डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर तब्बल ३३ वर्षांनी मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्री, थोर समाजसुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपूर्ण जीवनाचा त्याग केला. एवढ्या महान व्यक्तीच्या महान कार्याच्या गौरव करण्यासाठी मात्र भारत सरकारला बराच उशीरा झाल्याचे दिसून येते. कारण, बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यासाठी त्यांच्या मृत्यूनंतर १९९० हे वर्ष उजाडावं लागलं. Dr Ambedkar got Bharat Ratna award 4 decades late
मायावती यांनी अनेकदा केला आहे ‘हा’ दावा –
खरंतर या अगोदर पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यासह अनेकांना हा पुरस्कार देण्यात आला होता. इंदिरा गांधींनी तर स्वत:लाच हा पुरस्कार घोषित केला होता. मात्र त्या तुलनेत आंबेडकरांना पुरस्कार देण्याबाबत तत्कालीन राजकीय पक्षांमध्ये मतभेद दिसून आले. मात्र व्ही.पी. सिंग सरकारच्या कार्यकाळात आंबेडकरांच्या कार्याचा खऱ्या अर्थाने गौरव करण्यात आला. व्ही.पी.सिंग अनेक पक्षांच्या पाठिंब्यावर सरकार चालवत होते. त्यावळी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यावरूनही बहुजन विचारांचे पक्ष दबाव निर्माण करत होते. परिणामी व्ही.पी.सिंग सरकारने डॉ.बाबासाहेब आंबडेकरांना केवळ भारतरत्न पुरस्कारच जाहीर केला नाही, तर मंडल आयोगाच्या शिफारशीही लागू केल्या. बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी अनेकदा दावा केला आहे, की बसपाच्या दबावमुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.
काशीराम यांनी डॉ.बाबासाहेब आबंडेकरांना घरोघरी पोहचवलं –
त्या काळात काशीराम यांनी डॉ.बाबासाहेब आबंडेकरांना घरोघरी पोहचवलं होतं. हजारो किलोमीटरच्या सायकल यात्रेदरम्यान त्यांनी बाबासाहेबांना केवळ घराघरातच पोहचवलं नाहीतर देशाच्या राजकारणात बाबासाहेबांचे स्थान अधिक उंचीवर नेऊन ठेवले. त्यानंतर १९८४ मध्ये बहुजन समाजवादी पार्टीच्या स्थापनेने तर बहुजन नायक आणि बहुजन विचारधारा मुख्य प्रवाहात आली. परिणामी एकूणच परिस्थिती अशी निर्माण झाली की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा भारतरत्न पुरस्कार जाहीर करून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. बहुजन समाजात निर्माण झालेल्या जागृतीमुळे देशातील राजकारणी समजले होते, की आता या लोकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांच्याशिवाय सरकार बनवने अवघड आहे.
एक विचारपूर्वक षडयंत्र? –
खरंतर बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार उशीरा जाहीर करण्यामागे एक विचारपूर्वक षडयंत्र असल्याचेही बोलले जाते, काँग्रेस आणि अन्य राजकीय पक्षांना वाटत नव्हतं की भारतीय राजकारणात बाबासाहेबांचं स्थान अधिक वाढावं. अतिशय चतुरपणे सुरुवातीस बाबासाहेबांना केवळ दलितांचे नेते म्हणून संबोधलं गेलं आणि कालांतराने त्यांच्या कार्याचे योगदान व महत्त्व काहीसे बाजूला केले गेले.
बाबासाहेब आज केवळ भारतरत्नच नाही तर विश्वरत्न –
आंबेडकरवादी विचाराधारा मजबुत होण्याचा अर्थ आहे, बहुजन समाजातील लोकांमध्ये राजकीय इच्छाशक्ती जागृत होणे. परंतु तत्कालीन राजकीय पक्षांना हे नको होते. मात्र काशीराम यांच्या चळवळीने डॉ.बाबासाहेबांना पुन्हा एकदा लोकांच्या मनात जिवंत केले होते. आज संपूर्ण जग डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना सलाम करत आहे. बाबासाहेब आज केवळ भारतरत्नच नाही तर विश्वरत्न बनले आहेत.
पत्नी सविता आंबेडकर यांनी भारतरत्न पुरस्कार स्वीकारला –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर ३३ वर्षांनी मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांच्या सरकारने हा पुरस्कार ३१ मार्च १९९० ला देण्याचे घोषित केले. १४ एप्रिल १९९० रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती आर.वेंकटरमन यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी सविता आंबेडकर यांनी भारतरत्न पुरस्कार स्वीकारला.
आंबेडकरांनी देश आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून त्यांचा भारतरत्न पुरस्काराने सन्मान केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण घटना १९५६ मध्ये घडली. हजारो अनुयायींसोबत आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्याचवर्षी डॉ. आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं. त्यानंतर ३३ वर्षांनी त्यांचा मरणोत्तर भारतरत्नने सन्मान करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App