नाशिक : कॅमेरे लावले, भिंग लावली, सूत्रे धुंडाळली, धागेदोरे तपासले, आतल्या – बाहेरच्या गोटात जाऊन आले, बाराखंबा रोड वरचे सगळे मजले चढून – उतरून तपासले, पण “माध्यमवीरांना” भाजपचे 3 मुख्यमंत्री अजूनही नाही “सापडले”!! Main stream media failed to make inroads into BJP’s inner circle to capture the surefire names of 3 chief ministers!!
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या 3 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा “शोध” माध्यमे निवडणुकांच्या आधीपासून घेत आहेत, पण ते कुठल्याही सूत्रांच्या हवाल्याने माध्यम प्रतिनिधींना बिलकुलच मिळत नाहीयेत. विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळवलेल्या भाजप आमदारांपेक्षा आणि नेत्यांपेक्षा माध्यमेच त्यामुळे हैराण झाली आहेत. वेगवेगळ्या नावांवर वेगवेगळे कयास लावत लागत आहेत. सट्टे लागत आहेत. सट्ट्यांच्या सूत्रांच्या आधारे माध्यमे वेगवेगळी नावे चालवत आहेत, पण त्यातले कुठलेच नाव अजून “फिक्स” झालेले नाही आणि “फिट” बसलेले नाही!!
राजस्थानात वसुंधरा राजे मुख्यमंत्री होणार की बाबा बालकनाथ??, की गजेंद्र सिंह शेखावत की अर्जुन राम मेघवाल?? की मोदींच्या मनात भलतेच कोणी आहे?? याचे कयास लावून “माध्यमवीर” थकले. स्वतः वसुंधरा राजे जयपूर – दिल्ली – पुन्हा जयपुर – पुन्हा दिल्ली अशा दोनदा वाऱ्या करून आल्याच्या बातम्या आल्या, पण राजस्थानात मुख्यमंत्री कोण?? या यक्षप्रश्नाचे उत्तर कोणालाही मिळाले नाही. भाजपने तिथे निरीक्षक नेमले आणि तिथे रविवारी बैठक होणार आहे याखेरीज कुठलीही “कन्फर्म” बातमी माध्यमांकडे उपलब्ध नाही!!
जे राजस्थानचे, तेच मध्य प्रदेशचे. तिथे शिवराज सिंह चौहान यांच्याबरोबर 3 केंद्रीय मंत्र्यांना माध्यमांनी परस्पर मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये उतरवले. नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल आणि ज्योतिरादित्य शिंदे हे ते तीन केंद्रीय मंत्री आहेत. फग्गन सिंह कुलास्ते निवडणूक हरल्याने ते रेस मधून माध्यमांनीच परस्पर बाहेर काढून टाकले.
वसुंधरा राजे जशा दिल्ली वारी करून आल्या, तशी दिल्ली वारी करण्याच्या फंदात शिवराज सिंह चौहान पडले नाहीत. त्यावरून काही “माध्यमवीरांनी”, “शिवराज सिंहांकडून शिका”, असा वसुंधरा राजेंना उपदेश करून घेतला. अर्थात त्या उपदेशाचा त्यांना काही फरक पडलाय का??, नाही हे कळायला त्या “माध्यमवीरांनाही” दुसरा मार्ग नाही.
छत्तीसगडमध्ये तर रमण सिंह आणि रेणुका सिंह हे एक दोन अपवाद वगळता माध्यमांकडे देखील मुख्यमंत्रीपदाच्या रेस मधली नावे नाहीत. छत्तीसगडमध्ये भाजपने काँग्रेसवर मात केली, या धक्क्यातून जितकी काँग्रेस अजून सावरलेली नाही, त्यापेक्षाही सावरायला माध्यमांना जास्त वेळ लागतो आहे. त्यामुळे छत्तीसगडमध्ये एक दोनच नावे वगळून माध्यमे तिसरे किंवा चौथे नावच मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये आणत नाहीत. कारण त्यांच्याकडे ते नावच उपलब्ध नाही.
