विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जावे लागले दारू घोटाळ्यातल्या आरोपांमुळे तुरुंगात; पण जेलमध्ये आपण भगतसिंगांची डायरी वाचली, असे सांगून त्यांनी पापक्षालनाचा प्रयत्न केला.
अरविंद केजरीवालांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर ते दोनच दिवसांपूर्वी तुरुंगाबाहेर आले. आज ते आम आदमी पार्टीच्या कार्यालयात गेले. तिथे कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना त्यांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडायची घोषणा केली, पण त्यावेळी त्यांनी असे काही भाषण केले, की त्यातून त्यांचा राजकीय हुतात्मा होण्याचा प्रयत्न “एक्स्पोज” झाला. आपण तुरुंगात असताना भगतसिंगांची जेल डायरी वाचली. प्रभू रामचंद्रांना देखील सीतामाई सह 14 वर्षे वनवासात जावे लागले. सगळ्या महान लोकांना अग्निपरीक्षा द्यावी लागली वगैरे बाता त्यांनी मारल्या. पण यापैकी कुठलेही महान लोक दारू घोटाळ्यासाठी तुरुंगात गेले नव्हते, हे सत्य केजरीवालांनी लपविले. स्वतः केजरीवाल दारू घोटाळ्यातल्या आरोपांमुळे तुरुंगात गेले होते. किंबहुना त्यांना जावे लागले होते.
– राजकीय हौतात्म्याची नौटंकी!!
सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर केजरीवाल दोनच दिवसांपूर्वी तुरुंगाबाहेर आले. परंतु सुप्रीम कोर्टाने राजकीय दृष्ट्या त्यांच्या नाड्या पूर्ण आवळल्यानंतर आज त्यांच्यावर राजीनामा देण्याची घोषणा करण्याची वेळ आली. केजरीवालांनी दोन दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली, पण प्रत्यक्षात ती राजकीय हौतात्म्याची नौटंकी ठरली.
दिल्लीच्या दारू घोटाळ्यात सत्त्वसुली संचलनालय अर्थात ईडीने अटक केल्यानंतर अरविंद केजरीवालांनी राजीनामा देऊन ते चौकशी आणि तपासाला सामोरे गेले असते तर ती नौटंकी ठरली नसती. त्यामागे लोकांना त्यांचा प्रामाणिक हेतू दिसला असता. परंतु अरविंद केजरीवालांनी अटकेनंतर लगेच राजीनामा दिला नाही. ते गेले 5 महिने तुरुंगात राहिले, पण मुख्यमंत्रीपदाची खुर्ची त्यांनी सोडली नाही.
JP Nadda : जेपी नड्डा यांनी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र भाजपला केले सावध
सुरुवातीला राऊत अवेन्यू कोर्टाने, नंतर दिल्ली हायकोर्टाने आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्यावर मुख्यमंत्री म्हणून काम करण्यावर भरपूर प्रतिबंध लादले. त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही. कुठल्याही सरकारी सुविधा वापरता येणार नाहीत, असे बंधन घातले. परंतु अरविंद केजरीवालांनी तेव्हा देखील मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडली नाही. आता सुप्रीम कोर्टाने केजरीवालांचा जामीन मंजूर करताना त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, असे स्पष्ट सांगितले. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडायची उपरती झाली.
पण अजून देखील केजरीवालांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडलेली नाही, तर त्यांनी फक्त राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. पण एवढ्या घोषणेनंतरच माध्यमांनी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री पदाच्या नावांचे पतंग उडवायला सुरुवात केली. सुनीता केजरीवाल, मनीष सिसोदिया, अतिशी मार्लेना, सौरभ भारद्वाज यांची नावे माध्यमांनी मुख्यमंत्रीपदासाठी पुढे आणली. पण केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, तरच यापैकी कोणाला तरी संधी मिळणार आहे. अन्यथा ती संधी हवतच तरंगणारी ठरणार आहे.
केजरीवाल लवकरच हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहेत. या प्रचारात ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याच्या हौतात्म्याच्या बातमीचाही उपयोग करून घेतील, अशा अटकळी आत्तापासूनच राजकीय वर्तुळात बांधल्या जाऊ लागल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App