नाशिक : महाराष्ट्रातल्या मतदार याद्या शुद्धीकरणासाठी ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली काढलेल्या सत्याच्या मोर्चात शरद पवार त्यांच्या वयोमानानुसार चालले नाहीत, पण ते त्या मोर्चाच्या सभेत मात्र सामील झाले. या मोर्चाचे मुख्य भाषण खुद्द त्यांनीच केले. ठाकरे बंधूंनी पवारांच्या वयाचा ज्येष्ठतेचा मान राखून त्यांना मोर्चाच्या समारोपाचे भाषण करायची संधी दिली.
शरद पवारांनी या भाषणात संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण काढली. आज सत्याच्या मोर्चाला मिळालेला प्रतिसाद पाहून आपल्याला संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली, कारण त्यावेळी आपापसांमधले राजकीय मतभेद विसरून सगळे राजकीय नेते आणि पक्ष संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या एका झेंड्याखाली एकत्र आले होते. त्यांनी ही चळवळी यशस्वी केली होती. तसेच आज राजकीय मतभेद विसरून सगळे पक्ष लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र आले आहेत, असे शरद पवार म्हणाले.
पण संयुक्त महाराष्ट्र चळवळ नेमकी कुणी केली आणि कुणाविरुद्ध केली किंबहुना कुणा विरुद्ध करावी लागली आणि त्यावेळी स्वत: शरद पवार कुठे होते??, या सगळ्यांचे खुलासे मात्र पवारांनी आजच्या भाषणात केले नाहीत. पण म्हणून त्यातले राजकीय सत्य लपून राहिले नाही.
– संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे मूळ काँग्रेस विरोधात
मूळात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ महाराष्ट्राच्या जनतेला उभारावी लागली. कारण त्या वेळच्या पंडित नेहरूंच्या काँग्रेस सरकारने महाराष्ट्रावर अन्याय करून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र द्यायला नकार दिला होता. मुंबईचे स्वतंत्र राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश करून त्यांना मुंबईपासून महाराष्ट्र तोडायचा होता. संपूर्ण मुंबई प्रांतात त्यावेळी गुजरात + मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्र हे तीन विभाग एकत्र होते. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला नेहरूंच्या काँग्रेस सरकारचा विरोध होता. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला नेहरूंच्या काँग्रेस विरुद्ध संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभारावी लागली होती. त्यावेळी समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, जनसंघ, हिंदू महासभा, कम्युनिस्ट पक्ष या सगळ्यांनी एकत्र येऊन आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी केली होती.
– यशवंतरावांच्या नेतृत्वाखाली पवार काँग्रेसमध्ये
त्यावेळी शरद पवारांचे राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण काँग्रेसमध्ये होते 1957 सालची निवडणूक संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या मुद्द्यावरच लढविली गेली आणि त्या निवडणुकीत यशवंतराव फार थोडक्या मतांनी निवडून येऊ शकले होते. त्यावेळी काँग्रेसचे दोन दिग्गज नेते भाऊसाहेब हिरे आणि बाळासाहेब देसाई हे निवडणुकीत पराभूत झाले होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा काँग्रेसला जबरदस्त दणका बसला होता. या दणक्याची धग 1959 मध्ये काँग्रेस अध्यक्ष बनलेल्या इंदिरा गांधींनी व्यवस्थित ओळखली आणि त्यांनी नेहरूंचे मन संयुक्त महाराष्ट्र देण्याच्या दिशेने वळविले म्हणून नेहरू मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र द्यायला कबूल झाले होते.
– पवारांची आठवण selective
त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार हे काँग्रेसमध्ये होते शरद पवारांच्या घराण्यातले सगळे वरिष्ठ लोक शेतकरी कामगार पक्षाचे बाईक होते पण स्वतः पवार मात्र त्यावेळी काँग्रेसमध्येच होते त्या काँग्रेस विरोधातच संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी ठाकली होती. पण पवारांनी ही हकिकत आजच्या भाषणात सांगितली नाही. त्यांनी फक्त सत्याच्या मोर्चाला मिळालेल्या प्रतिसादावरून संयुक्त महाराष्ट्र चळवळीची selective आठवण काढली. पण ती चळवळ काँग्रेसच्या विरोधात करावी लागली होती, हे सत्य मात्र त्यांनी लपवून ठेवले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App