पद्म पुरस्कार : राष्ट्रपतींकडून पद्म पुरस्कार प्रदान, विजेत्यांमध्ये चार मान्यवर महाराष्ट्रातील, प्रभा अत्रे यांना पद्म विभूषण


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवन येथे आज एका विशेष नागरी सोहळ्यात 2022 सालचे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान केले. प्रतिष्ठित पद्म पुरस्कार मिळालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील पद्म विभूषणप्राप्त डॉक्टर प्रभा अत्रे आणि पद्मश्रीप्राप्त डॉक्टर बालाजी तांबे (मरणोत्तर), सुलोचना चव्हाण आणि सोनु निगम यांचा समावेश आहे.Padma Awards President confers Padma Awards, winners include four dignitaries from Maharashtra, Prabha Atre awarded Padma Vibhushan


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवन येथे आज एका विशेष नागरी सोहळ्यात 2022 सालचे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान केले. प्रतिष्ठित पद्म पुरस्कार मिळालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील पद्म विभूषणप्राप्त डॉक्टर प्रभा अत्रे आणि पद्मश्रीप्राप्त डॉक्टर बालाजी तांबे (मरणोत्तर), सुलोचना चव्हाण आणि सोनु निगम यांचा समावेश आहे.

डॉक्टर प्रभा अत्रे – पद्मविभूषण – कला क्षेत्र

डॉक्टर प्रभा अत्रे या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या, सर्वश्रेष्ठ आणि आघाडीच्या गायिका आहेत. किराणा घराण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रभा अत्रे यांचा जन्म 13 सप्टेंबर 1932 रोजी झाला. प्रभा अत्रे यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताला आणि विशेषतः किराणा घराण्याच्या गायनकलेला नवीन दिशा दिली. भारतीय संगीत कलेला पाश्चिमात्य देशात लोकप्रियता मिळवून देणाऱ्या त्या पहिल्या गायिका होत. 1969 पासून त्या पूर्णवेळ संगीत मैफिली करू लागल्या. आवाज लावण्याची पद्धत, सुस्पष्ट शब्दोच्चारण आणि परिणामकारक भावना अविष्कार यांच्या माध्यमातून त्यांनी शास्त्रीय संगीतात नवीन जाणीव आणली.



संगीत या एकाच विषयावर, एकाच वेळी डॉक्टर प्रभा अत्रे यांची अकरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत, हा जागतिक विक्रम असावा. त्यांच्या पुस्तकामुळे संगीत रसिकांना संगीतकला समजून घेण्यास मदत झालीच शिवाय संदर्भ म्हणूनही या पुस्तकांना वेगळे मोल आहे. ‘डॉक्टर प्रभा अत्रे फाउंडेशन’ ची स्थापना करून प्रभा अत्रे यांनी आपल्या सामाजिक-सांस्कृतिक जबाबदाऱ्या निभावल्या. प्रतिभावान विद्यार्थ्यांना व्यावसायिक कलाकार म्हणून आकार देण्यासाठी तसेच संगीत रसिकांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी ‘स्वरमयी गुरुकुल’ ची स्थापना केली.

डॉक्टर प्रभा अत्रे यांना मिळालेल्या पुरस्कारांमध्ये 1990मधील पद्मश्री , 2002 मधील पद्मभूषण आणि 1991 मधील संगीत नाटक अकादमी पुरस्कार या प्रतिष्ठित पुरस्कारांचा समावेश आहे.

