विशेष प्रतिनिधी
मुंबई : पुण्यामध्ये बड्या बिल्डर बापाच्या बेट्याने बेदरकारपणे पोर्शे कार चालून दोन इंजिनियर्स बळी घेतला. त्या अपघाताबाबत सरकारने कठोर कायदेशीर कारवाई केली. या कारवाईची सविस्तर माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली. Strict legal action by government regarding Porsche car accident
पोलिसांच्या चुकांविषयी आणि त्यावर सरकारने केलेल्या कठोर कायदेशीर कारवाई विषयी फडणवीस सविस्तरपणे बोलले, पण पण या अपघात प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी राजकीय हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्याविषयी फडणवीस विधानसभेत काही बोलले नाहीत.
– देवेंद्र फडणवीस म्हणाले :
हा मुद्दा नक्कीच गंभीर आहे. ही घटना १९ मे २०२४ रोजी रात्री अडीचच्या सुमारास घडली. त्यानंतर त्या मुलाला लोकांनी थोडी मारहाण केली. त्यानंतर त्याला पोलीस स्थानकात आणलं. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. हे खरं आहे की पहिल्यांदा पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला तो ३०४ अ होता. पण त्यानंतर वरिष्ठांनी भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की ३०४ अ नव्हे, ३०४ चाच गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यामुळे त्याच दिवशी केस डायरीमध्ये ३०४ चा गुन्हा दाखल केला.
ज्युवेनाईल जस्टिस बोर्डासमोर दाखल अर्जात स्पष्टपणे बाजू मांडण्यात आली आहे. ‘संबंधित मुलाचा गुन्ह्यात सहभाग असल्याचं निष्पन्न झालं असून त्यानं निघृणपणे सदरचं कृत्य केलं आहे. त्याची जन्मतारीख १४ सप्टेंबर २००६ असून त्याचं वय १७ वर्षं ८ महिने इतकं झालं आहे. त्याच्या वयाचा विचार करता त्याला प्रौढ समजून ते न्यायालयाकडे वर्ग करावे अशी विनंती आहे’, असं पोलिसांनी त्या अर्जात म्हटलं आहे”, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी सभागृहाला दिली.
निर्भयाच्या घटनेनंतर १७ वर्षांच्या वरचे जे आहेत आणि थंड डोक्याने त्यांनी एखादं कृत्य केल्याचं लक्षात आलं तर त्यांना प्रौढ मानता येतं याबाबतची तरतूद आहे. त्यानुसारच ही मागणी करण्यात आली होती. त्या बोर्डाच्या सदस्यांनी तो अर्ज दाखल करून घेतला. त्यानंतर त्याला काय शिक्षा दिल्या हे सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर लगेच पोलिसांनी त्यावर अपील दाखल केली. न्यायालयाने पोलिसांना सांगितलं की तुम्हाला रिव्ह्यूचा अधिकार आहे. त्यासाठी आम्ही बोर्डाकडे याचिका दाखल केली, तेव्हा त्यांनी आपला जुना निर्णय बदलला आणि आरोपीला कोठडी दिली.
आरोपीच्या रक्ताचा नमुना घेतला होता. जेव्हा त्या नमुन्यामध्ये अल्कोहोल नसल्याचं लक्षात आलं, तेव्हा पोलिसांना त्यात काही गडबड असल्याचं दिसलं. तेव्हा पोलिसांनी तात्काळ त्याचा डीएनए, त्याच्या वडिलांचा डीएनए आणि रक्ताच्या नमुन्याचा डीएनए तपासला. तो मॅच होत नसल्याचं समोर आलं. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित डॉक्टरांना अटक केली. त्यात एकानं ३ लाख रुपये घेऊन नमुना बदलल्याचं कबूल केलं. त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब कारवाई केली.
पहिलं आरोपपत्र दाखल करण्यात आलं. क्रॅश इम्पॅक्ट अॅनालिसिस करण्यात आलं. मुलानं जेव्हा ब्रेक मारला, तेव्हा लॉक झालेला वेग ११० किलोमीटर प्रतीतास एवढा आहे. त्यामुळे अत्यंत वेगानं तो कार चालवत होता. त्याच्या घरापासूनचं सीसीटीव्ही फूटेज जप्त करण्यात आलं आहे. तो आधी ज्या बारमध्ये बसला, जिथे दारू प्यायला त्याचं सीसीटीव्ही फूटेज जप्त करण्यात आलं आहे. दुसऱ्या बारमध्ये जिथे बसला, त्याचं सीसीटीव्ही फूटेज जप्त झालं आहे. त्यामुळे पुराव्यांमध्ये कुठेही कमतरता नाही.
त्याच्या वडिलांवरही कारवाई करण्यात आली आहे. वडिलांनी मुलगा प्रौढ नसताना त्याला गाडी चालवायला देणं, या गुन्ह्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. बार चालकांवरही कारवाई झाली आहे. त्याच्या आजोबांनी त्यांच्या ड्रायव्हरला हा गुन्हा अंगावर घेण्याची गळ घातली. पण पोलिसांनी ड्रायव्हरचं ऐकलं नाही. त्या आजोबांनी ड्रायव्हरला एक दिवस घरात कोंडूनही ठेवलं. पण त्यानं काही त्यांचं ऐकलं नाही. वडिल आणि आजोबांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. ते अजूनही अटकेत आहेत.
पोलिसांची पहिली चूक ही आहे की जेव्हा त्याला रात्री ३ वाजता पोलीस स्थानकात आणलं तेव्हा त्याला लगेच वैद्यकीय चाचणीसाठी पाठवायला हवं होतं. पण त्यांनी सकाळी साडेआठला पाठवलं. दुसरं, असा गुन्हा घडला की साधारणपणे अपघातप्रकऱणात ३०४ अ लावतात. पण त्यावेळी त्यांनी वरीष्ठांना आधी कळवायला हवं होतं. पण ते त्यांनी केलं नाही. वरीष्ठांनी तो ३०४ करायला लावला. त्यामुळे ड्युटी व्यवस्थित केली नाही यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले.
– पुण्याच्या परिसरात ७० पब्जवर कारवाई करण्यात आली आहे. ज्यानी परवान्याच्या अटी-शर्थींचं उल्लंघन केलं आहे, अशा ७० पब्जचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. ज्यांचे परवाने आहेत, तिथे कॅमेरे लावले आहेत. ज्यातून त्यांनी किती वाजता पब बंद केला, गिऱ्हाइकांना दारू देताना त्यांचं वय तपासलं आहे की नाही या बाबी तपासल्या जात आहेत. प्रवेश देतानाही गिऱ्हाईकाच्या वयाचा दाखला तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर उद्या वय न तपासता प्रवेश दिला, तर परवाना रद्द करणे, फौजदारी गुन्हा दाखल करणे अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App