1971 ते 1975 या काळात देशातली अंतर्गत परिस्थिती सर्वसामान्य जनतेच्या आवाक्या बाहेर चालली होती पण सरकारवरची इंदिरा गांधींची पकड अत्यंत मजबूत होती. ही मजबूत पकड ढिल्ली करण्यासाठी सगळे विरोधक आतुर होते. त्यात “आंतरराष्ट्रीय बौद्धिके” देणारे समाजवादी जास्त आघाडीवर होते, पण त्यांच्यात नेते जास्त आणि कार्यकर्ते कमी असे असल्याने त्यांचा इंदिरा गांधींना असलेला विरोध फारच तोकडा पडत होता. त्यातच “अतिबौद्धिक” कम्युनिस्ट सुद्धा समाजवाद्यांच्या बाजूने नव्हते. त्यावेळी जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीची घोषणा दिली. देशामध्ये संपूर्ण क्रांती झाल्याशिवाय देशाच्या समस्यांना खरे उत्तर मिळणार नाही, असा त्यांचा दावा होता. त्यांनी पोलीस आणि प्रशासनाला सरकारचे बेकायदा आदेश अमान्य करण्याचे आवाहन केले होते. पण इंदिरा गांधींनी तेच आवाहन सरकार विरोधातले बंड मानले आणि ते चिरडण्यासाठी आणीबाणी नावाच्या शस्त्राचा वापर केला. Jaiprakash
वास्तविक जयप्रकाश नारायण हे मूळचे काँग्रेसी विचारसरणीचे. त्यांना पंडित नेहरूंनी उपपंतप्रधान करण्याची ऑफर दिली होती, पण ती जबाबदारी त्यांनी नाकारली. त्या ऐवजी त्यांनी समाजवादाची कास धरली. ते देशभर वेगवेगळी आंदोलने उभे करत राहिले. वेगवेगळ्या आंदोलनांना बौद्धिक इंधन पुरवठा करीत राहिले. या सगळ्या कालावधीत मधु लिमये, कर्पुरी ठाकूर, ना. ग. गोरे, एस. एम. जोशी, जॉर्ज फर्नांडिस या मोठ्या नेत्यांनी जयप्रकाश यांच्या संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. पण या समाजवादी नेत्यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांचे पुरेसे बळच नव्हते. मुलायम सिंग यादव, लालूप्रसाद यादव, कुमार सप्तर्षी हे त्यावेळी फार छोटे कार्यकर्ते होते. समाजवादी आंदोलनात कायम नेते मोठे आणि कार्यकर्ते कुठेच नाहीत अशी अवस्था नेहमीच असायची. त्यामुळे जयप्रकाश नारायण यांचे संपूर्ण क्रांतीचे आंदोलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी पेलले होते.
– अटक झालेले 80 % कार्यकर्ते संघाचे
इंदिरा गांधींच्या आणीबाणी लागू करायच्या निर्णयामुळे सगळ्या विरोधकांना एकवटायची संधी मिळाली. ज्येष्ठता क्रमानुसार त्यांचे नेतृत्व आपोआपच जयप्रकाश नारायण यांच्याकडे आले. स्वतः जयप्रकाश हे समाजवादी विचारांचे असून देखील त्यांच्या मर्यादित अनुयायांमुळे त्यांचे आंदोलन पुढे सरकूच शकत नव्हते. संघाच्या स्वयंसेवकांनी ते पुढे सरकवले. आणीबाणीच्या काळात संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस आणि जयप्रकाश नारायण यांच्यात बैठका झाल्या. जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनाला संघाने अधिकृत रित्या कधी पाठिंबा दिला नाही, पण इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या विरोधात मात्र आंदोलन उभे करण्यात मोठा हातभार लावला. त्यामुळेच आणीबाणी विरोधातल्या दडपशाहीमध्ये संघाचे स्वयंसेवक जास्त भरडले गेले. आणीबाणी विरोधात रस्त्यांवर आंदोलन करून तुरुंगवास पत करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये 80 % कार्यकर्ते संघाचे होते. त्यांची संख्या 44965 एवढी होती. उरलेले 15 – 20 % कार्यकर्ते समाजवादी विचारसरणीचे होते. त्यामुळे जयप्रकाश नारायण यांची संपूर्ण क्रांती समाजवाद्यांनी सोडून दिली वाऱ्यावर आणि संघाच्या स्वयंसेवकांनी चालविले आंदोलन अशी अवस्था होती. आणीबाणी विरोधातल्या आंदोलनात कम्युनिस्ट कुठेही नव्हते.
– देवरसांचे समझोत्याचे प्रयत्न
अशा स्थितीत बाळासाहेब देवरस यांनी इंदिरा गांधींना सन्मान जनक समझोता करण्यासाठी तीन पत्रे लिहिली. परंतु, इंदिरा गांधींनी त्या एकाही पत्राचे उत्तर दिले नाही. कारण आपली संघाला सहानुभूती आहे किंवा संघाला आपल्याविषयी सहानुभूती आहे, असे चित्र त्यांना उभे राहू द्यायचे नव्हते. आणीबाणी विरोधातल्या आंदोलनात अटक झालेल्यांपैकी 80 % टक्के कार्यकर्ते संघाचे होते, तर त्यांच्याप्रती सरसंघचालक म्हणून माझे काही कर्तव्य नाही का?, त्यांना तुरुंगातून सोडविण्यासाठी मी प्रयत्न केले तर काय चूक झाले?, असे विचारून बाळासाहेब देवरस यांनी इंदिरा गांधींशी सन्मानजनक समझोता करायचे समर्थन केले होते. याची साक्ष ज्येष्ठ पत्रकार के. आर. मलकानी यांनी दिली. ते स्वतः आणीबाणीत 16 महिने तुरुंगात होते.
– दुहेरी सदस्यत्वाचा वैचारिक गोंधळ
समाजवाद्यांपैकी सगळे नेते कारावासात होते हे खरे, पण त्यांच्याबरोबर कार्यकर्ते कुणी नव्हते. पण याच समाजवाद्यांनी 1977 नंतर वैचारिक गोंधळ घालून जनता पक्ष फोडला. त्या पक्षाला व्यवस्थित सत्ता चालवू दिली नाही. जनता पक्षाचे सदस्यत्व की संघाचे सदस्यत्व यापैकी एकच सदस्यत्व टिकवता येईल, असा गोंधळ घालून समाजवादी नेते मधु लिमये यांनी जनता पक्षात फूट पाडण्यात चिथावणी दिली. इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी त्यांना संघाचे स्वयंसेवक चालले, पण जनता पक्षाचे सरकार चालविण्यात त्यांना संघाचे स्वयंसेवक नको होते. समाजवाद्यांच्या या दुटप्पी वागण्यामुळे जनता पक्ष फक्त 28 महिने राज्य करू शकला. त्यानंतर 1980 मध्ये लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागल्या. त्यातून इंदिरा गांधींना come back ची संधी मिळाली. समाजवाद्यांच्या दुटप्पी वर्तणुकीमुळे इंदिरा गांधींची सत्ता पुन्हा देशावर आली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App