पण मूळात 3 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नावांचा अचूक कयास माध्यमांना का लावता येत नाही?? दिल्ली, भोपाळ, जयपूर आणि रायपूर मध्ये एवढे माध्यम प्रतिनिधी, त्यांचे कॅमेरे, त्यांची भिंगे, त्यांची सूत्रे, त्यांचे धागेदोरे, आतली बाहेरची गोटे हे सगळे उपलब्ध असताना माध्यमांना तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाचा अचूक यास का लावता येत नाही?? या सवालाने “माध्यमवीरांची” डोकी भणाणली आहेत.
पण खरंच आपल्याला या सवालाचे उत्तर का सापडत नाही??, याचा नेमका विचार करायची मात्र माध्यमवीरांची तयारी नाही. कारण हे उत्तर इतके साधे सरळ सोपे नाही. याचे खरे कारण हे आहे, की माध्यमे आजही भाजप मधल्या राजकीय घडामोडींचे रिपोर्टिंग काँग्रेसी घडामोडींच्या धर्तीवरच करतात. त्यांना काँग्रेसमधल्या गटातटांमुळे बातम्या मिळतात आणि तशाच बातम्या आपल्याला भाजपच्या गटातटांमधून मिळतील असे त्यांना वाटते की जी बिलकुलच वस्तुस्थिती नाही.
माध्यमांकडे भाजप मधले सोर्सेसच नाहीत
काँग्रेसमध्ये भरपूर गट तट आहेत. ती आता काँग्रेसची राजकीय संस्कृती बनली आहे. त्यामुळे परस्पर विरोधी बातम्या पेरणे हे काँग्रेसचे गटातटांमधलेच नेते करत असतात. त्यामुळे माध्यम प्रतिनिधींना काँग्रेसमधील वेगवेगळी सूत्रे कायम उपलब्ध राहतात. काँग्रेस मधली सर्व सूत्रे, आपली बाहेरची गोटे बातमी “लिक” करण्यामध्ये माहीर आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मिळणाऱ्या बातम्या “लीक” करून अनेक “माध्यमवीर” मोठे झाले. आपणच एक्सक्लुझिव्ह बातम्या आणू शकतो असा दंभ आणि अहंकार त्यांना चढला, पण हा अहंकार भाजप मधल्या अतिवरिष्ठ नेत्यांनी एका झटक्यात उतरवला आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये भाजपमध्ये कुठलीही सूत्रे, आतले बाहेरचे गोट बातम्या “लीक” करण्याची हिंमतच करू शकत नाहीत. त्यापलीकडे जाऊन “माध्यमवीरांकडे” भाजपच्या आतल्या किंवा बाहेरच्या गोटांमध्ये किंवा सूत्रांकडे कुठलेही “सोर्सेसच” उपलब्ध नाहीत, असलेच तर ते कुचकामी ठरतात हा अनुभव आहे.
“माध्यमवीरांच्या” बुद्धीची कमतरता
उत्तर प्रदेशात 2017 मध्ये योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री होतील याची साधी भनकही माध्यमांना लागली नव्हती. ते राजनाथ सिंहांभोवतीच “घुटमळत” राहिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे असे अनेक निर्णय माध्यमांना सहज “चकवा” देऊन जातात. मध्य प्रदेशात 3 केंद्रीय मंत्री आणि 7 खासदार विधानसभा निवडणुकीत उतरतील याची दोन ओळींची बातमी देखील यादी जाहीर होण्यापूर्वी माध्यमे देऊ शकली नव्हती. माध्यमे मोदींच्या अशा निर्णयांना “सरप्राईज एलिमेंट” म्हणतात. पण यात मोदींच्या “सरप्राईज एलिमेंट” पेक्षा “माध्यमवीरांच्या” बुद्धीची कमतरता दिसून येते आणि ते काँग्रेसी रिपोर्टिंगच्या स्टाईलवरच भाजपचे मुख्यमंत्री “ठरवायला” जातात आणि अपयश पदरात पाडून घेतात. माध्यमांची सूत्रे, आतल्या बाहेरच्या गोटांमधले धागेदोरे भाजपच्या अतिवरिष्ठ नेतृत्वासमोर असे पूर्ण “फेल” गेली आहेत!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App