श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे (मरणोत्तर)- पद्मश्री -वैद्यकीय क्षेत्र

श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे आघाडीचे, जागतिक ख्यातीचे आयुर्वेद वैद्यकीय तज्ञ अध्यात्मिक गुरु आणि लोकशिक्षक होते. त्यांनी आयुर्वेद, योग, ध्यान, वैदिक जीवनपद्धती आणि संगीतोपचार या क्षेत्रांमध्ये असामान्य योगदान दिले. ‘आत्मसंतुलन ग्राम’ हे भारतातील सर्वात मोठे पंचकर्म केंद्र तसेच ‘संतुलन आयुर्वेद’ या भारतात आणि परदेशातही आयुर्वेदिक औषधांसाठी प्रसिद्ध असलेल्या केंद्राचे ते संस्थापक होते. ‘ओम कुर्सेत्रम’ या युरोपमधील पहिल्या आयुर्वेद आणि पंचकर्म केंद्राचेही ते संस्थापक होते.

28 जून 1940 रोजी जन्मलेले डॉक्टर तांबे वेदांचे अभ्यासक वासुदेव तांबे शास्त्री यांचे सुपुत्र. त्यांनी 1960 मध्ये यांत्रिकी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आणि 1964 मध्ये आयुर्वेद वैद्य विशारद ही पदवीही मिळवली.

तांबे हे फॅमिली डॉक्टर या नावाने महाराष्ट्रात ओळखले जात असंत.

दर आठवड्याला एक दशलक्षाहून जास्त प्रति निघणाऱ्या सकाळ वृत्तपत्राच्या पुरवणीमध्ये त्यांनी 18 वर्षांहून अधिक काळ लिखाण केले. या कालावधीत त्यांनी 3400 हून जास्त लेख लिहिले.

वैद्यकीय ज्ञान सामान्य माणसाला कळेल अशा सोप्या भाषेत सांगणे हे आधुनिक आयुर्वेदाला त्यांनी दिलेले विशेष योगदान मानले जाते. डॉक्टर तांबे यांचे 10 ऑगस्ट 2021 रोजी निधन झाले.

सुलोचना चव्हाण – पद्मश्री- कला क्षेत्र

सुलोचना चव्हाण या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सुलोचना कदम या मराठीतील लावणी या प्रकारासाठी ओळखल्या जाणाऱ्या गायिका.13 मार्च 1933 रोजी जन्म झालेल्या सुलोचना चव्हाण यांनी संगीत क्षेत्रातील आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला वयाच्या दहाव्या वर्षीच आरंभ केला. 1960 पासून सुलोचना चव्हाण यांंनी महाराष्ट्रातील विदर्भ, खान्देश आणि मराठवाडा या प्रदेशातील विविध शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये अनाथालये आणि रुग्णालये यांना देणगी मिळवून देण्यासाठी जाहीर कार्यक्रम केले,

डॉक्टर भुसारी यांच्या कुलधाम या रुग्णालयाला आवश्यक वैद्यकीय उपकरणे मिळवून देण्यासाठी त्यांनी नऊ लाखाचा निधी उभारला. पानशेत धरण फुटीने आलेल्या पूरातील पीडितांना मदत करण्यासाठीदेखील त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 1969 मध्ये त्या त्यांनी नागालँड मधल्या भारतीय सैनिकांसाठी कार्यक्रम केला होता.

1955 मध्ये कलगीतुरा या मराठी चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा लावणी गायली. ‘मला हो म्हणतात लवंगी मिरची’ ही त्यांची लावणी. या लावणीमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांनी आपल्या संगीत कारकिर्दीत जवळपास 70 हिंदी चित्रपटात अडीशे गाणी गायली आहेत, तर मराठी चित्रपटांमध्ये पाच हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.

सुलोचना चव्हाण यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले, त्यामध्ये त्यांना गायनासाठी मिळालेला 1965 मध्ये मिळालेला लावणीसम्राज्ञी,, महाराष्ट्र शासनाकडून 2010 मध्ये मिळालेला लता मंगेशकर पुरस्कार, तसेच 2011 मध्ये मिळालेला लावणी कलावंत पुरस्कार या पुरस्कारांचा समावेश आहे त्यांना 2012 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार सुद्धा मिळाला होता.

