विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात बीडमध्ये सुपारी फेक आंदोलन झाले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ते आंदोलन करून सवरून हात झटकले. मनसेच्या नेते आणि कार्यकर्ते संतापले. या सर्व प्रकरणावर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन त्यावर सविस्तर भाष्य केले. यावेळी राज ठाकरेंनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या आडून 83 वर्षांच्या शरद पवारांना मराठवाड्यात “मणिपूर” घडवायचे आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
राज ठाकरे म्हणाले :
मी सोलापूरमध्ये जे बोललो, ते सगळ्यांनी पाहिलं, ऐकलं. पण त्यानंतर जाणीवपूर्वक केलेल्या बातम्या धक्कादायक होत्या. राज ठाकरेंचा आरक्षणाला विरोध वगैरे. वाट्टेल त्या बातम्या आल्या. 2006 साली मी माझ्या पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत आमची एकच भूमिका राहिली आहे. आरक्षण द्यायचंच असेल तर आर्थिक निकषांवर द्यावं. त्यावर माझं म्हणणं आहे की महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही.
देशात महाराष्ट्रासारखं दुसरं राज्य नाहीये. इथे इतक्या गोष्टी उपलब्ध असताना बाहेरच्या राज्यातल्या लोकांना इथे सगळ्या गोष्टी मिळत असताना आमच्या मुला-मुलींना त्या गोष्टी इथे मिळत नाहीत. आपण जर इथल्या मुलांसाठी या गोष्टी नीट वापरल्या तर आपल्याकडे आरक्षणाची गरजच नाहीये. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण देण्याऐवजी आपल्याकडे फक्त जातींचं राजकारण केलं जातं आणि माधी भडकवली जातात.
माझ्या दौऱ्यात मनोज जरांगेचा काहीही संबंध नव्हता. पण त्यांच्या आंदोलनाच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी राजकारण करत आहेत. मराठवाड्यात मला ते दिसले. मराठवाड्यातले काही पत्रकारही त्यात सामील आहेत. मला त्यांची नावंही माहिती आहेत. ती योग्य ठिकाणी जातीलही. कुणाला पेव्हर ब्लॉकचे काँट्रॅक्ट्स मिळाले, कुणाला एमआयडीसीत जागा मिळाल्या, कुणाला किती पैसे मिळाले, त्यातून कशा गाड्या घेतल्या गेल्या अशा सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत आल्या आहेत. धाराशिवमध्ये तर तिथल्या लोकांना भडकवण्याचे काम काही पत्रकार करत होते. मी तिथल्या लोकांना वर बोलवत असताना पत्रकार म्हणत होते खाली या. तिथे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या जवळचे काही लोक होते.
बीडमधील सुपारी फेक प्रकरणात तर शिवसेनेचा जिल्हाप्रमुखच होता. लोकसभेच्या निर्णयानंतर यांना वाटले की मराठवाड्यात मतदान झाले. पण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी समजून घेतली पाहिजे की ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात झालेले मतदान होते. विरोधकांच्या प्रेमाखातर झालेले मतदान नव्हते. त्यामुळे त्यांना जी मते मिळाली, ती मुस्लीम समाजाने देशभरात मोदींविरोधातली मते दिली. दलित बांधवांनी भाजपाच्या विरोधात मते दिली. पण या दोघांना वाटतंय की यांच्या प्रेमाखातर ते मतदान झालंय. त्यांना वाटतंय येत्या निवडणुकीतही अशीच खेळी करावी.
तो कालच्या प्रकारातला शिवसेनेचा जिल्हाप्रमुख ओरडत गेला की एक मराठा, लाख मराठा. म्हणजे त्यांना दाखवायचंय की हे जरांगे पाटलांचे लोक आहेत. पण त्यांच्या आडून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे विधानसभेचे राजकारण सुरू आहे.
शरद पवारांसारखा ८३ वर्षांचा माणूस वक्तव्य करतो की महाराष्ट्रात “मणिपूर” होईल!! पवारांनी “मणिपूर” होऊ नये याची चिंता करायला हवी. पण तेच असं म्हणत असतील तर यांच्या डोक्यात काय असेल याची कल्पना यावी. पुढच्या तीन – साडेतीन महिन्यात यांना मराठवाड्यात ज्या काही गोष्टी घडवायच्या असतील, त्या घडवण्यासाठी यांच्या या सगळ्या गोष्टी चालू आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App