विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसच्या बळावर अखिलेश यादवांना उडायचे आहे राष्ट्रीय स्तरावर; पण काँग्रेसने वेळीच डाव ओळखून समाजवादी पार्टीला लावली कातर!! (कात्री), असे राजकारण नवी दिल्लीत शिजले.
लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशातून समाजवादी पार्टीचे तब्बल 37 खासदार निवडून आणल्यानंतर अखिलेश यादव यांची महत्त्वाकांक्षा उफाळली. त्यांना राष्ट्रीय राजकारणामध्ये संचार करायचे वेध लागले. या निमित्ताने परस्पर काँग्रेसला काटशह देता आला तर पाहावा, असे मनसूबे अखिलेश यादव रचायला लागले. पण काँग्रेसने वेळीच हा धोका ओळखून अखिलेश यादव यांच्या पंखांना कात्री लावली.
महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसशी युती करायचा प्रस्ताव अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीने दिला. महाराष्ट्र आणि हरियाणात विशिष्ट जागा लढवून मतांची टक्केवारी वाढवून समाजवादी पार्टीला राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष म्हणून मान्यता मिळवायचा अखिलेश यादव यांचा डाव होता. त्यासाठी त्यांना काँग्रेसचे बळ वापरायचे होते.
काहीच दिवसांपूर्वी अखिलेश यादव यांनी महाराष्ट्रात मुंबईत एक मोठा कार्यक्रम घेऊन समाजवादी पार्टीच्या 25 खासदारांचा सत्कार केला होता. त्यावेळी त्यांनी काँग्रेसला महाविकास आघाडीत समाजवादी पार्टीला सामील करून घेण्याचा प्रस्ताव दिला होता. पण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने तो प्रस्ताव अद्याप तरी खुंटीला टांगून ठेवला आहे.
त्यानंतर आता समाजवादी पार्टीने हरियाणामध्ये काँग्रेसची युती करण्याचा प्रस्ताव देऊन 90 पैकी 12 जागा मागितल्या. परंतु हरियाणा प्रदेश काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांनी समाजवादी पार्टीचा तो प्रस्ताव फेटाळला. समाजवादी पार्टी आणि आम आदमी पार्टी यांच्याशी काँग्रेसची राष्ट्रीय पातळीवर आघाडी असली, तरी काँग्रेसने प्रदेश पातळीवर त्या पक्षांशी आघाडी करण्याचे काहीच कारण नाही, अशी स्पष्टोक्ती हुडा यांनी केली. त्यामुळे काँग्रेसच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर उडण्याचा अखिलेश यादव यांचा मनसूबा उधळला गेला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App