नाशिक : महाविकास आघाडीत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेले लोकसभेचे 10 उमेदवार एका झटक्यात जाहीर न करू शकलेल्या शरद पवारांनी रावेरमध्ये श्रीराम पाटील नावाच्या नव्या उमेदवारावर नवे डाव रचून पाहिले, पण ते पवारांवरच पुरते उलटले. पवार भाजप फोडून राष्ट्रवादीचे बेरजेचे राजकारण करायला गेले, पण प्रत्यक्षात खडसे आणि चौधरींना ते गमावून बसले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून एकनाथ खडसे आणि संतोष चौधरी या दोन माजी आमदारांचीच वजाबाकी झाली. Sharad pawar experiment failed in raver constituency, as his supporters leaving the NCP
दोन महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पाटील यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणले. त्यांना तुतारी हातात देऊन रावेर मधून उमेदवारीच्या घोड्यावर बसवले. त्यावेळी “पवारांनी रावेरमध्ये डाव टाकला”, “चाणक्य खेळी” केली वगैरे बातम्यांची पवारनिष्ठ माध्यमांनी भरमार केली. पवार आता भाजपचे वर्चस्व मोडून रावेर जिंकणार असे चित्र माध्यमांनी निर्माण केले.
पण प्रत्यक्षात पवारांचा तो डाव आणि चाणक्यगिरी त्यांच्यावरच उलटली. पवारांनी बाहेरच्या पक्षातून नवखा उमेदवार आयात करून निष्ठावंतांना डावलले, असा आरोप करत जळगाव जिल्ह्यातील रावेर, भुसावळ, वरणगाव या तीन तालुक्यांमधल्या हजारो कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिला. आपण सुनबाई रक्षा खडसेंविरोधात लढायला तयार नाही, असे सांगून एकनाथ खडसे यांनी पवारांची राष्ट्रवादी सोडली. त्यानंतर आता माजी आमदार संतोष चौधरी बंडाच्या तयारी आहेत. यामुळे जळगावमध्ये शरद पवार गटाला धक्का बसणार आहे. इतकेच नाही, तर श्रीराम पाटलांना पवारांच्या राष्ट्रवादीच्या बळावर नव्हे, तर “स्वबळा”वर निवडणूक लढवायची पाळी आहे.
शरद पवार आयत्या वेळेला कच खाणारे नेते; प्रफुल्ल पटेल यांचे थेट शरसंधान
– पवार प्रयोगाच्या मर्यादा
आपल्या वाट्याला आलेल्या 10 लोकसभेच्या जागांमध्ये पवारांना नवा राजकीय प्रयोग करायला फारसा वाव देखील नाही. त्यांच्या पक्ष संघटनेचे नैसर्गिक स्वरूप देखील तसे नाही. प्रस्थापित किंवा सरंजामी मराठा नेतृत्व हे पवारांच्या पक्षाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ते इतर पक्ष फोडून आपल्या पक्षाकडे उमेदवार आयात करत असले तरी, ती खेळी इतकी मर्यादित ठरते, की त्यामध्ये तरुण + महिला + दलित + आदिवासी + ओबीसी हे समाज घटक पवारांच्या वाट्याला येत देखील नाहीत. हेच ते समाज घटक आहेत, जे आजच्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्णपणे निर्णायक भूमिका बजावणार आहेत. त्यांच्या मतदानाच्या मोठ्या टक्केवारीतूनच ते प्रस्थापित कुठल्याही उमेदवाराला फार मोठ्या फरकाने पाडू शकण्याची क्षमता राखत आहेत.
पण पवारांकडे उपरोक्त समाज घटकांच्या प्रतिनिधींचा पूर्ण अभाव आहे. त्यामुळे प्रस्थापित नेत्यांना ताटातून वाटीतून ताटात अशाच प्रकारे घेतल्याशिवाय पवारांपुढे पर्याय उरत नाही. म्हणूनच रावेरमध्ये श्रीराम पाटलांवर केलेला प्रयोग पहिल्याच टप्प्यात फसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
– माढा मध्ये जुनाच प्रयोग
तेच चित्र माढा मध्ये दिसत आहे. माढा लोकसभा मतदारसंघात पवारांनी ताटातले वाटीत, वाटीतले ताटात करून विजयसिंह मोहिते पाटलांच्या घरातला उमेदवार देण्याचे ठरविल्याने त्यांच्याकडे माढा देखील प्रस्थापित मराठा नेता वगळता बाकी कुठल्याही समाज घटकाचा नवा चेहरा समोर आणण्यासारखी स्थिती नाही. तिथे देखील मोहिते पाटलांच्या घरातल्या धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी दिल्यानंतर माळशिरस पासून माढा पर्यंतचे वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये मोहिते पाटील विरोधक उचलणार खाणार हे निश्चित आहे. मोहिते पाटलांची राजकीय मर्यादा माळशिरस तालुक्याच्या पुढे गेल्याची चिन्हे दिसत नाहीत.
त्यामुळे पवारांनी रावेर मध्ये श्रीराम पाटलांच्या रूपाने “नवा प्रयोग” तरी करून पाहिला, भले तो उलटला असेल, पण माढा मतदारसंघांमध्ये मात्र त्यांना मोहिते पाटलांच्या रूपाने “जुनाच प्रयोग” करण्याशिवाय पर्याय उरला नाही ही वस्तुस्थिती आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App