विशेष प्रतिनिधी
मुंबई : श्रीमंत मराठ्यांना ओबीसी समाजाने विरोध करू नये, यासाठी शरद पवारांनी मंडल यात्रा काढली, अशा शब्दांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पवारांच्या जातीय राजकारणाची पोलखोल केली. Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांच्या मंडल यात्रेवर सडकून टीका केली. त्यांनी या यात्रेला राजकीय हेतू असल्याचा आरोप केला. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसींच्या शिष्यवृत्तीला विरोध केल्याचेही त्यांनी सांगितले. ईव्हीएम मुद्द्यावर एकत्रित लढा देण्याचे आवाहन करत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादींवर जोरदार निशाणा साधला.
प्रकाश आंबेडकर यांनी विविध राजकीय मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार यांनी सुरू केलेल्या मंडल यात्रेवर सडकून टीका केली. या यात्रेचा उद्देश ओबीसींचे कल्याण करणे नाही, तर यामागे राजकीय हेतू आहे, असा आरोप त्यांनी केला.
– मंडल यात्रेचे राजकारण
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसींच्या शिष्यवृत्तीला विरोध केला होता. ओबीसी हा श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात जातोय आणि श्रीमंत मराठा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आधार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाने श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात जाऊ नये, हाच या यात्रेमागचा राजकीय हेतू आहे. मागील निवडणुकांमध्ये ओबीसी भाजपकडे झुकला यात दुमत नाही, पण आता त्यांच्या लक्षात आले आहे की एक नागनाथ आहे आणि दुसरा साधनाग आहे, अशी उपरोधिक टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
वरातीमागे घोडं… अशी काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची परिस्थिती आहे. ईव्हीएम संदर्भात कोर्टात जाण्यासाठी आपण यापूर्वी सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी कोणीही आमच्यासोबत आले नाही. कोर्ट हे एकमेव व्यासपीठ आहे, जिथे दूध का दूध आणि पाणी का पाणी होते. आता बोंबलत बसण्याऐवजी त्यावेळीच पाऊल उचलणे गरजेचे होते, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
– पवारांना भेटलेल्या दोन व्यक्तींची नावे जाहीर करा
“किती खोटं बोलावं याला एक मर्यादा असते. राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आहेत त्यांच्याकडे कोण येतो कोण जातं याची नोंद ठेवली जाते. शरद पवार च्या दोघांना घेऊन गेले, याची नोंद राहुल गांधीच्या घरी असणार. त्यामुळे शरद पवारांसोबत दोन माणसं कोण होती, त्यांची नावे जाहीर करु शकता, सामान्य माणसाला फसवू नका. जिथे लढायचं तिथे लढायचं नाही, अशी या आघाडीची स्थिती आहे. पाकिस्तानला पाच तुकड्यांमध्ये विभागण्याची संधी असताना काँग्रेसने युद्ध का थांबवले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आज तीच भूमिका काँग्रेसने घेतली, तुम्ही युद्ध का थांबवलं सांगा” असा सवाल त्यांनी केला.
– त्यावेळी कोणीच सोबत उभा राहिला नाही
निवडणूक आयोग स्वतः मूर्ख आहे. काँग्रेस पक्षात एकमत दिसत नाही, वेगवेगळे गट एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. निवडणूक आयोगाच्या विरोधात कोर्टात जाण्यासाठी आपण पत्र लिहिले होते. पण त्यावेळी कोणीच सोबत उभा राहिला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली असली तरी आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तुमचा लढा खरा असेल आणि तुम्ही मोदींना घाबरत नसाल, तर तुम्ही यात सहभागी होऊ शकता, असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी इंडी आघाडीला केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App