प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस 10 जून रोजी आपला वर्धापन दिन साजरा करत असून पक्ष पंचविशीत प्रवेश करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या वर्धापन दिनाचा भव्य कार्यक्रम घेण्यासाठी नगरची खास निवड केली होती. 9 जून रोजी केडगावच्या मैदानावर शरद पवारांची भव्य सभा होणार होती. परंतु ही सभा पक्षाला रद्द करावी लागली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याचे कारण दिले आहे. NCP’s 25th public meeting in Nagar cancelled
9 जूनच्या आसपासच पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्यामुळे चक्रीवादळ येऊ शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने या चक्रीवादळाचे नाव “बिपर जॉय” ठेवले आहे. त्यामुळे प्रतिकूल हवामानाचे कारण देत राष्ट्रवादी काँग्रेसने नगर जिल्ह्यातला जाहीर सभेचा कार्यक्रम रद्द केला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी ही माहिती दिली आहे.
शरद पवारांनी 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत स्थापन केली. आता पक्ष पंचविशीत प्रवेश करत आहे. आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात मोठे यश मिळवण्याची महत्त्वाकांक्षा ठेवली आहे. त्याचबरोबर गेल्या 25 वर्षात जे साध्य झाले नाही, ते राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याचे ध्येय साध्य करण्याचीही पक्षाची महत्त्वाकांक्षा आहे. यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांची नावे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टरवर झळकवली आहेत.
पण त्या पलीकडे जाऊन राष्ट्रवादीने नगर जिल्ह्यात आपले बस्तान वाढवण्यासाठी पंचविशीचा भव्य सभेचा कार्यक्रम नगरमध्ये ठेवला होता. परंतु आता हवामानच प्रतिकूल असल्याने पक्षाला जाहीर सभा रद्द करावी लागली आहे. अर्थात ही सभा रद्द केलेली नसून ती पुढे ढकलण्यात आल्याची पुस्तीही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोडली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App