विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न किताब जाहीर करण्यापाठोपाठ माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह, कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनाही भारतरत्न किताब जाहीर केला. त्याबद्दल देशातून समाधान व्यक्त होत असताना भारतरत्न किताब मागणीच्या यादीत आता एकापाठोपाठ एक भर पडत चालली आहे.Kanshiram and Balasaheb thackeray are now included in the Bharat Ratna demand list
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न किताब जाहीर करावा ही सर्वांत जुनी मागणी आहे. शिवसेनेने अखंड असताना आणि फुटल्यानंतरही ती मागणी कायम लावून धरली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात त्यावेळच्या शिवसेना-भाजप महायुतीने सावरकरांना भारतरत्न देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, ते आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. आता जुनी महायुती सत्तेवर नाही, पण आधी शिवसेना फुटून आणि त्यानंतर राष्ट्रवादी फुटून भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसली आहे, तरी देखील मोदी सरकारने सावरकरांना अद्याप भारतरत्न किताब जाहीर केलेला नाही.
पण नरसिंह राव आणि चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न किताब जाहीर झाल्याबरोबर बाकीच्या नेत्यांच्या अनुयायांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना नवे धुमारे फुटले आहेत. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी अन्य नेत्यांना भारतरत्न किताब जाहीर केल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे, पण त्याच वेळी बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम यांना भारतरत्न किताब बहाल करण्याची मागणी केली आहे.
त्यांच्यापाठोपाठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षांनी बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न किताब बहाल करण्याची मागणी केली आहे. चौधरी चरण सिंह यांना जर भारतरत्न किताब जाहीर होऊ शकतो. त्यासाठी मोदी सरकार उत्तर भारतातल्या काही राजकीय समीकरणांचा विचार करू शकते, तर महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न किताब जाहीर करून महाराष्ट्रातल्याही राजकीय समीकरणांचा नव्याने विचार करू शकते, असे बाळासाहेब ठाकरे यांच्या अनुयायांना वाटते. त्यामुळे संजय राऊत आणि राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचे नाव भारतरत्न किताबाच्या शर्यतीत आणले आहे.
यापूर्वी बाळासाहेबांच्या अनुयायांनी फक्त सावरकरांचे नावच भारतरत्न किताबासाठी लावून धरले होते, पण त्या पाठोपाठ आता नवीन राजकीय समीकरणे लक्षात घेऊन त्यांनी बाळासाहेबांचे नावही भारतरत्न किताबाच्या शर्यतीत आणले आहे. भारतरत्न किताबाच्या लोकशाहीकरणाचा हा परिणाम आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App