नाशिक : भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार युवकांना कॉकरोच म्हणजे झुरळ म्हटले काय आणि त्यातून अचानक एक राजकीय पक्षाचा उदय झाला काय!! सगळेच एखाद्या अद्भुत कथेप्रमाणे घडत गेले.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्यानंतर अवघ्या चार-पाच दिवसांमध्ये कॉकरोच जनता पार्टी उदयाला आली आणि त्या पार्टीने भाजपच्या फॉलोवर्सच्या संख्येला सुद्धा मागे टाकले. लवकरच काँग्रेसच्या फॉलोवर्सच्या संख्येला सुद्धा ती पार्टी मागे टाकेल, असे बोलले गेले. त्यामुळे सोशल मीडियासह बाकीच्या माध्यमातून सुद्धा या पार्टीने धुमाकूळ घातला. भारताच्या राजकारणात जणू काही फार मोठी क्रांती झाली, प्रस्थापित पक्षांना छेद देणारी व्यवस्था निर्माण झाली, असा भास माध्यमांमधल्या काही गणनांनी प्रस्थापित करायचा प्रयत्न केला.
भ्रम आणि वास्तव
पण प्रत्यक्षात कॉकरोच जनता पार्टी आणि तिच्या सोशल मीडिया प्रभावाचा थोडा आढावा घेतला तर त्या मागचा भ्रम आणि वास्तव उघडकीस आले.
आम आदमी पार्टीची उपज
मूळात कॉकरोच जनता पार्टी ही काही एखाद्या हवेतून अचानक निर्माण झाली, असे जरी भासविले गेले तरी प्रत्यक्षात ती आम आदमी पार्टीचा सोशल मीडिया हँडल करणाऱ्या अभिजीत दिपके नावाच्या मराठी तरुणाच्या डोक्यातून बाहेर आली हा तरुण मूळचा छत्रपती संभाजी नगरचा असला तरी तो सध्या अमेरिकेत कम्युनिकेशन विषयात शिक्षण घेतोय त्याने 2020 ते 2023 या कालावधीत आम आदमी पार्टीचे सोशल मीडिया हँडल सांभाळले होते. अभिजीत दिपकेच्या या माहितीतूनच कॉकरोच जनता पार्टीचे भ्रम आणि वास्तव समोर आले.
अभिजीत दिपके आणि केजरीवाल
आज कॉक्रोच जनता पार्टीला ज्या पद्धतीने सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला मिलियन फॉलोवर्स मिळाले, तसेच आम आदमी पार्टीच्या बाबतीत सुरुवातीला झाले होते आज अभिजीत दिपके हा तरुणांचा मसीहा बनला बनल्याचे चित्र निर्माण झाले, तसेच चित्र अरविंद केजरीवालांच्या बाबतीत सुरुवातीला निर्माण झाले होते पण नंतर काय घडत गेले आणि कसे घडत गेले हा इतिहास फार जुना नाही किंबहुना तो सध्याच्या वर्तमानाचाच भाग आहे. अरविंद केजरीवाल जेवढ्या झपाट्याने उदयाला आले, त्यापेक्षा जास्त वेगाने अस्तंगत झाले. त्यांची आम आदमी पार्टी जेवढ्या वेगाने देशभर पसरली तेवढ्या वेगानेच ती ओसरून दिल्लीतून गायब झाली आणि आता पंजाबपुरती सीमित उरली.
प्रतिसाद आणि अंमलबजावणीचा खरा प्रश्न
आम आदमी पार्टीने सुद्धा तरुणांना महिलांना आणि देशातल्या सामान्य जनतेला अशीच भव्य दिव्य स्वप्न दाखविली होती. तरुणाईच्या व्यवस्थेविरुद्धच्या संतापाला चॅनेलाईज केले होते. त्यामुळे सुरुवातीला आम आदमी पार्टीला असाच प्रतिसाद मिळाला होता, जो प्रतिसाद अभिजीत दिपकेला आज मिळतोय. अभिजीत दिपकेने कॉकरोच जनता पार्टीला मिळालेल्या प्रतिसादाच्या आधारे मोठा राजकीय पक्ष स्थापन करायची चाचपणी सुरू केल्याची मुलाखत दिली. त्याने कॉकरोच जनता पार्टीचा भला मोठा जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध केला तो अर्थातच आम आदमी पार्टी सारखा भव्य दिव्य असाच आहे. पण प्रश्न फक्त त्याच्या पार्टीला कुठे कसे आणि किती यश मिळते याचा आणि त्याच्या जाहीरनाम्याच्या अंमलबजावणीचा आहे.
फॉलोवर्स आणि मतांमधली विसंगती
पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा सोशल मीडियातले फॉलोवर्स तिथे मिळणारा प्रतिसाद आणि भारतीय राजकारणाचे वास्तव यात प्रचंड तफावत झाल्याचे गेल्या काही निवडणुकांमधून स्पष्ट झाले. राहुल गांधी यांना सुद्धा प्रचंड फॉलोवर्स मिळाले, पण काँग्रेसला तेवढ्या प्रमाणात मते मिळाल्याचे दिसले नाही. महाराष्ट्रात रूपाली ठोंबरे, अभिजीत बिचकुले यांचे फॉलोवर्स सुद्धा मिलियन मध्ये आहेत पण प्रत्यक्षात त्यांना निवडणुकीत मिळालेली मते शेकड्यांमध्येच आहेत. याचा अर्थ असा की सोशल मीडियातले फॉलोवर्स आणि प्रत्यक्षात मिळणारी मते यांचे गणित आता परस्पर विसंगतीच्या दिशेने गेले आहे. त्यात सुसंगती फार उरलेली दिसत नाही. अशा स्थितीत आज जरी अभिजीत दिपके याच्या कॉकरोच जनता पार्टीला प्रचंड फॉलोवर्स मिळाले असले आणि त्यातून फार मोठा राजकीय पक्ष उभा करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा असली, तरी आम आदमी पार्टीचा अनुभव आणि बाकीच्या पक्षांचा अनुभव त्याला छेद दिल्याशिवाय राहणार नाही, हेच आजच्या भारतीय राजकारणाचे भ्रम आणि वास्तव आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App