विनायक ढेरे
नाशिक – पश्चिम बंगालमधले ज्येष्ठ खासदार अधीर रंजन चौधरी यांच्याकडून लोकसभेतले नेतेपद काढून घेऊन ते राहुल गांधींना देण्यात येणार अशा बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. परंतु, त्यामध्ये तथ्य नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. why rahul gandhi escaping himself from responsible post of the congress party in loksabha?
उलट अधीर रंजन चौधरी यांचे लोकसभेतले नेतेपद कायम ठेऊन त्यांच्या बरोबरीला गौरव गोगोई या आसाममधल्या तरूण नेत्याची काँग्रेसचा लोकसभेतला उपनेता म्हणून सोनिया गांधींनी नियुक्ती केली आहे. त्यांच्या सोबत मनीष तिवारी आणि शशी थरूर हे देखील काँग्रेसचे प्रमुख नेते असतील.
पण या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रश्न तयार होतो तो म्हणजे, सोनिया गांधी या राहुल गांधी यांच्याकडे एखादे महत्त्वाचे पद का सोपवत नाहीत…?? राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद पुन्हा स्वीकारायला नकार दिला आहे. पण सध्या ते काँग्रेस कार्यकारिणी वगळली तर कोणत्याही मोठ्या पदावर नाहीत. अशा स्थितीत लोकसभेतले काँग्रेसचे नेतेपद त्यांना देण्याचे मध्यंतरी घाटत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. राहुलजींनी आघाडीवर राहुन लोकसभेत काँग्रेस खासदारांचे नेतृत्व केले तर पक्षाच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा संदेश जाईल, असा तर्क बातम्यांमध्ये देण्यात आला होता.
परंतु, आज आलेल्या बातम्यांमध्ये तसे काहीही झाल्याचे दिसले नाही. राहुल गांधींना कोणतेही पद सोनियांनी दिलेले नाही. याचा अर्थ राहुल गांधी हे जबाबादारीचे पद घेण्यापासून लांब राहात आहेत का…?? की सोनियांना राहुलजींच्या राजकीय समजाविषयी खात्री वाटत नाही…?? की अनेकदा राहुल गांधी बाहेर काही वक्तव्ये करून जसे वादग्रस्त किंवा चेष्टेचे कारण होतात, तसे लोकसभेत घडण्याची सोनियांना भीती वाटते आहे…?? हे समजायला मार्ग नाही.
वास्तविक राहुल गांधी यांनी लोकसभेत नेतृत्व करून आपली क्षमता सिध्द केली तर त्यांच्या नेतृत्वाविषयी एक प्रकारचा विश्वास देखील तयार होऊ शकतो. त्यांच्या “पप्पू” या प्रतिमेतून बाहेर पडण्यासही लोकसभेच्या नेतेपदाची मदत होऊ शकते. परंतु, ते जोपर्यंत प्रत्यक्ष लोकसभेच्या मैदानात येत नाहीत, तोपर्यंत नुसत्याच बातम्या आणि वावड्यांनी त्यांची आहे, ती प्रतिमा देखील खराब होते आहे, याची जाणीव सोनिया गांधींसारख्या चाणाक्ष नेत्याला अस्वस्थ करीत नाही का…?? हा प्रश्न आता तयार होऊ लागला आहे.
राहुल हे “गांधी” असल्यामुळे काँग्रेसचे अध्यक्षपद किंवा पंतप्रधानपद याच्या खालचे पद घेणार नाहीत, हा समज त्यामुळे बळकट होतो देखील. पण त्याचा राहुलजींच्या प्रतिमानिर्मितीस लाभ होण्याऐवजी तोटाच होताना दिसतो आहे.
पंतप्रधानपद हे तर फार दूर राहिले. राहुलजींनी काँग्रेस अध्यक्षपद सोडून देऊन आपण जबाबदारी घेण्याची टाळाटाळ करतोय हा समज पसरू देण्यास हातभार लावला आहे… आणि आता तर काँग्रेसच्या लोकसभेतल्या नेतृत्वाच्या बातम्या आल्या. पण सोनियाजींनी ते पद राहुलजींना दिले नाही किंवा ते त्यांनी स्वीकारले नाही. त्यामुळे तर राहुलजी हे जबाबदारीचे पद स्वीकारण्यापासून दूर पळतात, हा समज दृढ होण्यास अधिक हातभार लागतो आहे. त्याचा भविष्यकाळातला राजकीय तोटा कितीतरी अधिक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App