विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असलेल्या घराणेशाहीच्या आरोपाला घाबरून गांधी परिवाराने अमेठी + रायबरेलीतून “पलायन” केले आहे. गांधी परिवारापैकी कोणीच अमेठी किंवा रायबरेलीतून निवडणूक लढवणार नाही, अशी भूमिका राहुल आणि प्रियांका गांधी यांनी जाहीर केल्याची दिल्लीच्या वर्तुळात चर्चा आहे. Afraid of Modi’s charge of nepotism, Gandhi family escapes from Amethi + Rae Bareli
राहुल गांधींची आधीच केरळ मधल्या वायनाड मधून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे सोनिया गांधींनी सोडलेला रायबरेली मतदारसंघात प्रियांका गांधी निवडणूक लढवतील अशा अटकळी बांधल्या गेल्या होत्या, परंतु त्या देखील आता फोल ठरल्या आहेत. रायबरेली मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवायला प्रियांका गांधींनी नकार दिला आहे, तर एकदा वायनाड मधून लढत असल्याने पुन्हा अमेठीतून लढायची गरज नाही. कारण दोन्ही जागी निवडून आल्यास एक मतदारसंघ सोडावा लागेल. त्यामुळे कुठल्यातरी मतदारसंघातले मतदार नाराज होतील या कारणास्तव राहुल गांधींनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला नकार दिला आहे.
सोनिया गांधींनी आधीच राजस्थानातून राज्यसभेची निवडणूक लढवून त्यात बिनविरोध निवडून देखील आल्या आहेत. त्यामुळे अर्थातच त्यांनी रायबरेलीची खासदारकी स्वतःहून सोडल्यात जमा आहे. पण ज्या प्रियांका गांधी यांच्यासाठी त्यांनी रायबरेली मतदारसंघ मोकळा केला होता, तिथून लढायला प्रियांका गांधी यांनी नकार दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी गांधी परिवार घराणेशाही लादण्याचा आरोप करतात. त्यामुळे एकाच घराण्यातले तीन खासदार होणे हे त्या आरोपावर शिक्कामोर्तब करण्यासारखेच आहे, त्यामुळे राहुल गांधी जर स्वतःहून वायनाड मतदार संघातून निवडणूक लढवत असतील, तर आपण रायबरेलीतून लढण्याचे कारण नाही, अशी भूमिका प्रियांका गांधी यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे.
पण या सगळ्याचा सर्वांत मोठा राजकीय परिणाम म्हणजे त्यामुळे काँग्रेसमध्येच मोठा राजकीय बॉम्ब फुटला आहे. देशातले सगळ्यात मोठे राज्य उत्तर प्रदेशात आता गांधी परिवाराचा कुठलाच राजकीय प्रभाव उरला नसल्याचे ते निदर्शक ठरणार आहे. ज्या रायबरेली आणि अमेठी मतदारसंघाचे दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी प्रतिनिधित्व केले, त्यानंतर सोनिया आणि राहुल गांधींनी प्रतिनिधित्व केले, त्या दोन्ही मतदारसंघांना गांधी परिवार सोडून इतर खासदार मिळतील. पण गांधी परिवार मात्र उत्तर प्रदेशातून निघून गेल्यामुळे काँग्रेसला तिथे पोरकेपणाची अवस्था येईल अशी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये खंत आहे.
उत्तर प्रदेशात काँग्रेस तोळामांसा उरली आहे. त्यातही गांधी परिवार जर तिथून लोकप्रतिनिधी होणार नसेल तर काँग्रेसला काँग्रेसची उरली सुरली संघटनात्मक आशा देखील संपुष्टात येणार आहे. देशाच्या राजकीय इतिहासाला वळण देणारी ही घटना आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App