तामिळनाडूतील कुन्नूरमध्ये बुधवारी दुपारी एक मोठी दुर्घटना झाली. भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपिन रावत यांना घेऊन जाणारे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपिन रावत यांच्याशिवाय त्यांच्या पत्नी आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांसह १४ जण होते. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 11 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.CDS Bipin Rawat Profile Four Decades of National Service, From Surgical Strikes to Operations in the Northeast
प्रतिनिधी
नवी दिल्ली : तामिळनाडूतील कुन्नूरमध्ये बुधवारी दुपारी एक मोठी दुर्घटना झाली. भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपिन रावत यांना घेऊन जाणारे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपिन रावत यांच्याशिवाय त्यांच्या पत्नी आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांसह १४ जण होते. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 11 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
वडीलही होते सैन्यात
CDS बिपिन रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 रोजी डेहराडून येथे झाला. त्यांचे वडील एलएस रावत हे देखील सैन्यात होते आणि लेफ्टनंट जनरल एलएस रावत म्हणून ओळखले जात होते. सीडीएस रावत हे सेंट एडवर्ड स्कूल, सिमला आणि नॅशनल डिफेन्स अकादमी, खडकवासलाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी मद्रास विद्यापीठातून डिफेन्स स्टडीजमध्ये एम.फिल पदवी आणि मॅनेजमेंट आणि कॉम्प्युटर स्टडीजमध्ये डिप्लोमा केला आहे.
डिसेंबर 1978 मध्ये डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमीमधून अकरा गोरखा रायफल्सच्या 5 व्या बटालियनमध्ये त्यांची नियुक्ती झाली. त्यांना येथे ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ देखील प्रदान करण्यात आला आहे.
उच्चशिक्षित आहेत रावत
जनरल बिपिन रावत यांनी मिलिटरी मीडिया स्ट्रॅटेजिक स्टडीजवर संशोधन पूर्ण केले आणि 2011 मध्ये चौधरी चरण सिंग विद्यापीठ, मेरठ मधून त्यांना डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी प्रदान करण्यात आली. त्यांनी ‘राष्ट्रीय सुरक्षा’ आणि ‘नेतृत्व’ या विषयावर अनेक लेख लिहिले आहेत जे विविध मासिके आणि प्रकाशनांमध्ये प्रकाशित झाले आहेत.
जनरल बिपिन रावत यांना जास्त उंचीवरील लढाऊ क्षेत्रे आणि बंडखोरीविरोधी कारवाया करण्याचा अनुभव आहे. 1986 मध्ये त्यांनी चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पायदळ बटालियनचे प्रमुख म्हणून काम केले. याशिवाय त्यांनी काश्मीर खोर्यातील राष्ट्रीय रायफल्स आणि 19 इन्फंट्री डिव्हिजनच्या सेक्टरचेही नेतृत्व केले आहे. त्यांनी काँगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेचेही नेतृत्व केलेले आहे.
ईशान्येतील कारवाई अन् उरीचाही बदला
सीडीएस बिपिन रावत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्करानेही अनेक कारवाया केल्या आहेत. ईशान्येतील दहशतवाद कमी करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जून 2015 मध्ये मणिपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 18 जवान शहीद झाले होते. यानंतर 21 पॅरा कमांडोनी सीमा ओलांडून म्यानमारमध्ये NSCN- या दहशतवादी संघटनेच्या अनेक दहशतवाद्यांना ठार केले.
तेव्हा 21 पॅरा थर्ड कॉर्प्सच्या अंतर्गत होते, ज्याचे कमांडर बिपिन रावत होते. याशिवाय 29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय लष्कराने पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून अनेक दहशतवादी तळ आणि दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. उरी येथील लष्करी छावणी आणि पुलवामा येथील सीआरपीएफवर झालेल्या हल्ल्यात अनेक जवान शहीद झाल्यानंतर भारतीय लष्कराने ही कारवाई केली.
चार दशकांपासून देशाची सेवा
2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी देशाच्या तिन्ही सैन्यांमधील समन्वय अधिक सुधारण्यासाठी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) या नवीन पदाची निर्मिती करण्याची घोषणा केली होती. त्यानंतरच भारतीय लष्करप्रमुख पदावरून निवृत्त झाल्यानंतर बिपिन रावत यांनी संरक्षण दलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.
आपल्या चार दशकांच्या सेवेत जनरल रावत यांनी ब्रिगेड कमांडर, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (जीओसी) सदर्न कमांड, जनरल स्टाफ ऑफिसर ग्रेड 2 मिलिटरी ऑपरेशन्स डायरेक्टरेट, मिलिटरी सेक्रेटरी ब्रँचमध्ये कर्नल मिलिटरी सेक्रेटरी आणि डेप्युटी मिलिटरी सेक्रेटरी म्हणून काम केले. त्यांनी कमांड विंगमध्ये वरिष्ठ प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे..
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App