प्रतिनिधी
पुणे : आपल्या व्यवहारातील सर्व गोष्टी सरकारनेच करायला हव्यात हा विचार भारतीय परंपरेत कधीही करण्यात आला नाही. काही गोष्टी या सरकारच्या बरोबरीने समाजानेही करायच्या असतात, हा विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्म मानव दर्शनाच्या माध्यमातून मांडला, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी शुक्रवारी केले. The idea that the government should do everything is un-Indian; Assertion by Dattatraya Hosbale
सेंटर फॉर इंटेग्रल स्टडीज अँड रिसर्चच्या (C.I.S.R.) वतीने एकात्म मानव दर्शन संकल्पना कोशाचे पुस्तकाचे प्रकाशन कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सभागृहात होसबाळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र साठे, प्रज्ञा प्रवाहाचे राष्ट्रीय संयोजक जे. नंदकुमार आणि मुंबईच्या एकात्म प्रबोध मंडळाचे रवींद्र महाजन व्यासपीठावर उपस्थित होते.
सरकार्यवाह होसबाळे म्हणाले, की दुसरे महायुद्ध आणि शीतयुद्धानंतर जगात एक पोकळी निर्माण झाली. आता इतिहासाचा अंत झाल्याचे तज्ज्ञ म्हणू लागले. परंतु तसे झाले नाही. इतिहासाचा अंत होऊ शकत नाही आणि प्रत्येक पिढी स्वतःचा इतिहास घडवते. आता जग खऱ्या सुखाच्या शोधात आहे. हे सुख फक्त भारतीय तत्त्वज्ञान पुरवू शकते, हे उपाध्याय यांनी दाखवून दिले.
ते पुढे म्हणाले की, देश जेव्हा पाश्चात्य आणि समाजवादी विचारांवर वाटचाल करत होता तेव्हा एकात्म मानववादाची मांडणी करण्याचे धाडस उपाध्याय यांनी केले. तेव्हा त्यांची खूप टिंगल आणि उपहास झाला. मात्र आज तेच विचार मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु या विचारांचा व्हावा तेवढा अभ्यास झाला नाही.”
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, “एकात्म मानववाद हा केवळ भारतासाठी नाही तर जगासाठी आहे. आपले चिंतन केवळ स्वतःपुरते किंवा कुटुंबापुरते नसेल तर वसुधैव कुटुंबकम या कल्पनेनुसार असेल. आज जगाला हे कळत आहे, की केवळ साम्यवाद आणि भांडवलवाद हे दोनच मार्ग नाहीत तर एक तिसरा मार्गही आहे. आणि तो एकात्म मानव दर्शनाचाच असेल.”
एकात्म मानव दर्शन संकल्पनाकोश
या कोशाची माहिती देताना रवींद्र महाजन म्हणाले की या कोशामध्ये राष्ट्रजीवनाशी संबंधित अशा 131 मूलभूत संकल्पना एकात्म मानव दर्शनाच्या संदर्भात मांडल्या आहेत. धर्म व तत्त्वज्ञान, समाज, आर्थिक व अभिशासनिक अशा चार विभागांत त्यांची विभागणी करण्यात आली आहे. त्यात त्या संकल्पनेचे मूळ, भारतीय चिंतनात ती कुठे येते, आजचा तिचा संदर्भ, अधिकारी व्यक्तींची मते, आज त्यातून दिसणारे भाव व खरे अनुस्यूत असलेले भाव, करणीय कार्य इ. संबंधित पैलूविषयी विवेचन करण्यात आलेले आहे.
तसेच अपप्रचारामुळे खऱ्या अर्थाबद्दल संभ्रम निर्माण केल्या जाणाऱ्या धर्म, अध्यात्म, धर्मराज्य, संस्कृती इ. संकल्पना, चुकीच्या अर्थाने वापरलेल्या सेक्युलॅरिजम, अधिकार, दंड इ. संकल्पना, तसेच सध्या प्रचारात असलेल्या काही पाश्चात्य संकल्पना यांचे खरे स्वरूप स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या चार वर्षापासून दृष्टीने प्रयत्न करत या कोशाची निर्मिती करण्यात आली आहे.
कार्यशाळा
या ग्रंथ प्रकाशनच्या निमित्ताने एकात्म मानव दर्शन या विषयातील विविध बाबींचा विचार करणारी एक कार्यशाळाही आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत एकात्म मानव दर्शन आणि त्यातील विविध बाबी यांच्या संदर्भात विविध सत्रे झाली. आहेत. जे. नंदकुमार, अर्थतज्ज्ञ वरदराज बापट, माजी केंद्रीय मंत्री महेशचंद्र शर्मा आणि प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
सीआयएसआरचे कार्यवाह हरिभाऊ मिरासदार यांनी प्रास्ताविकात ग्रंथलेखनाच्या उद्देशाविषयी माहिती दिली. ग्रंथ लेखनात योगदान देणाऱ्या लेखकांपैकी काहींचा प्रातिनिधिक स्वरूपात यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रा. प्रशांत साठे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App