नाशिक : अकेला देवेंद्र क्या करेगा??, एक तर तुम्ही तरी राहाल किंवा मी तरी राहीन, अशी उद्दाम भाषा निवडणुकीपूर्वी वापरणाऱ्या पवार आणि ठाकरेंच्या पक्षांतून अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमने उधळली गेली आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाबरोबरच महाराष्ट्राच्या जनतेच्या भुवया उंचावल्या.
पण प्रत्यक्षात पक्ष फुटीच्या नव्या भीतीने टीकेची हत्यारे गळाली, त्यातूनच फडणवीसांवर स्तुतीसुमने उधळायची वेळ आली, असे म्हणायची वेळ संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी आणली. देवेंद्र फडणवीस एकटेच ऍक्टिव्ह दिसतात. ते मिशन मोडवर काम करत आहेत. महाराष्ट्राची वित्तीय तूट वाढत आहे. त्याकडे फडणवीसांनी यांनी लक्ष द्यावे, असा उपदेश सुप्रिया सुळे यांनी केला. ज्या खुर्चीवर यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील हे दोन महान नेते बसले, त्या खुर्चीवर बसायचा मान फडणवीस यांना मिळाल्याची आठवण सुप्रिया सुळे यांनी करून दिली.
संजय राऊत आणि सुप्रिया सुळे या दोन्ही नेत्यांनी सलग दोन दिवशी फडणवीसांची स्तुती केली. त्यांच्या पाठोपाठ खासदार अमोल कोल्हे यांनी देखील फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाचा मान राखला. त्यांची ही कृती मनाला भावली, असे अमोल कोल्हे म्हणाले, तर चांगले काम करणाऱ्यांची सामना नेहमी स्तुती करतो. आजही संतोष देशमुख प्रकरणात आमदार सुरेश धस जे बोलतायेत, त्यांच्या मागे फडणवीसांचा आशीर्वाद असल्याशिवाय ते बोलत नाहीत, असे संजय राऊत म्हणाले.
फडणवीस यांच्यावर उधळल्या गेलेल्या या स्तुतीसुमनांचे याचे नेमके राजकीय रहस्य काय??, याचा उलगडा मात्र महाराष्ट्राच्या जनतेला झाला नाही.
Devendra Fadnavis : “अकेला देवेंद्र” म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना फडणवीस आता “ऍक्टिव्ह” दिसले; पण हा “ऍक्टिव्हिजम” नेमका कुठे??
यातला एक उलगडा असा की मुळात फडणवीसांची ही स्तुती केवळ एकतर्फी नाही, किंवा निर्भेळ देखील नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोचण्यासाठी त्यांच्या बॉसची स्तुती केली जात आहे, पण त्या पलीकडे जाऊन मुळात आता ठाकरे + पवारांच्या पक्षाच्या हातातले टीकेचे हत्यारच महाराष्ट्राच्या जनतेने काढून घेतले आहे. त्या उलट आता ठाकरे आणि पवारांच्या पक्षांना नव्या फुटीचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आपण फडणवीस यांना पुन्हा टार्गेट करायचं आणि आपला पक्ष आणखी फुटायचा ही भीती ठाकरे आणि पवारांच्या नेत्यांना वाटू लागली आहे. त्यातून ही स्तुतीसुमनांची टूम निघालेली दिसत आहे.
पवारांच्या पक्षातले सगळे नेते मूळातच भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जायला एका पायावर तयार आहेत. पक्षाचे आठ खासदार आणि दहा आमदार यासाठी पवारांकडे आग्रह धरत आहेत. सुप्रिया सुळे, रोहित पाटील, जितेंद्र आव्हाड आणि उत्तम जानकर हे चार नेते सोडले, तर बाकी कोणीच शरद पवारांना साथ देतील अशी स्थिती उरलेली नाही.
उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आता एकतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे निघालेत किंवा भाजपमध्ये येऊन पोहोचलेत. अशा स्थितीत फडणवीस यांना किती टार्गेट केले, तरी त्याचा उपयोग काय होणार?? नुसत्या माध्यमांमध्ये बातम्या येणार. पण त्या बातम्या येऊन आपले पक्ष वाचणार नाहीत. आपल्या पक्षाचे नेते आपल्याबरोबर राहणार नाहीत, हे ठाकरे आणि पवारांच्या नेत्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच फडणवीसांवर ही सुतीसुमने उधळायची वेळ सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्यावर आली आहे. त्यामध्ये अमोल कोल्हे यांची भर पडली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App