सलग दोन वेळा त्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. २०१४ आणि २०१९ साली त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवत विजय मिळवला.

त्यांनी हिंदू कॉलेजमधून बॉटनी विषयात बीएससी पूर्ण केल्यानंतर दिल्ली युनिव्हर्सिटीच्या लॉ सेंटरमधून एलएलबीचं शिक्षण घेतलं. १९९० पासून त्या वकिली करत आहेत. मीनाक्षी लेखी यांचे पती अमन लेखी हेदेखील सर्वोच्च न्यायालयात वकील तसंच अ‍ॅडिशनल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
मिनाक्षी लेखी या उत्कृष्ठ वक्ता म्हणून प्रसिध्द आहेत. संसदेतील त्यांची भाषणे गाजली आहेत. नागरिकत्व संशोधन कायद्याच्या चर्चेवर त्यांच्या भाषणाची खूप चर्चा झाली होती.
मिनाक्षी लेखी यांनी २०१० मध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सक्रीय राजकारणात प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्षाही त्या होत्या. २०१३ मध्ये त्या राष्ट्रीय प्रवक्तया बनल्या. नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून २०१४ मध्ये त्या पहिल्यांदा खासदार झाल्या

शोभा करंदलाजे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी समर्पित जीवन, विवाहदेखील केला नाही

कृषि आणि शेतकरी कल्याण राज्य मंत्री शोभा करंदलाजे यांचे संपूर्ण जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी समर्पित आहे. संघाच्या कार्यासाठी त्यांनी विवाहदेखील केला नाही.

५४ वर्षीय शोभा करंदलाजे या कर्नाटक भाजपातील दिग्गज नेता मानल्या जातात. २००४ मध्ये भारतीय जनता पक्षातर्फे विधान परिषदेवर नियुक्त केल्य गेल्या. त्यानंतर २००८ मध्ये बंगळुरूच्या यशवंतपूर मतदारसंघातून त्या आमदार म्हणून निवडून आल्या. त्यांच्यावर पंचायत राजच्या राज्य मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, एक वर्षात राजकीय संघर्षात त्यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र, २०१० साली त्यांना पुन्हा मंत्रीपद बहाल करण्या त आली. २०१२ मध्ये मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या कर्नाटक जनता पार्टीमध्ये त्या सामील झाल्या. त्यांच्यावर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. २०१३ मध्ये त्या पुन्हा आमदार म्हणून निवडून आल्या. २०१४ मध्ये कर्नाटक जनता पार्टी भारतीय जनता पक्षात विलय झाली.

शोभा करंदलाजे यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९६६ ला दक्षिण कर्नाटकातील पुत्तूर येथे झाला. त्यांनी समाजशास्त्रात एमए केले आहे. लहान वयापासूनच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम सुरू केले. त्यांनी आपले जीवन संघाच्या कामासाठी समर्पित केले. त्यामुळे विवाहदेखील केला नाही.

कर्नाटकच्या उडुप्पी चिकमंगळुरू मतदारसंघातून त्या सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्या कर्नाटक भाजपच्या महासचिव देखील आहेत. यापूर्वी कर्नाटक सरकारमध्ये त्यांनी ऊर्जा, ग्रामीण विकास, पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा यांसारख्या विभागाची जबाबदारी यशस्वीपणे पेलली आहे.

दर्शना विक्रम जरदोश : इंदिरा गांधीनंतर सर्वाधिक मतांनी विजय मिळविलेल्या महिला खासदार

सुरतच्या खासदार असलेल्या दर्शना विक्रम जरदोश यांचा वॉर्ड समितीच्या उपाध्यक्षा ते केंद्रीय मंत्रक्ष असा राहिला आहे. १९८८ मध्ये त्यांनी राजकीय जीवनास प्रारंभ केला. त्यांना वॉर्ड समितीच्या उपाध्यक्षा करण्यात आले. १९९६ मध्ये त्या भाजपा महिला मोर्चाच्या सुरतच्या उपाध्यक्षा बनल्या. पक्षामध्ये विविध पदांवर काम करत असताना २००९ मध्ये त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. मोठ्या मताधिक्याने त्यांनी निवडणूक जिंकली. २०१० मध्ये त्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या महासाचिवपदी नेमण्यात आले. त्यानंतर २०१४ मध्ये त्या पुन्हा निवडून आल्या. २०१९ मध्ये तिसऱ्यादा त्या लोकसभेवर निवडून आल्या. २०१४ मध्ये त्यांनी सुरतमधून आपल्या प्रतिस्पर्ध्याचा तब्बल ५ लाख ३३ हजार १९० मतांनी पराभव केला होता. एकूण मताच्या ७६ टक्के मते त्यंनी मिळविली होती. भारतीय निवडणुकीच्या इतिहासात इंदिरा गांधींनंतर एखाद्या महिला खासदाराने मिळविलेला हा सर्वात मोठा विजय आहे. कला-संस्कृतीशी संबंधित ‘संस्कृत’ या संस्थेच्या त्या संचालिका आहेत. गेल्या चार दशकांपासून त्या सक्रीय राजकारण आहेत.