सोनू निगम पद्मश्री कलाक्षेत्र

सोनू निगम हे गायक संगीत दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत. झळाळत्या, उत्कट आणि उच्च रसोत्कर्षाचा अनुभव देणाऱ्या मंचीय सादरीकरणासाठी ते प्रसिद्ध आहेत.30 जुलै 1973 साली जन्मलेल्या सोनू निगम यांनी वयाच्या चौथ्या वर्षी गाण्याला सुरुवात केली. दिल्लीत मोहम्मद ताहीर जी त्यानंतर मुंबईत गुलाम मुस्तफा खान यांच्याकडून त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. सोनू यांनी 28 हून अधिक भाषांमध्ये सहा हजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. सारेगमप या संगीत स्पर्धेवर आधारित दूरचित्रवाणी कार्यक्रमाचे ते निर्माते होते.

संगीतातील स्पर्धेवर आधारित असा हा जगातील पहिला कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमाने संपूर्ण खंडातील सर्वसामान्य माणसांच्या मनातील संगीताची कल्पनाच बदलून टाकली. या कार्यक्रमाने शास्त्रीय तसेच चित्रपट संगीतातील वरिष्ठ आणि प्रसिद्ध कलाकार आणि उभरत्या तरुण कला प्रतिभावंतांना त्यांनी एका मंचावर आणले त्यामुळे संपूर्ण खंडातच संगीत क्षेत्रात क्रांती घडून आली.

‘संदेसे आते है’ या त्यांच्या सर्वाधिक लोकप्रिय गाण्याने भारतीय सैनिकांना घातलेले भुरळ अजूनही कायम आहे. ‘ये दिल दिवाना’ या वेगळ्या धाटणीच्या गाण्याने त्यांना बहुमुखी प्रतिभेचे गायक म्हणून ओळख दिली. 2014 मध्ये जल या सिनेमातील त्यांच्या गाण्याने त्यांना ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. सोनू यांना कल हो ना हो या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.

21 मार्चलाही झाला होता सोहळा

नागरी सत्कार सोहळा -I हा 21 मार्च रोजी आयोजित केला होता. राष्ट्रपतींनी 2022 या वर्षासाठीचे 128 पद्मपुरस्कार प्रदान केले. त्यामध्ये महाराष्ट्रातील दहा मान्यवर व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाले. दहा पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांपैकी 21 मार्च 2022 रोजी पुरस्कार मिळालेल्या सहा जणांची यादी खालील प्रमाणे.

पद्मभूषण

१) नटराजन चंद्रशेखरन – व्यापार आणि उद्योग

२) सायरस पूनावाला – व्यापार आणि उद्योग

पद्मश्री

१) डॉक्टर हिम्मतराव बावस्कर – वैद्यकीय क्षेत्र

२) डॉक्टर विजय कुमार विनायक डोंगरे – वैद्यकीय क्षेत्र

३) डॉक्टर भीमसेन सिंघल – वैद्यकीय क्षेत्र

४) अनिल कुमार राजावंशी – विज्ञान आणि अभियांत्रिकी

पद्म पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री असे त्याचे तीन उपप्रकार आहेत. कला, सामाजिक कार्य ,लोकसेवा, विज्ञान आणि अभियांत्रिकी , व्यापार आणि उद्योग , वैद्यक क्षेत्र, साहित्य आणि शिक्षण , क्रीडा, नागरी सेवा आदी विविध क्षेत्रातील कार्यासाठी हे पुरस्कार दिले जातात.

अपवादात्मक आणि विशेष उल्लेखनीय सेवेसाठी पद्मविभूषण, अत्युच्च उल्लेखनीय सेवेसाठी पद्मभूषण तर कोणत्याही क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेसाठी पद्मश्री दिली जाते. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला हे पुरस्कार जाहीर होतात.

Padma Awards President confers Padma Awards, winners include four dignitaries from Maharashtra, Prabha Atre awarded Padma Vibhushan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात