Russia – Ukraine war : मोदी सरकारच्या वास्तववादी भूमिकेत लिबरल्सना “दिसला” नेहरूंचा अलिप्ततावाद…!!


नाशिक : रशिया – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत आलेल्या रशियाच्या निषेध ठरावावर भारत सरकारने तटस्थ राहण्याचे धोरण स्वीकारले आणि भारतात इकडे लिबरल्सना आनंदाच्या उकळ्या फुटल्या. जणू काही विद्यमान मोदी सरकारने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अलिप्ततावादाच्या धोरणावर (non allianenment) शिक्कामोर्तबच केले, अशीच लिबरल्सची धारणा झाली झालेली दिसते.Russia – Ukraine war: Liberals in realistic role of Modi government

पत्रकार सागरिका घोष यांनी तसे ट्विट केले आहे. रशिया – युक्रेन यांच्या युद्धात भारताने तटस्थ भूमिका घेतली. नेहरू द्वेष करणाऱ्या सरकारला अखेर नेहरूंच्या अलिप्ततावादी धोरणाची अपरिहार्यता पटली. नेहरू अद्याप “जिवंत” आहेत आणि त्यांची प्रकृतीही “उत्तम” आहे, असे खोचक ट्विट सागरिका घोष यांनी केले आहे. जणू काही नेहरूंचे अलिप्ततावादी धोरण हे कालातीत आणि कधीच न बदलणारे होते, असा आव त्यांनी या ट्विट मधून आणलेला दिसतो आहे.

वास्तविक पाहता भारताने आज रशिया – युक्रेन यांच्या युद्धात “तटस्थ” म्हणण्यापेक्षा “वास्तववादी” भूमिका घेतल्याचे दिसते आहे. मूळातच भारताला या दोन देशांच्या युद्धात “मर्यादित भूमिका” असल्याचे मान्य करावे लागेल. यात उगाचच “हाय मॉरल ग्राउंड” घेऊन बोलण्यात आणि भाषण करण्यात मतलब नाही. तसेच मोदी भक्तांनी जशी त्यांच्यावरच्या जागतिक नेतृत्वाविषयी स्तुतीसुमने उधळली आहेत, तशी स्तुतीसुमने उधळण्याचीही गरज नाही…!!

मोदी पुतिन यांच्याशी बोलले म्हणजे जणू काही पुतिन यांनी त्यांचे सगळे “ऐकले”, असे समजण्याचे कारण नाही. पुतिन जसे मोदींशी बोलले तसेच ते चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही बोलले. त्याचाही अर्थ यांनी जिनपिंग यांचे “ऐकले”, असे समजण्याचे कारण नाही. युद्धकाळात सर्वसामान्य मित्र देशांचे प्रमुख एकमेकांशी असे बोलतच असतात.

रशिया आणि युक्रेनच्या युद्धात भारत आणि चीन यांची भूमिका स्वतःच्या देशाच्या स्वार्थाची आहे किंबहुना वास्तववादी आहे. रशियाचा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत नुसता “तोंडी निषेध” करून काही उपयोग नव्हताच. त्यात “तटस्थ” राहून किंवा कोणतीही भूमिका घेऊन पुतिन यांना काही फरक पडणार नव्हता. अशावेळी अनावश्यक भाषणबाजी करण्यात काय मतलब आहे??, असा विचार जर भारताने केला असेल तर त्यात गैर मानण्याचे कारण नाही…!! आणि त्या पलिकडे जाऊन तर नेहरूंचा पोकळ अलिप्ततावाद शोधण्याची त्याहून गरज नाही…!!

चीनने रशियाला पाठिंबा दिला आहे. भारताने रशियाला थेट पाठिंबा दिलेला नाही. भारताच्या पाठिंब्याची रशियाला गरज नाही. तसेच भारतानेही आपल्या हिताकडे दुर्लक्ष करून रशियाला पाठिंबा देण्याची गरज नाही. एवढीच सर्वसामान्य वास्तववादी भूमिका मोदी सरकारने घेतली आहे. यापेक्षा त्या भूमिकेत नेहरूंचा अलिप्ततावाद शोधण्याची गरज नाही आणि मोदी भक्तांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमने उजळण्याचीही गरज नाही.



जे युरोपियन देश हाय मॉडल ग्राउंड वरून युक्रेनला पाठिंबा देत आहेत ते प्रत्यक्षात युक्रेनला मदत काय करत आहेत?, तर जर्मनीने युक्रेनला हेल्मेट पाठवली आहेत. अमेरिकेने युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांना राजकीय आश्रय देण्याची तयारी दाखवली आहे. ब्रिटनने पुतिनची संपत्ती जप्त केली आहे. या सगळ्या प्रतीकात्मक बाबी आहेत. युरोप आणि अमेरिकेची “नाटो”मार्फत थेट रशियाच्या सीमेवर जाऊन लष्करी कारवाई करण्याची हिंमत नाही. अशा वेळी भारतातल्या मोदी सरकारला नेहरूंचा अलिप्ततावाद स्वीकारावा लागला असे हे हिणवण्याचीही गरज नाही…!! कारण ती वस्तुस्थिती नाही. नेहरूंच्या काळातला अलिप्ततावाद हात दुबळ्यांचा अलिप्ततावाद होता. भारताची सैन्य शक्ती निर्बळ होती. आज तशी स्थिती नाही. भारत कोणत्याही आक्रमणाला सडेतोडच नव्हे, तर त्या पलिकडे जाऊन घुसून उत्तर देतो, हे सिद्ध झाले आहे. अशा वेळी वास्तववादी भूमिका घेणे काहीही गैर नाही. तशीच भूमिका मोदी सरकारने घेतली आहे.

– भारताची तटस्थ भूमिका का…??

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत रशियाविरोधात आणलेल्या ठरावापासून भारताने स्वतःला दूर ठेवले. या ठरावात युक्रेनवरील रशियन हल्ल्याचा निषेध करण्यात आला आणि युक्रेनमधून “तत्काळ, पूर्ण आणि बिनशर्त” रशियन सैन्याने माघार घेण्याचे आवाहन केले. मात्र, रशियाने या प्रस्तावाला व्हेटो दिल्याने हा प्रस्ताव पडला.

सार्वभौमत्व आणि अखंडतेचा आदर करा

15 सदस्यीय सुरक्षा परिषदेच्या या प्रस्तावाच्या बाजूने 11 मते मिळाली. तर भारत, चीन आणि यूएईने यात तटस्थ भूमिका घेतली. भारताने या ठरावावर मतदान न करण्याबाबत स्पष्टीकरण जारी केले. त्यामुळे भारताने मुत्सद्देगिरीचा अवलंब करण्याचा आग्रह धरला. त्याचबरोबर आपण सर्वांच्या सार्वभौमत्वाचा आणि अखंडतेचा आदर केला पाहिजे, असे भारताने म्हटले आहे.

शत्रुत्व त्वरित संपले पाहिजे

हल्ल्याचा निषेध करत, भारताने ठरावावर मतदान केले नाही आणि रशिया आणि युक्रेनमधील हिंसाचार आणि शत्रुत्व त्वरित संपवण्याची मागणी केली. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. यादरम्यानही पीएम मोदींनी पुतिन यांच्यासोबत हिंसाचार संपुष्टात आणण्याचा आणि प्रत्येक प्रश्न चर्चेने सोडवण्याचा आग्रह धरला होता.

संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरच्या तत्त्वांचा आदर करा

भारताने म्हटले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व सदस्य राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्त्वांचा आणि संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचा आदर केला पाहिजे, कारण यातूनच योग्य मार्ग मिळू शकतो. तसेच मतभेद आणि वाद हे संवादातूनच मिटवता येतात.

भारताने संतुलित स्थिती जाहीर केली

युक्रेनमधील अलीकडच्या घडामोडी अस्वस्थ करणाऱ्या आहेत, असे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताने म्हटले आहे. मानवी जीवनाच्या किंमतीवर कोणताही उपाय शोधला जाऊ शकत नाही. यादरम्यान भारताने युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची बाबही ठळकपणे मांडली होती. एवढेच नाही तर भारताने या विषयावर आपली ठाम आणि संतुलित भूमिका स्पष्टपणे व्यक्त केली. वाटाघाटीच्या टेबलावर परत येण्यास सांगितले होते. यासह सर्व उपाय शक्य आहेत, असे भारताने म्हटले आहे.

ही भाषा सर्वसामान्यपणे अंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी वापरण्यात येते. यात वेगळे काही नाही

या देशांचे रशियाच्या विरोधात मतदान

रशियाविरोधातील ठरावाच्या समर्थनार्थ मतदान करणारे देश म्हणजे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, अल्बानिया, ब्राझील, गॅबॉन, घाना, आयर्लंड, केनिया, मेक्सिको आणि नॉर्वे हे आहेत. पण या देशांपैकी कोणीही प्रत्यक्ष युक्रेनचा सीमेवर जाऊन अथवा त्या देशात जाऊन कोणतीही मदत केलेली दिसत नाही.

Russia – Ukraine war: Liberals in realistic role of Modi government

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात