विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो रेटमध्ये कपात केली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर याबाबतची घोषणा केली. त्यानुसार, रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये 0.50 बेसिस पॉईंटची कपात केली आहे. त्यामुळे आता रेपो रेट (Repo Rate) हा 5.50 % पर्यंत खाली आला आहे. याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होऊ शकतो.
रेपो रेटमध्ये कपात झाल्यावर बँकांकडून सर्वसाधारणपणे गृहकर्ज आणि वाहन कर्जाचे व्याजदर घटवले जातात. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने रेपो रेट 0.25 बेसिस पॉईंटने कमी केला होता. तेव्हा देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँकेने (SBI) गृहकर्जाचा व्याजदर कमी केला होता. त्यामुळे आता रेपो रेटमध्ये इतक्या मोठ्या कपातीनंतर देशभरातली खासगी आणि सार्वजनिक बँका कर्जाचे व्याजदर कमी करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सामान्यांना काय फायदा??
गृह कर्ज : 50 लाख व्याजदर : 8 % काळ : 20 वर्षांसाठी प्रति महिना बचत : 1542 रुपये
चारचाकी वाहन कर्ज : 10 लाख वाहन कर्ज : 9 % काळ : 5 वर्षांसाठी प्रति महिना बचत : 241 रुपये
यापूर्वी रिझर्व्ह बँकेने सलग दोनवेळा रेपो रेटमध्ये प्रत्येकी 0.25 बेसिस पॉईंटची कपात केली होती. यानंतर आता पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये 0.50 बेसिस पॉईंटची घसघशीत कपात करण्यात आली आहे. यामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या दरात कपात होण्याची दाट शक्यता आहे. आरबीआयनं सीआरआर रेशोमध्ये 1 टक्क्यांची कपात केल्याने कॅश रिव्हर्स रेशो 4 टक्क्यांवरून 3 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आगामी काळात देशातील महागाई दरही 4 टक्क्यांच्या खाली राहण्याची शक्यता आहे. परंतु, भारतीय अर्थव्यवस्थेला अपेक्षित विकास दर गाठता आलेला नाही.
आर्थिक वर्ष 2025 – 26 मध्ये आर्थिक विकास दर 6.5 % टक्के राहण्याचा अंदाज होता तो तसाच ठेवण्यात आला आहे भू-राजकीय तणाव आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे विकास दर वाढण्यात अडचणी येत असल्याचे रिझर्व्ह बँकेचे मत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हातात अधिक पैसा खेळता राहून बाजारपेठेतील मागणी वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.50 बेसिस पॉईंट इतकी मोठी कपात केल्याचे मानले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App