विशेष प्रतिनिधी
मुंबई : जीएसटी मधील किचकट अटी, अन्न धान्यावर मागील दाराने घेतला जात असलेला जीएसटी याचा थेट परिणाम ग्राहक आणि आमच्या व्यवसायावर होत असून व्यापार करणे कठीण झाले आहे. त्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांनी 27 ऑगस्ट रोजी एक दिवसीय बंदचा इशारा दिला आहे.
5 सप्टेंबर पर्यंत सकारात्मक तोडगा निघाला नाही, तर पुढील आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा व्यापारी संघटनांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती यांच्या तर्फे दि ग्रेन, राईस अॅन्ड ऑईल सीडस् मर्चेंटस् असोसिएशन (ग्रोमा) च्या माध्यमातून मुंबई येथे मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी व अजूबाजूच्या सर्व जिल्ह्यांच्या व्यापारी संघटनांची परिषद झाली. परिषदेस महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचे सदस्य ललीत गांधी, जितेंद्र शहा, दिपेन अगरवाल, भिमजीभाई भानुशाली, राजेंद्र बाठिया, रायकुमार नहार व किर्ती राणा उपस्थित होते. तसेच मुंबई येथील विविध संघटनेचे पदाधिकारी व व्यापारी वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सभेमध्ये दि. २७ ऑगस्ट रोजीचा बंद यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व व्यापाऱ्यांनी त्यामध्ये सहभागी व्हावे. सर्व प्रकारचे व्यावसायीक, रिटेल व्यापारी सदरच्या बंदमध्ये सामिल होणार असून सदरच्या बंदमध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. सामान्य जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन स्वइच्छेने बंद पाळण्यात येणार आहे.
तसेच व्यापाऱ्यांच्या समस्यांवर शासनाकडून दि. ५ सप्टेंबर पर्यंत समाधानकार उत्तर न मिळाल्यास दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजी राज्यव्यापी परिषद घेण्यात येईल व त्यामध्ये अंदोलनाची पुढील दिशा अधिक तीव्र करण्यात यावी, असे एकमताने ठरले. तसेच आजच्या सभेमध्ये उपस्थित असलेल्या व्यापाऱ्यांतर्फे कृती समितीच्या सर्व सदस्यांवर आगामी निवधानसभा निवडणूक लक्षात घेऊन राजकीय निर्णय घेण्याबाबत दबाव टाकण्यात आला, अशी माहिती महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचे समन्वयक राजेंद्र बाठिया यांनी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App