विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पडद्यापुढे हसरे चेहरे, पडद्यामागे दबाव; NDA आणि INDI आघाड्यांमध्ये मित्र पक्षांकडूनच जास्तीत जास्त लाभ खेचण्याचा चाललाय डाव!!, असेच राजधानी नवी दिल्लीत आणि मुंबईत चाललेल्या घडामोडींचे वर्णन करावे लागेल. Contradictions emerged in NDA and INDI alliances to grab more from victory and losses
देशातल्या जनतेने लोकसभा निवडणुकीत असा काही कौल दिला आहे की, त्यामुळे ना भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी धडपणे सत्तेवर येताना दिसत आहे, ना काँग्रेस प्रणित “इंडी” आघाडीला पुरेसे समाधान मिळाले आहे. यात “इंडी” आघाडीला फक्त एकच समाधान मिळाले, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही.
महाराष्ट्रात काँग्रेसची दादागिरी
यापेक्षा पलीकडे “इंडी” आघाडीमध्ये राजकीय विसंगतीस तयार झाली आहे. याचे प्रत्यंतर महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला 14 खासदार मिळाल्यानंतर महाविकास आघाडीत त्यांची दादागिरी वाढली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रात काँग्रेसला महाविकास आघाडी 150 जागा विधानसभेसाठी लढवायला मिळाल्या पाहिजेत अशी मागणी करत प्रत्यक्षात तशी घोषणा करून टाकली. संजय राऊत यांनी महाविकास आघाडी 185 जागा जिंकेल, अशी घोषणा केली. त्यामुळे काँग्रेसला जर त्यांच्या मागणीनुसार 150 जागा द्यायची वेळ आली, तर महाविकास आघाडी 185 जागा जिंकणार… मग महाराष्ट्रात इतर पक्षांना किती वाट्याला येणार??, असा सवाल तयार झाला.
चंद्राबाबू + नितीश कुमार यांचा दबाव
दुसरीकडे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी भक्कमपणे नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभे राहण्याची घोषणा केली. मोदींच्या निवासस्थानी झालेल्या राष्ट्रीय लोकशाही या गाडीच्या बैठकीतून सगळ्या नेत्यांचे “व्हिक्टरी साइन” केल्याचे फोटो प्रसिद्ध झाले. फोटोमध्ये सगळ्यांचे चेहरे हसरे होते. त्यामुळे पडद्यापुढे सगळे हसलेले दिसले, पण पडद्यामागे मंत्री पदांसाठी दबाव सुरू झाला.
चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देशमचे 15 खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना लोकसभेच्या सभापतीपदा बरोबरच ग्रामीण विकास, आरोग्य, रस्ते बांधणी आणि अर्थ मंत्रालय हवे असल्याची बातमी समोर आली आहे. नितीश कुमार यांना प्रत्येक 4 खासदारामागे एक अशी 3 मंत्री पदे हवी आहेत. त्यामुळे मोठी मंत्रिमंडळाचा पूर्ण तोंडावळाच बदलणार आहे. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचा विशिष्ट दबाव पंतप्रधान नरेंद्र मोदींना सहन करावा लागणार आहे. त्यातच नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी संरक्षण दल सुधारणा योजना अर्थात अग्निवीर योजना बदलायची मागणी केल्याची बातमी आली आहे. त्यामुळे मोदींना आपला मूळ अजेंडा बाजूला ठेवून “कॉमन मिनिमम प्रोग्रॅम”वर सरकार चालवावे लागण्याची शक्यता आहे.
“इंडी” आघाडीच्या सरकारला ब्रेक
दुसरीकडे “इंडी” आघाडीत राहुल गांधींचे नेतृत्व वेगाने पुढे आल्यानंतर त्यांच्या सरकार बनविण्यासाठी निघालेल्या “इंडी” आघाडीच्या गाडीला ब्रेक लागला. मल्लिकार्जुन खर्गे यांना “आम्ही योग्य वेळेची वाट पाहू”, असे सांगावे लागले. कारण “इंडी” आघाडीत भाजपच्या पराभवासाठी सगळे एकत्र आले असले, तरी त्यांचा हेतू फक्त भाजपचा पराभव करण्याचा होता. तो त्यांनी मर्यादित अर्थाने साध्य केला. त्या पलीकडे जाऊन “इंडी” आघाडीच्या पाठिंब्याच्या बळावर राहुल गांधींना पंतप्रधान करणे हा काही त्या आघाडीच्या नेत्यांचा मूळ इरादा नव्हता. त्यामुळे काँग्रेसमध्ये राहुल गांधींचे नेतृत्व पुढे आले, तर आपल्याला धोका उत्पन्न होईल याची जाणीव “इंडी” आघाडीतल्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना झाल्याबरोबर त्यांनी “इंडी” आघाडीचे सरकार बनवण्याच्या प्रयत्नांना ब्रेक लावला. त्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे यांना, “आम्ही योग्य वेळेची वाट पाहू”, असे सांगावे लागले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App