नाशिक : जुगाडाच्या पलीकडे जाऊन बांधावी लागेल मोठी संघटना, तरच ओलांडता येईल ठाकरे – पवार ब्रँडची संख्यात्मक मर्यादा!! ही वस्तुस्थिती दोन्ही नावांच्या ब्रँडला आता मान्य करावी लागेल.Thakckrey and Pawar brands must their limits beyond jugado politics
ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बाळासाहेब असताना देखील 70 – 75 आमदार निवडून आणणे ही ठाकरे ब्रँडची मर्यादा होती, याची आठवण करून दिली. त्यामध्ये संख्यात्मक तथ्य असले, तरी मुळात त्यावेळचा बाळासाहेब ठाकरे ब्रँड हा शिवसेना आणि भाजप हे दोन्हीही वापरत होते हे सत्य आमदार संजय गायकवाड विसरले किंवा त्यांनी ते मुद्दामून लपवून ठेवले.
मध्यंतरी अजित पवारांनी देखील अशीच पवार ब्रँडची मर्यादा दाखवून दिली होती आपण राष्ट्रवादीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते पवारांना पंतप्रधान करायला निघालो होतो, पण आपली खासदार किती निवडून येत होते आणि निवडून आले हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे पवार पंतप्रधान बनणे अवघड आहे, याची कबुली अजितदादांनी दिली होती.
त्यामुळे एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे ब्रँड आणि पवार ब्रँड या दोघांचीही संख्यात्मक मर्यादा सर्वसाधारणपणे सारखीच राहिली. बाळासाहेब ठाकरे + भाजप आणि शरद पवार + काँग्रेस यांची संख्यात्मक मर्यादा बहुमताच्या आसपास पोहचली.
बाळासाहेब ब्रँडचा फायदा विभागला
याला कारणीभूत बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची राजकीय कार्यशैलीच ठरली. या दोन्ही नेत्यांनी दोन राष्ट्रीय पक्षांचे जोखड आपल्या खांद्यावरून कधी उतरू दिले नाही. या दोघांनी कायम जुगाडू राजकारण केले. बाळासाहेबांनी भाजपा पोसली. ज्या पक्षाला मूळात संघ परिवाराचा पाठिंबा होता पण तो संघ परिवार महाराष्ट्रात पुरेसा रुजू शकला नव्हता म्हणून त्या परिवाराने बाळासाहेबांच्या वलयाचा आधार घेतला होता. त्यामुळे बाळासाहेबांच्या ब्रँडचा संपूर्ण वापर शिवसेनेने कधीच करून घेतला नाही. तो कायम विभागून भाजपला मिळवून दिला.
पवारांनी देखील स्वतःच्या ब्रँडचा विकास आणि विस्तार पश्चिम महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन केला नाही. पवार कायम काँग्रेसच्या सत्तेच्या वळचणीला राहण्यासाठी जुगाडू राजकारण करीत राहिले, पण त्यामुळे पवार ब्रँडच्या मर्यादा कायमच संख्यात्मक पातळीवर उघड्या पडल्या.
केवळ फूस लावल्याने एकत्रीकरण नको
आता महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड आणि पवार ब्रँड हे खऱ्या अर्थाने विकसित करायचे असतील तर पहिल्यांदा या दोन्ही ब्रँडला आपापल्या खांद्यांवरचे दोन राष्ट्रीय पक्षांचे जोखड कायमचे उतरवून ठेवावे लागेल. स्वतःची संघटना स्वतःच्या विचारांवर आणि ताकदीवर बळकट करावी लागेल. कुठलातरी एक नेता कुठलातरी विषय काढून फूस लावतोय आणि म्हणून आपण एकत्र आलोय असे सांगून भागणार नाही. ते सांगून केवळ इव्हेंट मधली वेळ मारून नेता येईल, पण संघटना बांधता येणार नाही आणि संघटना बांधणी खेरीज ब्रँडचा विकास आणि विस्तार होणार नाही, हे दोन्ही ब्रँडला लक्षात घ्यावे लागेल.
पवार ब्रँडला मर्यादा ओलांडणे कठीण
भाजपकडे कोणताही व्यक्तीच्या नावाचा ब्रँड नाही. जो आहे तो संघटनेचा ब्रँड आहे. तो त्यांनी जाणीवपूर्वक विकसित केला आहे. व्यक्ती पेक्षा संघटनेला महत्त्व ही संघाची कार्यशैली आहे. या कार्यशैलीतून काम करून त्यांनी भाजप नावाचा ब्रँड वाढवून विस्तारला आहे. ठाकरे आणि पवार या दोन्ही ब्रँडला विकास आणि विस्तारासाठी भाजपचीच कॉपी केली पाहिजे, असे अजिबात नाही. भाजप पेक्षा किंवा अगदी काँग्रेसपेक्षा वेगळ्या कार्यशैलीने ते आपापला ब्रँड विकसित आणि विस्तारित करू शकतील फक्त त्यासाठी चिकाटीने मजबूत संघटना बांधावी लागेल. त्याला दुसरा पर्याय असणार नाही. ठाकरे ब्रँडला हे करता येणे अधिक शक्य आहे कारण ठाकरेंचे राजकारण पवारांपेक्षा कमी जुगाडू आहे. पवारांना ते जमणे कठीण आहे कारण जोगाडापलीकडचे राजकारण पवारांच्या राजकीय बुद्धिमत्तेच्या आणि कार्यशैलीच्या पलीकडचे आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App