त्रिपुराच्या दिदी प्रतिमा भौमिक: शिक्षकाची मुलगी बनली केंद्रीय मंत्री

एका शालेय शिक्षकाची मुलगी असलेल्या प्रतिमा भौमिक या त्रिपुरामध्ये दिदी म्हणून ओळखल्या जातात. भारतीय जनता पक्षाला त्रिपुरामध्ये रुजविण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आलहे.
त्रिपुरा किंवा इशान्येकडील राज्यांतून केंद्रीय मंत्री बनलेल्या त्या महिला आहेत. विज्ञानाची पदवी घेतलेल्या प्रतिमा या १९९१ पासून भाजपाच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांना १९९८ आणि २०१८ असे दोन वेळा आव्हान दिले होते. दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला; पण भाजपाची ताकद त्रिपुरामध्ये वाढली. २०१९ मध्ये मात्र ज्येष्ठ खासदार शंकर प्रसाद दत यांना तीन लाख पाच हजार मतांनी हरवून त्यांनी मोठा विजय मिळविला.

प्रतिमा यांचे वडील एका शाळेत शिक्षक होते. प्रतिमा यांनी राज्य स्तरावर खोखो आणि कबड्डी खेळली आहे. त्रिपुरा भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणिस म्हणून त्यांनी काम केले आहे. ५२ वर्षीय प्रतिमा भौमिक या आगरतळाच्या रहिवासी आहेत. अतिशय सामान्य कुटुंबातून येणाºया प्रतिमा भौमिक यांचे कुटुंबीय शेतीतून आपला उदरनिर्वाह करतात. साडी आणि स्लिपर ही त्यांची ओळख असून अत्यंत साधी राहणी हे विशेष आहे.

राष्ट्रवादीने केलेल्या अन्यायामुळे केंद्रीय मंत्री बनल्या डॉ. भारती पवार

राष्ट्रवादी कॉँग्रेसने उमेदवारीमध्ये केलेल्या अन्यायामुळेच डॉ. भारती पवार या केंद्रीय मंत्री बनू शकल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात त्यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात खासदारकी आणि केंद्रीय मंत्रीपदही मिळविले.

भारती प्रवीण पवार (माहेरच्या: भारती किसन बागुल) २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या दिंडोरी मतदारसंघातून निवडून गेल्या. राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा म्हणून काम करणाऱ्या डॉ. भारती पवार २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. डॉ. पवार या दिवंगत माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या स्नुषा असून, विद्यमान जिल्हा परिषद सदस्या व राष्ट्रवादीच्या विद्यमान प्रदेश उपाध्यक्षा आहेत. दिंडोरी हा राष्ट्र्वादीसाठी सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. मात्र, राष्ट्र्वादी कॉँग्रेसने ऐनवेळी शिवसेनेतून प्रवेश केलेल्या धनराज महाले यांना उमेदवारी दिल्याने डॉ. भारती पवार यांनी भाजपाकडून निवडणूक लढविली.

साध्वी निरंजन ज्योति : निषाद समुदायातील भाजपच्या भगव्या ब्रिगेडचा चेहरा

भारतीय जनता पक्षाच्या मंत्रीमंडळात २०१४ पासून असलेल्या साध्वी निरंजन ज्योती या उत्तर प्रदेशातील फतेहपूरच्या खासदार निषाद समुदायातील असून भगव्या ब्रिगेडचा चेहरा आहेत.
हमीरपूर जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झालेल्या निरंजन ज्योति यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्यांनी स्वामी अच्युतानंद यांच्याकडून गुरुदीक्षा घेऊन संन्यास घेतला होता. त्यानंतर राम मंदिर आंदोलनात त्या सहभागी झाल्या. विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय सहमंत्री म्हणून त्यांनी काम केले.

निरंजन ज्योति दुर्गा वाहिनी आणि विश्व हिंदू परिषदेतून त्या भारतीय जनता पक्षामध्ये आल्या. आक्रमक नेत्या म्हणून त्यांची ओळख बनली. त्या नेहमी भगवी वस्त्रे परिधान करतात. अनेक धार्मिक आणि सामाजिक संस्थांवर काम करणाऱ्या साध्वी निरंजन ज्योती या प्रवचनेही देतात.

२०१४ मध्ये त्या लोकसभेवर निवडून आल्या. त्यांच्यावर खाद्य प्रक्रिय उद्योग मंत्रालयाच्या राज्य मंत्र्यांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांच्याकडे नव्याने ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय राज्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्रालय राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

रेणुका सिंह : छत्तीसगढच्या आक्रमक आदिवासी नेत्या

छत्तीसगढच्या तरुण तडफदार आणि आक्रमक आदिवासी नेत्या रेणुका सिंह सरुता या आदिवासी विकास विभागाच्या राज्य मंत्री आहेत. छत्तीसगढमधील त्या एकमेव मंत्री आहेत.
२०१९ मध्ये सरगुजा मतदारसंघातून निवडून आल्यावर त्यांच्यावर मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. नव्या चेहऱ्यांना केवळ खासदारकीचीच नव्हे तर मंत्री बनण्याची संधीही भाजप देते हे यातून दाखवून देण्यात आले.

५७ वर्षीय रेणुका सिंह सरुता बारावीपर्यंत शिकल्या आहेत. २००० साली त्या पहिल्यांदा भाजपाच्या रामानुजनगर मंडळाच्या अध्यक्ष बनल्या. जनपद सदस्य म्हणून निवडून आल्या. २००३ आणि २००८ मध्ये त्या प्रेमनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या. त्यानंतर रमणसिंह सरकारमध्ये महिला आणि बालविकास व समाज कल्याण मंत्री म्हणून काम केले आहे.

From the daughter of a teacher to a lawyer in the Supreme Court, from a dedicated RSS worker to a newcomer to the BJP, know the political journey of women ministers in the Union Cabinet

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात