विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठी भाषेविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून मंत्री प्रताप सरनाईक यांनी आता यू-टर्न घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून मी किती प्रयत्न केले आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे. मराठीचा मी सर्वाधिक सन्मान केला, असे आता सरनाईक यांनी म्हटले आहे. हिंदी ही मुंबईची बोलीभाषा झाली आहे, ती आमची लाडकी बहीण आहे असे प्रताप सरनाईक Pratap Sarnaik म्हणाले होते. त्यावरुन वाद निर्माण झाल्यानतंर सरनाईकांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
मराठीचा सन्मान मी सर्वाधिक केला
प्रताप सरनाईक म्हणाले, मिरा भाईंदरमध्ये हिंदी पत्रकार दिनाचा कार्यक्रम होता, हिंदी बद्दल कार्यक्रम होता. त्यामध्ये हिंदी पत्रकारांचा सन्मान केला जात होता. त्यामुळे त्यात कृपाशंकर सिंह काय म्हणाले त्यावर मी पुढे बोललो. माझ्या मतदारसंघात ठाण्यात मी मराठी बोलतो. पण मीरा भाईंदर मध्ये 82 टक्के हिंदी भाषिक आहेत. त्यामुळे तिथे हिंदी बोलावे लागते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून मी किती प्रयत्न केले आहेत सर्वांना माहीत आहे. माझ्या मतदारसंघात विंदा करंदीकर, पु.ल. देशपांडे यांच्यापासून नामदेव ढसाळ यांच्यापर्यंत मी रस्त्यांना नावे दिली आहेत. मराठीचा सन्मान मी सर्वाधिक केला आहे.
पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, माझ्या नातवांशी मराठीतच बोलायचं, हिंदी-इंग्रजीमध्ये नको अशा सूचना आपण घरातील सूनांना दिल्या आहेत. तसेच हे सर्व स्पष्टीकरण देत असताना प्रताप सरनाईक यांनी पत्रकार आणि माध्यमांवर खापर फोडले आहे. पत्रकारांनी नको त्या बातम्या पेरू नये, शनिवारी काही बातमी नाही म्हणून प्रताप सरनाईकची बातमी चालवली असेल, पण ते चुकीचे आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
काय म्हणाले होते प्रताप सरनाईक?
मिरा रोड भागातील एका कार्यक्रमात बोलताना, हिंदी ही मुंबईची बोलीभाषा झाली आहे असे वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी काल केले होते. याही पुढे जाऊन त्यांनी हिंदी भाषेला थेट लाडक्या बहिणीचा दर्जा दिला होता. दरम्यान, राज्यात आधीच हिंदी मराठी वाद सुरू आहे, त्यात प्रताप सरनाईक यांच्या या विधानामुळे आणखी भर पडली आहे. परंतु आता त्यांच्या वक्तव्याने सरकारवर सारवासारव आणायची वेळ आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App